Showing posts with label Poems. Show all posts
Showing posts with label Poems. Show all posts

Sunday, 2 August 2026

कविता #25 - डूमस्क्रोलिंगची धुंदी

    आपण अशा काळात जगतो आहोत जिथे जगाशी जोडणारी साधनं वाढली, पण स्वतःशी जोडणारे क्षण कमी झाले. दिवसाची सुरुवात स्क्रीनने होते आणि शेवटही त्याच प्रकाशात. मधल्या वेळेत किती बातम्या, किती व्हिडिओ, किती पोस्ट, किती प्रतिक्रिया समोरून गेल्या... पण दिवस संपल्यावर मन मात्र अनेकदा रिकामंच वाटतं.

    मोबाइल, सोशल मीडिया किंवा तंत्रज्ञान चुकीचं नाही. उलट त्याने आयुष्य अनेक प्रकारे सोपं केलं आहे. पण प्रत्येक सोयीची एक किंमत असते. नकळत आपण आपल्या वेळेची, शांततेची आणि स्वतःशी असलेल्या संवादाची किंमत मोजू लागतो.

    आज आपण प्रत्येक क्षण टिपतो, पण तो जगायला विसरतो. इतरांच्या आयुष्यात डोकावताना स्वतःच्या मनात डोकावण्यासाठी वेळच उरत नाही. जवळची माणसं शेजारी बसलेली असतात, पण प्रत्येकाच्या नजरा वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये हरवलेल्या असतात. संवाद कमी होतो, प्रतिक्रिया वाढतात. माहिती वाढते, पण मन हलकं होत नाही.

    कधी स्वतःलाच प्रश्न पडतो... शेवटचं आपण शांत बसून काहीच न करता केव्हा राहिलो होतो? शेवटचं आकाशाकडे पाहून मन भरून आलं होतं ते कधी? शेवटचं स्वतःच्या मनाचं बोलणं आपण खरंच ऐकलं होतं का?

    कदाचित या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगळी असतील. पण प्रश्न मात्र जवळजवळ सगळ्यांचाच एकसारखाच आहे.

    ही कविता कोणावर टीका करण्यासाठी नाही. मोबाइल बाजूला ठेवा, असं सांगण्यासाठीही नाही. ही फक्त आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नकळत घडत गेलेल्या बदलांकडे एक शांत नजरेने पाहण्याचा प्रयत्न आहे. कारण कधी कधी बदलाची सुरुवात मोठ्या निर्णयाने होत नाही; ती फक्त एका क्षणाच्या जाणीवेने होते.

    त्या जाणीवेच्या प्रवासातील काही कवितारुपी शब्द...

Poem Published in Pratyaksha Newspaper
                      फोन उजळतो, खोली अंधारते,
                    डोळे थकतात, मन सैरभैरते.
                    स्क्रीनवर जग धावतं पुढे,
                    आपण मात्र मागेच राहतो तिथे.


बोटं फिरतात, वेळ निसटतो,
एक पोस्ट, मग दुसरी करत क्षण हरवतो.
हातात मोबाइल, मनात कोलाहल,
शांततेचा पत्ता मात्र शून्यच राहतो.



                    इतरांच्या हसण्यात आनंद शोधतो,
                    स्वतःच्या मनाशी बोलणं टाळतो.
                    Status रंगीत, आयुष्य फिकं,
                    तुलनेच्या गर्दीत हरवतं अस्तित्व एकटं.



निसर्ग बाहेर, आपण आत,
आभासी प्रकाशात हरवलेले हात.
आकाश निळं, पण नजरेत नाही,
स्क्रीनचं आकाश मात्र सतत सोबत राही.



                 जवळची माणसं जवळ असून दूर,
                 स्क्रीनवरची नाती मात्र रोजच हजर.
                 घरात संवाद कमी होत जातो,
                 Notification चा आवाज मात्र वाढत जातो.



सेकंदागणिक बातम्यांचा मारा,
कधी भीती, कधी राग, कधी सारा.
कोमल मन थरथरतं आत,
कठोर मन होतं दगडासारखं घट्ट.



                        स्क्रोलिंगमध्ये विचार विरघळतात,
                        भावना हळूच बोथट होतात.
                        हसणं reaction मध्ये अडकतं,
                        खरं हसू कुठेतरी हरवतं.



वेळ जातो, पण कळत नाही,
आज संपतो, उद्या सुरूच राही.
आयुष्य live असतं बाहेर कुठे,
आपण replay मध्ये अडकलेलो इथे.



                   आभासी गर्दीत श्वास अडखळतो,
                   मन मात्र काहीतरी शोधत राहतो.
                   अचानक शांततेची हलकी जाणीव,
                   आणि आत कुठेतरी… काहीतरी उमजतं.



त्या उमजण्यात काही सांगणं नसतं,
काही बदलायचंही नसतं,
फक्त आत कुठेतरी हलकं वाटतं,
आणि तेवढंच पुरेसं ठरतं.


                                    - अनुप्रिया सावंत



Tuesday, 3 March 2026

कविता #26 - कृपा


कधी कधी खरंच असं वाटतं की आपण सगळं व्यवस्थित सांभाळतोय, पण आतून मात्र कुठेतरी थकलो आहोत... रोजच्या आयुष्यात बोलताना काही गोष्टी गिळून टाकतो, हसताना काही वेदना लपवतो, आणि पुढे जात राहतो. जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि धावपळ यामध्ये स्वतःशी निवांत बसण्याची सवडच मिळत नाही. मग एखादा शांत क्षण येतो आणि आपण स्वतःलाच विचारतो... मी नेमका कोणासाठी एवढा धावत आहे?  

त्या क्षणी जाणवतं की मनात खूप काही साचलेलं आहे. भीती, संभ्रम, न बोललेले प्रश्न… पण त्याच मनात कुठेतरी एक शांत, स्थिर जागाही आहे. तिथे पोहोचलो की कळतं, "आपण पूर्णपणे एकटे नाही आहोत."

काहीतरी अदृश्य आधार सतत सोबत असतो.  तो गाजावाजा करत नाही, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत बसत नाही, पण जेव्हा आपण थोडं थांबतो, थोडं मन मोकळं करतो, थोडा विश्वास ठेवतो, तेव्हा त्याची जाणीव होते. 

सगळं स्वतःच पेलायची गरज नसते, हे समजणं म्हणजेच कदाचित आतून मजबूत होण्याची सुरुवात असावी.

ही कविता त्या जाणिवेबद्दल आहे... स्वतःशी प्रामाणिक होण्याबद्दल, आतल्या शांत जागेला ऐकण्याबद्दल, आणि नकळत आयुष्यात पसरत राहणाऱ्या त्या कृपेच्या हलक्या, आश्वासक स्पर्शाबद्दल.

ही कविता त्या अंतर्मनातून उमटणाऱ्या एका साध्या, पण खोल दडलेल्या भावनांना व्यक्त करणारी साद आहे.


(सदर कविता 'दैनिक प्रत्यक्ष' मध्ये छापून आलेली आहे.)


तुझे शब्द श्वास व्हावे,

तुझा ध्यास आस ठरावे,

तुझ्यामुळे तल्लीन व्हावे,

मन वारे सावरावे.


अंधार सावल्या झटकुनी,

भीती उडवी वाऱ्यांनी,

अश्रूंना हसू खुलावे,

पावलांना दिशा लाभावे.


गाभाऱ्यात उजेड साठे,

शून्यातही नवे पथ गाठे,

वादळात किनारा मिळे,

हरवुनी स्वतःला सापडे.


हा प्रवास अदृश्यात मिसळे,

शांत सागरात विसावे,

कृपेच्या ओघात वाहावे,

इथेच अंतर्मन उजळावे!


                            - अनुप्रिया सावंत

Wednesday, 28 January 2026

कविता #23 - शाळा!

(सदर कविता प्रत्यक्ष दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे.  नावासहित शेअर करण्यास हरकत नाही.) 

     ही कविता म्हणजे केवळ शाळेचं वर्णन नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एका अविस्मरणीय प्रवासाची आठवण आहे. पहिल्या घंटानादापासून ते वर्गातल्या खोडकर हसण्यांपर्यंत, मैदानावरच्या धावण्यांपासून ते ग्रंथालयातील शांततेपर्यंत... आपण सगळेच कधी ना कधी हे जगणं अनुभवलं आहे. ही कविता वाचताना आपण फक्त शब्द वाचत नाही, तर स्वतःचं बालपण पुन्हा एकदा अलगद जगत असतो.

     शाळेचा प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून गेला. टिफिनमधला वाटलेला घास मैत्रीचं मोल शिकवून गेला, छोट्या छोट्या यशांनी आत्मविश्वास दिला, तर अपयशांनी धैर्य दिलं. शिक्षकांच्या शब्दांतून मिळालेलं मार्गदर्शन आणि मैदानावर शिकलेलं धैर्य ह्यातून अनुभवांतून आपण आज जे आहोत ते घडलो आहोत.

     घंटानाद, वर्ग, बाक, मैदान... हे शब्द फक्त आठवणी नाहीत, तर आपल्या मनावर कोरलेले ठसे आहेत. आज आपण कितीही पुढे गेलो, कितीही बदललो, तरी मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात  शाळेतला प्रत्येक कोपरा अजूनही जिवंत आहे. ही कविता त्या आठवणींना जणू हळूच हाक मारते.

     प्रत्येकाची शाळा वेगळी असली, तरी तिथे उमललेली स्वप्नं, मैत्री, संस्कार आणि आत्मविश्वास मात्र सगळ्यांसाठी सारखेच असतात. शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, तर माणूस घडवणारी भावना आहे, हे ही कविता ठळकपणे सांगते.

     ही कविता आपल्याला फक्त भूतकाळात नेऊन ठेवत नाही, तर आजच्या आपल्याला एक हळवा प्रश्नही करतेय!
“तुला घडवणाऱ्या त्या शाळेच्या आठवणीला अजूनही तू साद घालतेस का?”


शाळेचा पहिला घंटानाद, उघडतो ज्ञानाचे दरवाजे,
मैत्रीची रंगीत दुनिया, फुलते नित्य वर्गामध्ये.

शिक्षकांच्या शब्दांमध्ये, मार्गदर्शनाचा उज्ज्वल प्रकाश,
खेळ–अभ्यास–हसू–मस्ती, यातूनच होत जातो विकास.

मैदानावरच्या वेगवान धावण्यात, शिकतो धैर्याचं बळ,
छोट्या छोट्या यशांनी, प्रत्येक दिवस होई उजळ.

टिफिनमधला वाटलेला घास, देतो मैत्रीचा गोड पुरावा,
या नात्यांच्या उबेतून, मनाला मिळतो नवाच ठावा.

ग्रंथालयातील शांततेत, पुस्तकं देतात ज्ञानाची मजा,
प्रत्येक पानावर उमटतो, जीवनाचा सुंदर धडा.

सभागृहातील कार्यक्रम, उभारी देतात स्वप्नांना,
उमलतात नवे कलागुण, आत्मविश्वास वाढतो मना.

मैत्री, संस्कार, स्वप्नं इथेच सगळं आकार घेतं,
शाळेचा हा प्रवास, खरं माणूस घडवतं.

शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, ती भावनांची दुनिया,
इथेच शिकतो आपण, जीवन जगण्याची खरी किमया.

                                        - अनुप्रिया सावंत

Sunday, 17 August 2025

कविता #22 - वाटेवरचा प्रवास!

   

     जीवन हा एक अखंड प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर नवनवीन अनुभव, संघर्ष, आनंद-दुःख यांचे मिश्रण आपल्याला सतत घडवत असते. म्हणतात ना... Change is only constant. आपण चालत आलेली वाट कधी उभी-आडवी, काटेरी; तर कधी हिरवीगार, पावसाळी. पावलोपावली बदलणारा निसर्ग हा आपल्याच मनोवृत्तीचा आरसा असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती नक्की होणार नाही. प्रवास थांबत नाही, चालूच राहतो. थकव्याच्या क्षणीही अंतरंगातील ऊर्जाच पुन्हा पावलं पुढे टाकायला भाग पाडते. त्यातूनच नवे बळ देत असते.


     'वाटेवरचा प्रवास!' ही कविता जीवनाच्या ह्या प्रवासाचीच कहाणी सांगत आहे. संघर्ष आणि थकवा असूनही आशेचा, धैर्याचा आणि उभारीचा प्रकाश आपल्याला पुन्हा चालायला शिकवतो. अंधारानंतर प्रकाश, पावसानंतर ऊन, आणि दुःखानंतर उमलणारा हसरा क्षण, याचं प्रतिबिंब म्हणजे हा 'वाटेवरचा प्रवास!'


पहाटेच्या पायवाटेवर,

पाऊल टाकताच वारा गाई,

दगडधोंड्यांच्या गोष्टींनी,

पाऊल थांबवुनी पाहे जाई!


विचारांचे वळणवाटे,

ओझे जड मनावर चढते,

थकलेले देह-श्वास माझे,

उसासा घेऊन मागे वळते!


अंतरातून ऊब हलकी,

श्वास नवा स्पंदन भरते,

पुन्हा पाऊल पुढे सरके,

धूसरपणावर उजेड फुलते!


कधी वारा झोंबणारा,

कधी सूर्य उबदार होई,

वळणावर धीर नवा तो,

मनाला उभारी देत राहे!


प्रवास कधी लांब, ओसाड,

कधी पावसात भिजवितो,

पावलांच्या ठशांत मात्र,

सूर उभारीचा साठवितो!


शक्ती नसे शब्दांमध्ये,

हृदयात ती साठवलेली,

अदृश्य स्पर्शातून जेव्हा,

जिवाला नवी उभारी देई!


एक काळजाची हळवी हाक,

पोहोचावी काळजापर्यंत,

सूर्यकिरण शुभ्र प्रकाशी,

चांदण्यासारखा तेजोमय!


दाट अरण्यातही सापडावा,

मार्ग एक अंतरीचा शुद्ध,

अंतरात्मा निर्मळ व्हावा,

जैसे परिस स्पर्श सुवासिक!

                                    - अनुप्रिया सावंत

Friday, 22 November 2024

कविता #21- लेखणीचा लपंडाव

 

Published in #Pratyaksha newspaper 


     आज बऱ्याच दिवसानंतर हो नाही करत काही तरी लिहायला सुचलंय.  पण त्या मागे मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे दोन्ही इच्छा शक्तिंचे पाठबळही होतेच.  ह्याचे सर्व श्रेय त्यांचेच आहे.  कारण त्यांच्यामुळेच थांबलेल्या या गाडीला पुन्हा नव्याने 'एक्स्प्रेस वे' गवसावा असं वाटतंय.  आणि हे वाटणं मला मात्र पूर्णपणे मनसोक्त अनुभवायचं आहे.


     सध्याच्या गडबडीत शब्द सुचणं म्हणायला गेलं तर मला कठीणच वाटत होतं. हृदयाला गोष्टी भिडत नाहीत तोपर्यंत मनाचा आणि बुद्धीचा मेळ साधला जात नाही, अगदी तसंच काहीसं!  भिडलेल्या हृदयाला हे वाक्य कारणे दाखवा निमित्त म्हणावं तरी काही रुपी हे खरंही असावं.  काय वाटतं?


     मन शांत जरी ठेवले तरी विचारांना लगाम द्यायचा की त्यांना मुक्तविहार करू द्यायचं?  लगाम दिला तर डोक्यातल्या भूणभूण करणाऱ्या भुंग्यांना आपण किती थांबवणार! आणि मुक्ताविहार करायला द्यायच म्हंटले तरी किती धरून ठेवणार!  नाही का?


     ह्यांच्या लुटूपुटूच्या भांडणात मात्र ज्ञानेंद्रियांना आपला डाव साधला.  आणि ना हा म्हणता म्हणता 'लेखणीचा लपंडाव' सरसर पानांवर धावला.  डोक्याने मनाशी गट्टी करत हृदयावर पकड धरली आणि अलगद त्यावर विसावत ओठांच्या कडांवर रुंदावली.


लेखणीच्या कुशीत पेनच रुसला
कागदावर त्याचा फटकाच बसला.

शाईने सोडली पेनाची साथ
रबर म्हणाला ही काय बात!

डोळ्यांनी दिले त्यावर इशारे
गोल-गोल फिरले ह्यावर बिचारे!

नाकाचा शेंडा भलताच उडाला
हलकाच पाण्याचा थेंब गळाला.

ओठांच्या बाणाने निशाणा साधला
सरळ रेषेत समांतर धावला!

कानांच्या पाकळ्यांनी हलक्यात घेतले
दातांच्या फटीत जिभेला धडकले.

मनाने थेट इशाराच साधला
बुद्धीच्या विचारांना छेद लगावला!

हळूच उतरले काव्यांचे रंग
गोबऱ्या गालावर हसूच दंग.

जमले म्हणत हात सरसावले
त्यावर पायाने ठेकाच लगावले.

लेखणीला आले हुरूप शाईवर
उतरले शब्द थेट पानांवर.

                                         - अनुप्रिया सावंत.

Tuesday, 18 July 2023

कविता #२० - किमयागार

Photo: Google

           Photo courtesy: Google

(प्रस्तुत कविता 'दैनिक प्रत्यक्ष' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे.)

          व्यक्ती तशी वल्ली तितक्याच प्रकृती.  माणसांमध्ये ही गोष्ट प्रत्येकाला पाहायला मिळतेच.  पण त्याच माणसांना खुलवणारा, हसवणारा, साद घालणारा आणि त्याच्यासोबत जुळवून घ्यायला शिकवणारा मात्र समोर असूनही अलिप्त राहत असतो तितकाच अलिप्त असूनही जवळ असतो.  म्हणूनच तर ह्याला 'किमयागार' म्हणतात.  बरोबर ना!  ह्याची जादूच निराळी.  जगायला शिकवणाराही हाच आणि जगताना अनुभवायला शिकवणाराही हाच.


 रोपट्यांनी साऱ्या फुलावे घट्ट मातीच्या साक्षीणे

फुला - फुलाने बहरावे वाऱ्याच्या सोबतीने!


चांदण्याची सारी शोभा निळ्या नभी चमकावी

मधूनच तारे - तारका त्याच्या सोबतीने असावे!


सर्व दिशांतले वारे घट्ट मिठीत विसावे

मंजुळ ध्वनीच्या लहरी त्यात डुलत राहावे!


खळखळाट नदीचा नाद चहू बाजूंनी गर्जितो

डोंगर दरी कपाऱ्यातून बेधुंद मुक्त संचारतो!


किमया ही किमयागाराची तोचि साधितो जाणावे

त्याच्या सोबतीने सारे आपण चालतची राहावे!!!

                                                         अनुप्रिया सावंत. 

Tuesday, 9 May 2023

कविता #१९ - मागे वळून पाहताना...

(सदर कविता 'प्रत्यक्ष-बिगर राजकीय दैनिक वृत्तपत्र' मध्ये छापून आलेली आहे.)

     दिवसामागून दिवस जातच असतात. मिनिटामिनिटाच्या हिशोबात म्हणतात ना, वेळ कधी थांबत नाही.  तरी उगाच आपण बऱ्याचदा घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो.  जर-तर मध्ये काही तथ्य नसतेच, मात्र आपण त्यातच गुरफटत असतो.  हातात असणाऱ्या गोष्टींपेक्षा नसणाऱ्या गोष्टीत आपण जास्तच गुंतून राहतो.  चढ-उतार अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण मन आपणच कसे वेगळे हे सिद्ध करत राहतं.  बरोबर ना!  आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगता यायला हवं आणि जगताना ते अनुभवताही यायला हवं.  डिजिटलायझेशनच्या युगात सर्व शक्य आहे, फक्त त्याचा उचित वापर करता यायला हवं!  असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली, हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


 असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली

जीवनाच्या वळणावर आस नित्य मनी

ध्यास असावा सोबती अन महत्वाकांक्षा

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


लाटा येती किनारी नि निघोनी जाती

फोडुनी टाकावी त्याच जिद्दीच्या बळाने

आहोटी आणि भरतीच्या ह्या विशाल भिंती

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


प्रवाहासोबत प्रवाहाविरुद्धही पोहावं लागते

वाराही जिथे बदलतो दिशा वादळी भीतीने

आपण मात्र संकटी ठाम असावं नक्की

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


आनंदाच्या हिंदोळ्यावर अनुभवाचे चीज

परिश्रमाचे साक्षीने रोवावे त्याचे बीज

कृतज्ञता ठेवुनी ठायी असावे निश्चिन्त

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


                                   - अनुप्रिया सावंत.

Friday, 21 October 2022

कविता #18 - स्वच्छंदी

     खरं तर लिहिण्यासारखे, व्यक्त होण्यासारखे प्रत्येकाकडे खूप काही असते. आवडीचे पदार्थ खायचे आहेत, बनवायचे आहेत, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, मैत्रिणी-मित्रांना भेटायचे आहे, भटकंती करायची आहे, लिहायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे, खूप काही छान छान गोष्टी करायच्या आहेत. सर्वात महत्वाचं स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. मात्र सगळं कळत असूनही हे आपलं मन मात्र अनेकानेक गोष्टीत अडकलेले राहिले आहे आणि त्यातून आऊटपुट काय? थोडं गंमतीत घ्यायचे झालं तर 'बाकी सब ठीक है| हो की नाही?

     आपल्या मनाला आपण खूप बांधून ठेवतो. एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की मात्र एक नाही दोन नाही अनेक दगड समोर येऊन उभे राहतात आणि सुरु होते मनाची लहर! तुम्हाला म्हणून सांगते अगदीच 'कहर' आहे हो हे!  
तेवढ्यात मन गुणगुणू लागते... दगड दगड दगड दगड इकडे दगड तिकडे दगड... दगड दगड दगड दगड. थांबा थांबा..... तुम्ही लगेच चाल म्हणायलाच सुरुवात केली...

     खरं तर मीच खूप दिवसांनी माझ्या ब्लॉगला भेटायला आले आणि तिथे पुन्हा 
भेट झाली माझ्यातल्या हरवलेल्या 'मी' ची. असा 'मी' जो पुन्हा स्वतःला काही सांगू पाहत आहे, काहीतरी सुचवायचे आहे, काहीतरी पुन्हा त्या दुनियादारीत स्वतःलाच नव्याने पाहायचे आहे. कामे तर प्रत्येकाचीच चालू असतात. वेळ नसतोच, तो आपल्याला काढावा लागतो, हे माहित असूनही चालण्यातला वेग थोडासा कमी झालेला असतो. थोडासाच म्हटले, कारण नुसती गाडी चालू करून उपयोग नाही, ऍक्सिलेटरवर जोर धरावाच लागतो. आपल्यातला छंद आपण नाही जपला तर ह्या आपल्या 'स्वच्छंदी' मनाला साद कशी घालणार?



नको राग नको द्वेष,

नको लोभ विनाकारण त्वेष,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको थट्टा नको मस्करी,

नको हांजी कुणाची फुशारकी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको लालच नको बंधने,

नको खोटे नाते आश्वासने,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


रम्य चित्र संगीताची साथ,

नभी इंद्रधुनचा रंग खास,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


शुभ्र आकाश ढगांची बात,

पक्षी स्वैरावत मनमुराद गात,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


वेळेचे गणित बांधूनी गाठोडी,

स्वप्नांचे पंख घेऊनी भरारी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


                                                      - अनुप्रिया सावंत


Saturday, 12 March 2022

कविता #17 - शब्दांचे गुंफण


       'शब्द' अगदीच अडीच अक्षरांनी बनलेला.  हाच जेव्हा मनाच्या पटलावर उमटत जातो तेव्हा भावना अगदी मुक्त झाल्यासारख्या होतात.  मनात साठवून ठेवलेल्या अनेक विचारांना ह्या शब्दांसह जेव्हा मोकळी वाट मिळते तेव्हा मुक्तछंद पणे फक्त वाहत राहतात.  कधी आनंद, कधी प्रसन्नता, कधी क्लेश, कधी नाराजी, कधी हसणं तर कधी रडणं.  मानवी मन त्याच्या भावना सगळ्याच रसाने अगदी सरमिसळून जातात ते ह्याच शब्दांच्या आधाराने.  खरंय ना! 


     बऱ्याचदा आपल्याला सांगायचं असतं बरेच, पण शब्दांना काही केल्या पकडता येत नाही.  म्हणजे अगदीच म्हणायचं तर शब्दांचे सुद्धा लपंडाव चालूच असतात.  त्यांना पकडण्यासाठी पकडापकडी करत अगदी खो सुद्धा देता येतो.  ह्याच शब्दांच्या दुनियेत कधी दोन रन, कधी चार तर अगदी सिक्स मारून षटकार करताना अगदी भन्नाट मजा येते.  आणि आऊट झाल्यावर मात्र पुन्हा लपाछपी करत हेच शब्द आपल्याला भुलवतही राहतात.  आहे की नाही शब्दांची गंम्मत.  


शब्दांची गुंफण निरंतर अशीच बहरत जावो,

मनाच्या अंतरी प्रत्येक पटलावर रसिक वाचकहो,

सदाबहार नित्यनूतन अशीच सादर होत राहो,

ही माझी इच्छा असावी तुमची सदिच्छा!!!


दैनिक प्रत्यक्ष वर्तमानपत्रात दिनांक २७ फेब्रुवारी रोजी छापून आलेली ही माझी 'शब्दांची गुंफण' कविता तुम्हाला नक्कीच आवडेल.  तुमचा अभिप्राय नक्की कळवावा. 


शब्दांना शब्दांनी गुंफायला लागतो वेळ खरा,

मनाची भाषा कळायला नाही लागत बहाणा.


उमटत जातात पानांवर मुक्तहस्ताने ही अक्षरे,

जणू ओंजळीत भरलेल्या पारिजातकाच्या सुवासाने.


ठाव घेत मनी दडून बसलेला कल्लोळ भावनांचा,

उधळत चहू बाजूंनी सप्तरंग इंद्रधनू नभीचा.


पहुडावे मनाने ह्या सुखाच्या निद्राधीन,

नाते हृदय शब्दांचे होवो लेखणीच्या स्वाधीन.


विनावे शब्दांच्या धाग्यांनी जसे फुलाने बहरावे,

शब्दांच्या लपंडावामध्ये फक्त फुलतच राहावे.


                                                                                     - अनुप्रिया सावंत.


Monday, 7 June 2021

कविता #16 - निसर्ग

         निसर्ग ह्याचा नुसता उल्लेख करताना सुद्धा किती गोष्टी आपल्यासमोर झरझर उभ्या राहतात.  त्याचे रंग, रूप, सौन्दर्य, आल्हादायकता, त्याचे हसणे, रुसणे, बागडणे, अनेकप्रकारे जगाशी असणारे अतूट नाते ह्यातून व्यक्त होत जाते.  ह्याच निसर्गासोबत आपण मनसोक्त गप्पाही मारतो.  मनातला हिंदोळ्यावर मुक्त संचार करतो, तो ह्याच निसर्गाच्या साक्षीने.  

       प्रत्येकाला त्याचे दिसणारे अलौकिक रूप न्यारेच.  ह्याचाच छत्राखाली सारे जीव विसावत राहतात.  हा आपल्याला हवा तसा सादही घालत असतो.  त्यालाही आपली सोबत आवडत असतेच.  व्यक्त होताना तो त्याच्या सवंगड्यांना घेऊन आपल्याशी गुजगोष्टी करत असतो, त्याच्या भावना आपल्याला सांगत राहतो.  हा खरंच एक साजिरा कलावंत आहे.  हो ना!

Published in #Pratyaksha Newspaper

सांज वेळेला निसर्ग रंगारी
नव्याने निसर्ग बहरत खुणवी
उधळत येतो त्याचे सप्तरंग
काय किमया त्याची वर्णावी!

सखे, काय सांगू या मनी
हाच कलावंत मनाला खुणवी
मनाच्या हिंदोळ्यावर मुक्त झुलवुनी
वाऱ्याच्या वेगानं बेभान बागडवी

समुद्राच्या लाटेवर सैरावैरा आदळत
म्हणे जाऊनि वाऱ्याला भिडतो
इथेच नित्य नादनिर्मिती घडवत
कलाची कलाकारी इथेच जडवितो

उधळतो चहूकडे सप्तरंग रंगारी 
जनी निरोप देता सायंकाळी
किमयागार नित्य हाच कलाकार
निरंतर ह्याची जादूच निराळी!

               - अनुप्रिया सावंत.

Tuesday, 11 August 2020

कविता #15 - शब्दांची दुनिया!!!



     मनाचे गणित खुपच अजब असते, नाही का?  मनातल्या मनात आपण कितीतरी वेळा संवाद साधतो, अनेक गोष्टींबद्दल विचार करत राहतो.  त्यांच्याशी बोलताना, हसताना वेळप्रसंगी भांडतोही.  इतकेच नाही तर अप्रत्यक्षपणे आपल्या मनाशी आपणच अगदी अगणित हितगुज करत राहतो.  बऱ्याचदा त्यांना खुप काही सांगायचे असते, पण ओठापर्यंत येऊन मग तिथेच थबकतात.  पुन्हा हृदयाला जाऊन भिडतात आणि मग हृदयातून मनाशी थेट संवाद साधत, नकळत आणि तितक्याच अलगदपणे कागदावर उतरतात.  
     
     हो, आपल्या मनाच्या कुशीत बागडणारी, खेळणारी, दंगा करणारी, आपल्याशी सतत गप्पा मार अगदी मुक्तविहार करणारी आपलीच 'शब्दांची दुनिया'.


शब्द हे असे मनातच लोळणारे,
मनालाच गादी समजून त्यातच मस्त लोळणारे.


शब्दांच्या दाटीतून हळूच ओठावर उतरून,
काठावरच थांबणारे,
शब्दांचे पाखरू बनून मनातच विहार करणारे.


शब्दांच्या  गर्दीत शब्दाला शोधणारे,
शब्दांच्या खेळात शब्दांनाच समजावणारे.


हृदयाच्या हुंदक्यात नयनांतच तरंगणारे,
शब्दांच्या राज्यात शब्दालाच फसवणारे.


ओठांच्या काठ्यावर आणि नयनांच्या तीरेवर पल्ल्याआड होणारे,
पल्ल्याआड होता होता हळूची, लेखणीच्या कुशीत जन्मणारे.

                          - अनुप्रिया सावंत.

Saturday, 31 March 2018

कविता #14 - नाउमेद मी कधीच नव्हते...




     प्रत्येक व्यक्तीच्या मनात व्यक्तिपरत्वे अनेक विचारांचे काहूर माजत असते. आपण काय करतोय? काय चालू आहे? एक ना अनेक प्रश्न स्वतःच स्वतःला बऱ्याच वेळा विचारतो. आपल्या जे हवे असते ते मिळतेच असे नाही. आणि जे आपल्याजवळ असते त्यात आपण समाधानी असतोच असे नाही. कारण माणसाला जे हवंय त्यापेक्षा त्याच्याकडे काय नाही आहे, ह्या तुलनेतच तो जास्त गुरफटला जातो. ह्यात आपला आळशीपणा म्हणा किंवा आत्मविश्वासाची कमी म्हणा ह्यामुळे स्वतःला ओळखण्यात आणि त्यातून चांगले शिकण्यात कमी पडतो.

     कुठेतरी मेहनत कमी पडते किंवा काहीतरी अविचारीपणा नडतो. मात्र ह्यामुळे गफलत होते ती आपलीच. नाही का? क्षणात असे वाटते सगळे मार्ग थांबले. क्षणात वाटते आता काहीच नाही उरले. पण, खरच असं असतं का हो? जीवन ही कला तर आहेच पण त्याहूनही सुंदर परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मग असं असताना खरच आपले मार्ग थांबतील का? तर नक्कीच नाही. थांबेल ती 'आशा' कसली? सोडून देईल त्यात 'उमेद' कसली? हिंम्मत हारेल ती 'व्यक्ती' कसली?

        कारण, उमदीपणा व्यक्तीला प्रवाहित करतो ते न थांबण्यासाठीच. नदीच्या प्रवाहासारखा कुठूनही प्रवाहित झाला तरी अथांग समुद्राला मिळण्याकरिता, सागराच्या लाटांसोबत किनारा शोधण्याकरता. स्वतःच्या नावेत स्वतः नावाडी होण्याकरता.

    नाउमेद मी कधीच नव्हते... 'दैनिक प्रत्यक्ष काव्यपीठ' द्वारे माझी ही कविता दिनांक 5 मार्च 2018 ला छापून आलेली आहे. ती मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून पुन्हा सर्वांसमोर सादर करते.


उमदी ही आशा,
ना उमेद मी कधीच नव्हते.
जीवनाची भाषा मी 
जगण्यातून शिकत होते.
हातात असतानाही हाताच्या रेषेत 
वेड्यासारखी शोधत होते.

हृदयात असूनही,
देवळाची पायरी चढत होते.
दगडासमोर डोके फोडून, 
जखमांनी विव्हळत होते.
तरीही उमेदाची आशा,
मनामनात भिनवत होते.
नाउमेद मी कधीच नव्हते.

जगण्यासाठी सतत, 
झोकून प्रयास करत होते.
प्रयास करताना मात्र 
डोळे झाकत शोधत होते.
ठेच लागता पायाला, 
दोष मात्र दगडाला देत होते,

माझी चूक मला कळताच,
स्वतावर फक्त हसत होते.
प्रयत्न अपुरे असताना,
दैवावरच दोष देत होते.

आळशीपणाने भरलेल्या
ह्या माझ्याच मनाला,
पुन्हा नव्याने जागवत आहे.
माझ्या मनाला समजावत, 
पुन्हा पुन्हा शहाणं मी करणार आहे.

कारण अजूनही उमेद आहे, 
नाउमेद मी कधीच नव्हते.

                                                       - अनुप्रिया सावंत.

Monday, 2 January 2017

कविता #13 - नवीन वर्षाच्या शुभेच्छा! - Welcome 2017

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


वर्ष आले तसे गेलेही
असे म्हणत अनेक वर्ष सरलेही

धम्माल मस्ती कट्टा
ह्यातच वर्षाचा सरकता पट्टा

नवीन वर्षाचे स्वागत
जुन्या आठवणींचा पत्ता

मिळवल्यापेक्षा हरवलेल्या क्षणांची
गणितीय आकडेवारी आलेखरूपाची

स्वागत करायचे ह्याही वर्षाचे
मात्र गवसलेल्या खजिनारूपाचे

वजाबाकी दुःखाची बेरीज सुखाची 
प्रत्येक क्षणाला अधिक लुटावयाची

स्वतःच्या अंतर्मनाच्या कुशीत
साजरा करूया होऊनि प्रफुल्लित

परमेश्वराच्या स्मरणाने 
आनंदाची शाल पांघरुया

नववर्षाच्या स्वागता 
प्राजक्ताची फुले उधळूया

जीवनाचा आनंद सुगंधरुपी 
फुलासारखे घेऊयात

फुलपाखरासारखे सुंदर क्षण 
जीवनभर जपूयात


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

                                    - अनुप्रिया सावंत

Sunday, 6 November 2016

कविता #12 - मनाची सर...

               बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाला मात्र शब्दाला गती मिळत नाहीये.. अक्षरही शब्दांमध्ये गुंफले जात नाहीयेत.. मन शांत आहे तरीही अनेक विचारातून फिरत आहे.. संध्याकाळची मैफिल ताऱ्यांनी सजल्यासारखी नटली आहे.. चांदण्या रात्रीत शाल पांघरल्यासारखे शब्द पहुडले आहेत.. मनाला उसंत मिळाली भावनेला नाही.. शब्दाला जागवायला हवं.. 
    
          मनाची झेप अनेक विचारांत गवसणी घालतंच आहे.. त्यातूनच गवसलेली ही सैरभैर मनाची सर... 

Saturday, 27 February 2016

कविता #11 - 'मराठी राजभाषा दिन' - हार्दिक शुभेच्छा!


'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'.

     27 फेब्रुवारी, हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.  कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर - थोर कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणून प्रसिद्ध.  त्यांनी 'कुसुमाग्रज' ह्या टोपण नावाने त्यांचे कवितालेखन केले.) यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे.  हा वारसा आपण आणि आपल्या भविष्यातील पिढीने जपला पाहिजे.   आणि तो अखंड सुरू रहावा याच स्फूर्तीने कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो.  

मराठीचा छंद
मराठीचा गंध,
लाभला वारसा
भारतीय आमुचा जन्म.

बोलतो मराठी
ऐकतो मराठी,
जाणतो मराठी
अभिमान रुपी.

संतसज्जनांनी प्रत्यक्ष
देव जन्मभूमी लाभली,
सर्व त्यागुनी वीरांनी
मराठी मायभूमी घडविलीं.

अनंत ध्येयसक्तींनी
कवीरूपी माय सजली,
नानाविध अलंकार
भूषवित मराठी अवतरली.

सहज सोपी सुंदर भाषा
घेते हृदयी ठाव मनाशी,
अभिमान आम्हा भारतीयांना
गर्जतो मराठी मी मराठी.

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

                                                   - अनुप्रिया सावंत.