Tuesday 19 January 2016

मनाचे सुख...


      सुख म्हणजे नक्की काय असतं?  जे मनापासून असते ते सुख?  कि जे मानण्यात असते ते सुख?
मनाचे सुख...
    
     आज अगदी सहजच पुस्तकांच्या कपाटात पुस्तके पाहत असताना 'हसत जगावं' हे पुस्तक पहिले आणि म्हंटले जरा वाचून बघावं.  पुस्तकात अनेक छान छान गोष्टी होत्या.  त्यातले 'मनाचे सुख'...  ही गोष्ट वाचत असताना मला जाणवले ते म्हणजे मी काही दिवसांपूर्वी विचार करत असलेली गोष्ट आणि ह्या पुस्तकातून वाचनात आलेली गोष्ट हे बऱ्याच अंशी सारखीच आढळली.  'तुटे वाद संवाद...' ह्या बद्दलच्या माझ्या ब्लॉगच्या एका आर्टिकल बद्दल लिहित असताना माझ्या मनात चालेला संवाद हाच होता... 'मनाचे सुख म्हणजे नक्की काय?'

      आपण कळत नकळत काळाच्या ओघासोबत चालत असताना कुठेतरी वाहत असतो. मनाचे सुख शोधण्यासाठी धडपडत असतो. पण मनाचे सुख ह्या गोष्टीबद्दल मला तरी असे वाटते कि ते आपल्यातच दडलंय. पण आपण आपल्या संकुचित वृत्तीमुळे ते हरवतोय.  लोभ, राग, द्वेष, मत्सर ह्यामुळे आपण आपले सुख गमवतोय.  हातात जे आहे त्याचा आनंद करण्याऐवजी, मी जे नाहीये त्याच्याच पाठी तर धावत नाहीये ना?  नाही नाही... मन हे सैरभैर पळणारेच असते, फुलपाखरासारखे स्वच्छंद जगणारेही असते. पण... फुलपाखरासारखे मुक्त जगताना आपले भान सोडून तर आपण जगत नाहीये ना!  हाही विचार मी करतेय का?  पण.. का करायचा हा विचार?  आयुष्य माझं आहे मला हवं तसं आपण जगू... हल्लीच चित्रपट पाहिला - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि... मनाने पुन्हा कल्पनेच्या विश्वात रमायला सुरुवात केली.

      तरीही... असा विचार करताना आपण आपल्या आयुष्यात असलेल्या माणसांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या आप्त स्नेहांचा प्रामाणिक विचार करतो का?  हे आणि असे अनेक प्रश्नांनी ह्या छोट्याश्या 'मनाचे सुख' ह्या गोष्टीने  प्रश्नावालींचा काहोर माजवला.  उत्तर माझ्याजवळच होते आणि आहे.  पण त्या उत्तराकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकतोय.  हो! खरच चुकतोय.  का कुणास ठाऊक... आज जाणीव होतेय कि हल्ली सोशल मेडिया मध्ये आपण किती गुंतत आहे.  समाजाचे भान तर दूरच, आपल्याला आपलेही भान नसते.   वेगवेगळे कॅन्डी क्रश सारखे गेम्स खेळण्यात तर आपण आनंद व्यक्त करतोय आणि त्याहीपेक्षा त्या गेम्सचे रिक्वेस्ट दुसऱ्यांना पाठवण्यात आपले मोठे सुखच मानतोय.  खरं तर फारच हास्यास्पद गोष्ट आहे ही.

      स्वतःच्या सुखासाठी मोठ-मोठ्या चैनीच्या वस्तू विकत घेण्यात सुख मानतो.  पण घरात नेमकी गरजेची वस्तू कोणती?  घरातल्यांना आपण सुख देतोय का?   माझ्या जबाबदारीची जाणीव आहे का?  माझे कर्त्यव्य तर मी विसरत नाही ना!  त्यात काही उणीव आहेत का?  समाज... समाजासाठी आपण काही करतोय का?  ह्या पूर्वी होऊन गेलेले आणि अजूनही समाजासाठी झटणारे मदर तेरेसा, बाबा आमटे ह्यांनी समाजाची सेवा करण्यात आपले मोठे सुख मानले आहे.   राष्ट्रासाठी शहीद होणारे वीर राष्ट्रासाठी प्राणाची आहुती देण्यात आणि आपल्याकडून समाजासाठी सेवा घडावी हेच मोठे सुख मानत आहे.  आणि मी?  आपण मात्र त्या शहीदांसाठी श्रद्धांजली तर सोडा, त्यांच्या स्मृतीही विसरून जातोय. 
     स्वतःसाठी संकुचित विचार करणारी माणसे सुख कधीच मिळवू शकत नाही.  वरून जरी आपल्याला अशी माणसे आनंदी दिसले, तरी आतल्या-आत आपण काहीच करू शकलो नाही ह्याची जाणीव त्यांनी कधी ना कधी नक्कीच होत असते.  ह्या गोष्टीचा परामर्श घेताना त्यात अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.  कवी कुसुमाग्रज म्हणतात... आपण धरणे बांधली, इमारती बांधल्या, कारखाने बांधले; पण मन? मन बांधायचे आपण विसरून गेलो.  खरंच... मन बांधणं आपण विसरून गेलो.   घडाळ्याच्या काट्यावर चालणारी माणसं आपण आजकाल मनाचे सुखच विसरून गेलो.  जे करतोय त्यात सुख शोधण्याचा आनंदच आपण हरवून बसलोय.

      माझे 'DAD' आणि 'मित्र' ह्या दोन्ही भूमिकेत असणारे डॉक्टर अनिरुद्ध जोशी ह्यांचे एक वाक्य मनाला अगदी जवळून स्पर्श करते, ते म्हणजे...
                       'छोटी बात को हम छोटी क्यो नही रख सकते?'

       उगाचच छोट्या गोष्टींचा आपण बाऊ करतो आणि स्वतः सोबत दुसऱ्यांनाही त्रास देतो.  जे आहे त्यात सुख शोधण्याऐवजी जे नाही ते मिळविण्यासाठी अट्टाहास करतो.  आपण विसरून जातो.. अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जवळ आहेत ज्यात सुख दडलंय... आणि सुख मिळवण्याच्या नादात आपण ते साजरा करायलाच विसरतोय.  
हो ना?
                                           
                                                                                   अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

Friday 1 January 2016

कविता #9 - नवीन वर्षाच्या शुभेच्छा! - Welcome 2016



नवीन वर्ष नवीन दिवस
नवीन स्वप्न नवीन संकल्पना,
नवी दिशा नवा ध्यास
असावा नित्य पुन्हा खास.


                  गेले दिवस उरल्या आठवणी
                  काही आवडी काही नावडी,
                  जुनी नाती नव्याने उलगडावी
                  प्रेम पावित्र्यात जपून ठेवावी.


नको सारे हेवेदावे
नको मागचे काही,

प्रेम रुपी सारे हवे
फुलाचे फुलणे नव्याने असावे.

                   राग मत्सर द्वेष
                 नसावा मनी लोभ,
                 विसरुनी हे सारे त्वेष
                 धरुनी संकल्परुपी प्रेम.

संकल्पनेचा नको नुसता
आरंभशूर फक्त आता,
नित्य स्वरूप पूर्ण रुपी
करुनी घे निश्चित 'संकल्प' आता.


                    करूया स्वागत नवं वर्षाचे
                  वाढवूनी रोपटे संकल्प बीजाचे,
                  धरुनी कास ध्येयाची
                  उंच आकाशात झेपावण्याची.

 
नवीन वर्षाच्या सर्वांना अनिरुद्धमय शुभेच्छा!
जय जगदंब जय दुर्गे.


                                               - अनुप्रिया सावंत.