Showing posts with label Article. Show all posts
Showing posts with label Article. Show all posts

Wednesday, 22 July 2026

लघुकथा #3 - Beyond Words!

    

    आयुष्याची गंमतच वेगळी आहे. रोज कितीतरी माणसं भेटतात. काही फक्त ओळखीची होऊन राहतात, काही आठवणी बनतात आणि काही नकळत आपल्या जगण्याचा भाग होऊन जातात. पण या सगळ्या भेटींमध्ये एक गोष्ट मात्र समान असते, आपण एकमेकांच्या सहवासात जगत असतो.


    सहवास म्हणजे फक्त एकत्र असणं नव्हे. तो कधी एका स्मितात असतो, कधी एखाद्या वाक्यात, तर कधी काहीही न बोलता दिलेल्या समजुतीत असतो. कितीतरी वेळा आपल्याला आठवतही नाही की, एखाद्या दिवशी आपण कोणाला काय बोललो होतो; पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला कसं वाटू दिलं होतं, हे मात्र मन फार काळ जपून ठेवतं.


    शाळेतल्या फळ्यावरचे धडे रोज बदलत असतात. कार्यालयातल्या फायली बदलत असतात. घरातल्या जबाबदाऱ्याही बदलत राहतात. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही, माणसाला माणसाची असलेली गरज. कुठल्याही वयात, कुठल्याही भूमिकेत आपण असलो, तरी आपल्याला समजून घेणारे शब्द, आपुलकीचा सहवास आणि मनाला हलकं करणारी माणसं हवीहवीशी वाटतच राहतात.


    निसर्गही आपल्याला हेच शिकवत असावा. आकाशाला क्षितिजाची घाई नसते, नदीला तिच्या प्रवाहाचा गर्व नसतो आणि झाडाला त्याच्या सावलीचा हिशेब नसतो. ती फक्त आपलं असणं जगत राहतात. कदाचित माणसाचंही तसंच असावं. आपल्या सहवासाने कोणाला आधार मिळाला, कोणाच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं किंवा कोणाचा दिवस थोडासा हलका झाला, तर त्यापेक्षा मोठी कमाई कोणती!


    दिवसाच्या शेवटी आपण किती कामं केली याचा हिशेब लागतोच. पण काही हिशेब असेही असतात, जे कुठे लिहिले जात नाहीत. ते फक्त मनात साठत राहतात. एखाद्या विद्यार्थ्याच्या आठवणीत, एखाद्या सहकाऱ्याच्या विश्वासात, एखाद्या मित्राच्या हसण्यात किंवा आपल्या माणसांच्या ऊबदार सहवासात.


    कदाचित म्हणूनच, आयुष्य आपल्याला मोठं होण्यापेक्षा सुंदर होण्याची अधिक संधी देत असतं. आणि सुंदर असणं म्हणजे फार काही वेगळं नाही, फक्त आपल्या सहवासाने कोणाचं तरी मन थोडंसं प्रसन्न होणं.


    कारण शेवटी, आपल्या सहवासाने कोणाच्या आयुष्यात मोठे बदल घडवणं आवश्यक नसतं; त्या प्रवासात त्याला एक सुंदर क्षण, एक हसरं स्मित आणि मनाला ऊब देणारी एक आठवण देता आली, तरी ते कमी नसतं.

                                 - अनुप्रिया सावंत

Saturday, 25 October 2025

"देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास!"


        आज आमच्या दोघींचा, एखादी गोष्टी तयार कशी करतात आणि कशा कराव्यात ह्यावर छोटासा संवाद चालू होता.  संध्याकाळी नकळत ती धडाधड तिच्या देवबाप्पाची गोष्ट सांगत गेली आणि मी हो हो करत तिच्या गोष्टीतले वाक्य तसेच्या तसे मोबाईलमध्ये लिहून घेत राहिले.  मला असे करताना पाहून तिला बरेच प्रश्न पडले.  तिने विचारलेही... तू काय करतेस आई?  आणि मग तिला मी तिचीच गोष्ट जशी तिने सांगितली तशी लिखित स्वरूपातली वाचून दाखवली.  


खरं तर दोघींना नवीन पैलू मिळत गेले आणि आज प्रथमच प्राजक्ताने तिला आकलन झालेली गोष्ट असेल, विचार असेल किंवा तिचा दृष्टिकोन असेल जे मी फक्त लेखणीतून मांडले.  


     हे अगदीच खरंय!  आपण मुलांना जे सांगतो त्याचा बॅक ऑफ द माईंड मुले खूप खोल विचार करत राहतात.  ती ऐकत असणाऱ्या अग्रलेख मधल्या कथा, 'प्रत्यक्ष'मध्ये येणारे शेवटच्या पानांवरील ललित लेखन, तिला वाचून दाखवत असणारे लेखन, कविता ह्या सगळ्या तिच्या बुद्धीला, मनाला ज्या भिडल्या त्या प्रमाणे आलेल्या तिच्या विचारांचा हा संगम आहे.  प्रत्यक्षपणे 🙏हरीकृपा ही केवलम्! श्रीराम!🙏


कथेचं नाव: "देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास!"

प्राजक्तावीरा सावंत (वय — ८ वर्षे)

लिहिण्याची तारीख: २८/०८/२०२५ (गुरुवार)


"देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास"!


एक मुलगा होता.  तो नेहमी खूप प्रश्न विचारत असे,

“हे असे का? ते असे का?” त्याला सतत प्रश्न पडत राहत होते.  तो स्वतःही खूप विचार करत असे,

“देवाने मला असं का बनवलं? तसे का बनवले?”


घरातले लोक त्याचे प्रश्न ऐकून कधी कधी कंटाळून म्हणत,

“तू देव बाप्पाला विचार.”


मुलगा खरंच गेला आणि गणपती बाप्पाला विचारायला लागला, गणेश उत्सव सुरू असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात बाप्पा आले होते.  त्याच्याही घरी आले होते.  


त्याने प्रेमाने बाप्पाच्या डोळ्यात बघत म्हटलं,  “बाप्पा, मी काय करु? मी कोणाला काही विचारलं तर म्हणतात, ‘ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, ह्याला विचार, त्याला विचार, उत्तर तर कोणीच देत नाही!’ आणि आज आई म्हणाली, ‘तू बाप्पालाच जाऊन विचार.’ आता मला तू तरी सांग.”


तो बोलत बोलत तिथेच झोपी गेला. स्वप्नात बाप्पा आले आणि म्हणाले, “बाळा, तू जे काही प्रश्न विचारतोस, त्याची उत्तरे तुला नक्की मिळतील.  मी उद्या तुला भेटायला येईन.”


सकाळ झाली. मुलाला वाटलं, “बाप्पा आता येतील, मग माझ्याशी बोलतील.”  पण बाप्पा आले नाहीत.  शेवटी तो कंटाळून पुन्हा गणपती बाप्पाला विचारतो, “तू तर आलाही नाहीस, भेटलाही नाहीस, आणि काही सांगतही नाहीस!”


तो बाहेर चालत चालत नदीकाठी गेला आणि शांत बसून विचार करू लागला,

“माझे प्रश्न इतके का आहेत? मला खरंच उत्तरे मिळणार नाहीत का? की मी जास्त विचार करतोय का?”


शेवटी तो आर्त स्वरात म्हणाला,

“हे गणेशा, मी कंटाळलो ह्या प्रश्नांनी.”


त्याच वेळी त्याच्या डोक्यावर एक हात आला.  तो डोळे उघडतो तर एक आजोबा हसत त्याच्याकडे पाहत होते. 


आजोबा म्हणाले, “बाळा, एवढा विचार करणे गरजेचे आहे का? काही प्रश्नांना लगेच उत्तरे मिळतात, काही प्रश्नांना थोडा वेळ लागतो. पण विश्वास आणि आपले कार्य दोन्ही चालू ठेवले पाहिजे. थोडा वेळ लागेल, पण मार्ग नक्की मिळतो.”


मुलगा फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला. आजोबांचा हस्तस्पर्श आणि बोलणे त्याच्या मनाला खूप आवडून गेले.


तो शांतपणे नदीकाठी बसून राहिला. येताना डोळ्यात खूप प्रश्न घेऊन येणारा मुलगा आता स्वतःमध्ये आनंद आणि विश्वास असलेला अनुभवत होता. त्याला समजलं की, काहीही प्रश्न असोत, माझा देव मला पाहतो आहे. माझा बाप्पा माझ्या नेहमी जवळ आहे, मार्ग दाखवण्यासाठी.


मुलगा पुन्हा आपल्या आजी आजोबांच्या घराकडे जायला निघतो.  दोन दिवस राहून आपल्या घरी जाणारे काही गणपती बाप्पा वाजत गाजत मिरवणुकीतून जात असताना एकच धून त्यात सतत वाजत असते,  ज्यावर सर्वच खूप आनंदाने नाचत असतात.

“बोलो भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा!”


आता मात्र त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास आणि शांतीची चमक अधिक वाढत जाते.  तो हसतो आणि मनात स्वतःशी बोलतो,


“प्रश्न विचारणे चुकीचे नाही; त्यातून मी शिकतो आणि तयार होतो. विश्वास ठेवणे आणि कार्य करत राहणे हेच महत्वाचे आहे. 


आम्ही प्रश्न विचारतो, आम्ही खूप अगावपणा करतो, आम्ही खूप रागावतो, आम्ही खूप भांडतो आणि आम्ही खूप खूप धम्माल पण करतो, कारण आमच्या बाप्पाला आवडते म्हणून.”

गणपती बाप्पा मोरया!


                                                                                    अनुप्रिया सावंत

Friday, 3 October 2025

लघुकथा #2 - Never Forget Your Roots!

Photo Source: Google
शाळेतील दुपारची वेळ होती. अभ्यासाचे तास संपले होते आणि कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती. समोरून शिक्षिका येताना दिसल्या. त्यांना पाहताच एक विद्यार्थिनी-शिक्षिका आदराने उभी राहिली.


शिक्षिका थोडं थांबल्या, हलकंसं स्मित करत म्हणाल्या,

“प्रत्येक वेळी असं उभं राहण्याची गरज नाही गं!  मी इतकी मोठी नाहीये.”


त्यांचा मृदू आवाज मनाला भिडला. त्या क्षणी बालपणात शिकवलेले संस्कार डोळ्यांसमोर आले.  गुरुजनांप्रती आदर, मोठ्यांचा सन्मान, नम्रता हे सगळं वागण्यात नकळत प्रकट झालं होतं.


काही दिवसांपूर्वीच प्रिन्सिपल मॅडम भेटल्या होत्या. विद्यार्थिनी शिक्षिका नेहमीप्रमाणे उभी राहिली. त्या हसत म्हणाल्या,


“बस, गरज नाही उभं राहायची.”


ती बसली, पण मनात मात्र अस्वस्थता जाणवली. थोड्या वेळाने नम्रपणे म्हणाली,


“मॅडम, मी कंफर्टेबल आहे. तुम्ही आहात तोपर्यंत मला उभं राहायचं आहे.”


क्षणभर शांतता पसरली.  मॅडमच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं.  त्यांच्या नजरेत एक भाव स्पष्ट दिसत होता.  ही कृती शरीराने होत नाही, ती मनातून उमटते.  संस्कारांची खरी ताकद अशा न बोललेल्या क्षणांत जाणवते हे मात्र तितकेच खरे!


त्या संध्याकाळी घरी निवांत वेळ मिळाला. गरमागरम चहाच्या वाफेत मी आणि आई गप्पा मारत बसलो. शाळेतील प्रसंग सांगताना आई शांतपणे ऐकत राहिली. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. ती म्हणाली,


“हे त्या बाळामध्ये असणारे संस्कार आहेत अनु. शिक्षकांनी, मोठ्यांनी लावलेली बीजे वागण्यातून उमलतात.  

म्हणूनच म्हणतात — "मूळ कधी विसरू नये."


त्या शब्दांतला गहिरा अर्थ मनात कोरला गेला. चहाच्या कपात फक्त चहाचा स्वाद नव्हता, तर नात्याचं उबदारपण, संस्कारांची जाणीव आणि आठवण होती.


रात्रीच्या शांततेत विचार मनात फिरत राहिले. शाळेतील जुन्या दिवसांची आठवण झाली. शिक्षक केवळ विषय शिकवत नव्हते, तर आयुष्य जगण्याचे मूल्यही देत होते. आदर, नम्रता, कृतज्ञता या गोष्टी कुणी दररोज सांगून शिकवलेल्या नव्हत्या; त्या बालपणातच मनात रुजलेल्या होत्या.  


संस्कार हे कृत्रिम नसतात. ते लहान लहान कृतींमधून झळकतात.  शिक्षक वर्गात आले की उठणं, नमस्कार करणं, मोठ्यांशी संवाद साधताना आदर राखणं.  या सगळ्या कृती नियम म्हणून नव्हे, तर भावना म्हणून घडतात.


हो, हे अगदी खरं आहे.  या सगळ्या अनुभवातून एक महत्त्वाची शिकवण स्पष्ट झाली ते म्हणजे, संस्कार हे कृतीतून नव्हे तर नजरेतून, मनापासून आणि भावनांमधून प्रकट होतात.


मुळे घट्ट असतील, तर व्यक्तिमत्त्व स्थिर उभं राहतं.


आजच्या आधुनिक काळात बऱ्याच गोष्टी बदलत आहेत, पण एक गोष्ट कायम राहायला हवी, ती म्हणजे आपल्या मुळांप्रती 'कृतज्ञता'. कारण मुळेच झाडाला बळ देतात, आणि संस्कारच व्यक्तिमत्त्वाला दिशा देतात.


त्या छोट्याशा प्रसंगाने जीवनाची मोठी शिकवण दिली.

 “Never forget your roots — कारण तेच आपल्याला खरं मोठं बनवतात.”

                                                  - अनुप्रिया सावंत

Monday, 1 September 2025

नाटिका: समर्पण

     आज खरं तर लेख लिहिण्यापेक्षा मला काहीतरी वेगळं लिहिण्याची ओढ लागली होती.  आणि ती समर्पणाची ओढ खऱ्या अर्थाने समर्पण रुपी लेखणीतून उतरली.   निमित्त जरी शिक्षक दिनानिमित्त छोटासा भावना व्यक्त करणारा लेख असावा, असे जरी वाटले तरी हे जे समर्पण मांडले गेलंय ते फक्त केवळ त्यांच्याच स्फूर्तीमुळे. 


सिखने के लिये सिखाओगे तो सीख पाओगे…

किसी को सिखाने के लिये सिखाओगे तो कभी नही सीख पाओगे!


     बघायला गेले तर जणू काही आताच्या काळातली catchy लाईन असावी, जी खऱ्या अर्थाने त्यांच्या निर्मळ शुद्ध भावनेतून, विचारांतून मला जणू कळत नकळत लाभलेली शिकवण असावी आणि हेच समर्पण त्यांनी माझी गुरुदक्षिणा पुष्प म्हणून स्वीकारावे ह्या पेक्षा मोठा आनंद तो काय!  


नाटिका: समर्पण

(शिक्षक दिनाचा कार्यक्रम नुकताच संपला आहे. दोन शिक्षिका बेंचवर बसलेल्या आहेत. मुलांनी दिलेली ग्रीटिंग्ज, फुलं आणि सोबतीला हक्काचा चहाचा कप. वातावरण हलकंफुलकं, पण चर्चेला उधाण येणार आहे. पार्श्वभूमीत विद्यार्थ्यांचा गडबडाट आणि हलके स्वरात श्लोक/गाणी ऐकू येत आहेत.)


शिक्षिका १ (हसत, फुलांकडे बघत):

किती गोड ग्रीटिंग्ज दिली आहेत मुलांनी!  खरंच, त्यांच्या निरागस डोळ्यातलं प्रेम पाहून मन भरून आलं.


शिक्षिका २ (मस्करीत):

हो ना!  ही फुलं आपल्या शिकवण्याला मिळाली आहेत, आपल्या चेहऱ्याला नाही.


(दोघी हसतात. थोडा वेळ शांतता.)


शिक्षिका १ (थोड्या गंभीर स्वरात):

आजचा दिवस नेहमीच विशेष वाटतो.  पण मला एक गोष्ट नेहमी हृदयाला स्पर्शून जाते, आपण शिक्षक असूनही अजून शिकतच आहोत.  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांतून, त्यांच्या उत्सुकतेतून, त्यांच्या निरागस उत्तरांतून… कधीकधी त्यांच्या बंडखोर वृत्तीतून सुद्धा, रोज नवं काहीतरी कळतं.


शिक्षिका २ (मान डोलावत):

हो, अगदी खरं आहे.  पण एक गोष्ट नक्की, शिकवणं आणि शिकणं यात फार मोठा फरक आहे.

जो शिकायला तयार असतो, त्याला शिकवणं आपोआप जमतं.

पण जर मनात फक्त 'मी शिकवतेय' एवढंच ठेवलं, तर खरं शिकणं कधीच होत नाही.

'धडा शिकवणं आणि धडा शिकणं', ही जणू दोन टोकं आहेत, पण दोन्ही आवश्यक आहेत.


शिक्षिका १ (उत्सुकतेने):

म्हणजे तुझं म्हणणं काय आहे?


शिक्षिका २ (हळू पण ठाम आवाजात):

सिखने के लिये सिखाओगे, तो सीख पाओगे…

किसी को सिखाने के लिये सिखोगे, तो कभी नही सीख पाओगे!


शिक्षिका १ (विचारात):

म्हणजे?


शिक्षिका २ (शांत स्वरात):

हल्ली बऱ्याचदा आपला अहंकार आपल्यापेक्षा मोठा व्हायला लागतो.

आणि आपण चांगल्या गोष्टींपेक्षा चूक कुठे आहे? यावरच जास्त लक्ष केंद्रित करतो.

तिथेच गफलत होते आणि छोटी गोष्ट मोठी होते.  हे मला नेहमी खटकतं.


खरं सांगायचं तर – “छोटी बात को हम छोटी क्यो नही रख सकते?”


शिक्षिका १ (विचारात):

बरोबर आहे. आपण बरंच काही चुकांमधून शिकू शकतो, पण त्याऐवजी आपण समोरचा कधी चुकतोय?  आणि मी त्याला कधी एकदा पकडतोय, यावरच वेळ घालवतो.


कधी आपण एक विचार असाही करतो, “मी मोठी आहे तर माझं ऐकलंच पाहिजे”… किंवा “माझी पोस्ट मोठी म्हणून माझा अहंकार जणू सुखावला पाहिजे”.  पण आपण शिक्षक असूनसुद्धा, 'शिक्षक' आहोत हेच विसरतो.


शिक्षिका २ (हसत-उपरोधाने):

हो! आणि कुणी खराखुरा, मेहनती दिसला, तरी आता कौतुकापेक्षा अर्थहीन चर्चाच जास्त ऐकू येतात.  आणि हे हल्ली प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते.


एखादी गोष्ट छोटी करून सोडवता येईल का हे बघण्याऐवजी, “समोरच्याची चूक कशी दाखवता येईल?” यातच जास्त लक्ष जातं.

मोठेपणाचा अहंकार म्हणजे खरंतर एक मोठ्ठा दगड आहे, ज्यावर आपणच डोकं आपटून घेतो!


(काही क्षण शांतता.  शाळेच्या अंगणात लाऊड स्पीकर वर श्लोक चालू आहे , “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः…”)


शिक्षिका १ (थोडं थांबून):

आपल्याला बर्‍याचदा वाटतं की “मला खूप काही येतं, माझा इतका अनुभव आहे, मी अमुक आहे, तमुक आहे…”

आणि मग समोरच्याचं बोलणं आपण आपल्या सो कॉल्ड EGO वर घेतो.

पण खरं सांगू? जिथे EGO येतो ना, तिथे व्यक्ती म्हणून स्वार्थ नक्कीच शिरतो.

हा EGO म्हणजे अगदी शत्रू!  सोयीस्कर चांगल्या गोष्टी विसरतो.


थोडा है थोडे की जरुरत है!


एखादी गोष्ट छोट्या प्रमाणात सोडवली तर झालं असतं, पण नाही… आपल्यातला लपलेला अहंकार दगडासारखा आडवा येतो आणि आपणच त्यावर डोकं आपटून घेतो.


शिक्षिका २ (हसत मंजूर करत):

हो अगदी खरं!

बर्‍याचदा आपण वेळ घालवतो तो 'समोरच्याची चूक कशी दाखवता येईल?' ह्यावर. पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे त्या वेळेत स्वतःला आणि देणाऱ्यालाही काहीतरी चांगलं देणं.


चुका सगळ्यांकडून होतात, पण त्या शोधत बसण्यापेक्षा त्यातून शिकणं जास्त महत्त्वाचं आहे.


शिक्षिका २ (खळखळून हसत):

हो! हल्ली चर्चेचं पीक भारीच आलंय!

कौतुकाचं खतच नाही उरलं म्हणायचं!


शिक्षिका १ (गंभीर होत):

पण मग उपाय काय?  आपणही त्यांच्यासारखं करायचं का?  की काही गोष्टी NEGLECT करायच्या?  पण हे NEGLECT करण्याचंही प्रमाण कसं ठरवायचं?


शिक्षिका २ (संयमाने):

अगं उपाय फार अवघड नाही.  जोपर्यंत तुला तुझ्या कामात आनंद मिळतो, तो आनंद फुलाच्या सुगंधासारखा पसरवायचा.  शिक्षक म्हणून आपले विद्यार्थी आपल्या शिकवणीतून फक्त  धडा शिकणार नाहीत,  तर नकळत ते प्रेम, ती आत्मीयता, तो आनंद, शिकण्याची जिद्द आणि प्रेरणा घेऊन जातील.  आणि हीच गोष्ट त्या-त्या क्षेत्रातील अगदी प्रत्येकाला लागू होते, बरं का!


शिक्षिका १ (उत्साहाने, डोळ्यात चमक):

वा! म्हणजे लक्ष इतरांवर नाही, तर माझ्या कार्यातून स्वतःला व स्वतःसोबत इतरांना काय चांगलं देता येईल ह्यावर हवं.  

म्हणजे... जणू परीस स्पर्शे सोने व्हावे!


शिक्षिका २ (मिश्कील टोनमध्ये):

हो… आणि बाकी लोकांचं?

त्यांचं MUTE BUTTON ऑन करून टाकायचं!

नुसतं दुर्लक्ष नाही, तर त्यांच्या गोष्टींना त्यांच्या जागी ठेवून आपला वेळ आणि उर्जा दोन्ही वाचवायची.


शिक्षिका १ (हसत, डोकं हलवत):

खरंय! शेवटी समाधान तेव्हाच मिळतं, जेव्हा आपलं काम पूर्ण केल्याची जाणीव होते.

एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद – तीच तर खरी कमाई!

एक व्यक्ती म्हणून समाजाचे लागणारे देणं  हेच तर खरं 

समाधान!


शिक्षिका २ (हात जोडत, हसत):

हो… तोच खरा समर्पण!


(दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. मंचावर हलका प्रकाश पसरतो. पार्श्वभूमीत श्लोकाचा आवाज वाढतो. पडदा हळूहळू खाली येतो.)


                                                                  - अनुप्रिया सावंत

Friday, 10 May 2024

शिदोरी - लव्ह यू जिंदगी💞

निळभोर आकाश, चंदेरी रुपेरी वाळू, समोर लाटांवर स्वैर होणारा मुक्त आणि अथांग समुद्र आणि समुद्राला शोभा देणारी, त्याचे अस्तित्व जाणवून देणारी नारळाची उंच उंच झाडी.  


सागराचा साथी असणारा त्याचा एकमेव किनारा ज्याच्यावर हक्क गाजवताना आपल्याला साऱ्या जगाचा विसर पडतो.  


ह्या सागराच्या खोलीचा थांगपत्ता कधी लागणं खरंच शक्य नाही.  अगदी प्रत्येकाच्या मनासारखं.  पोटात अनेक गोष्टी दडवून ठेवल्या असतात.   त्याच्यासोबत अनेक जीवांना सांभाळत आपले कार्य पूर्ण करत त्याचा प्रवास मात्र चालूच असतो, अगदी अनादिकाळापासून अनंतापर्यंत.  त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेताना गडद होऊन गुडूप व्हायला होत.  अगदी कितीतरी रहस्य दडवून तो तसाच त्याच्या साथीदारांसोबत खळखळत असतो.  त्याचे अश्रू कधी दिसत नाही, मात्र जाणीव होत राहते.  


राग, आनंद, दुःख, वेदना, जाणीव, लोभ, प्रेम, त्याग अगदी सर्वच.  भावनेचा पुरही वाहून जातो, त्यात अनेक गोष्टींचा उच्छाद मांडला जातो, कधी मनासारखं तर कधी मनाविरुद्ध.  कधी तर खवळल्यासारखं अगदी बाहेर किनाऱ्यावर फेकून देतो.  तर कधी त्या किनाऱ्यावर संथपणे तरंगत राहतो आणि पुन्हा परतीचा प्रवास करत त्याच्या दाट खोलीत सामावून जातो.  


हा सागर त्याचं कार्य कधीच विसरत नाही.  किंबहुना त्याला त्याच कार्य विसरून चालतच नाही.  म्हणूनच तो त्याचं भान हरपून जगतो आणि जगताना त्या आकाशाला पुन्हा नव्याने मिठी मारत साद घालत राहतो, कारण त्याला त्याची डेस्टिनी माहीत असते.  अशी डेस्टिनी जी त्याच्या कार्याला पूर्णत्व देते.  कसलीही अपेक्षा न करता तो फक्त निर्सगाच्या सानिध्यात स्वतःला झोकून देतो आणि तेच खर त्याच अस्तित्व असत.


माणसाच्या आयुष्याचं ही तसच तर असत.  कुठे थांबायचं हे आपलं आपल्याला कळायला हवं.  मला हे हवंय किंवा मला हे मिळालच नाही म्हणून स्वतःला कोसत राहण्यापेक्षा आपला किनारा आपण सांभाळायला हवा.  


सागर जेव्हा समुद्राचा किनारा सोडून वाहतो तेव्हा त्याच्या कृतीने बऱ्याच गोष्टी हातापलिकडे जातात ज्यांना सांभाळणं कठीण होत.


आपल्या आयुष्याचा किनारा सुद्धा असाच आहे, तो ओलांडला की मार्ग हरवतोच. 

 

आपली मर्यादा माहीत पाहिजे हे नक्की, 'But remember that Sky is the only limit.' 


आयुष्य जगायचं असेल तर समुद्रासारखे जगले पाहिजे.  सगळ काही सामावून सुद्धा नामा-निराळा.  आहे त्यात सुख शोधून आपली डेस्टिनी मिळवणारा.  सतत खळखळणारा, कधी संथ होऊन वाहत राहणारा, तर कधी लाटांवर मुक्तपणे संचार करणारा.  


आयुष्य म्हणजे एक सुंदर फुल आहे.  त्या फुलात देवाने त्याचा सुगंध अगदीच भरभरून दिला आहे.  त्या फुलाला जपत त्याचा ताजेपणा बहरत ठेवणं हे आपलं कार्य आहे.  कारण मनुष्य हा 'प्रवासी' आहे.  प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, मात्र परतीचा प्रवास प्रत्येकाला सारखाच आहे.


आदमी मुसाफिर है

आता है जाता है|

आते जाते रस्ते मे 

यारी छोड जाता है|


आपण कोण आहोत हे लोकं नक्कीच विसरून जातील.  मात्र आपण काय आहोत, काय केले आणि कसे जगलो हे नक्कीच लक्षात राहतं.  


आमची आई नेहमी सांगते...

"Say yourself just... Love you Jindagi💞".

                                                            

                                                                  - अनुप्रिया सावंत.

Friday, 3 May 2024

लघुकथा #1 - Be Optimistic!


चिनू शाळेतून रडतच घरी आली.  आल्या-आल्या हातपाय न धुता तशीच नाराज बसली.  देवघरातील अगरबत्तीचा सुवासाने तिला प्रसन्न वाटत होतं.  तरीही शाळेतल्या गोष्टीमुळे ती पुन्हा उदास झाली.  आईने तिला स्वच्छ हातपाय धुवून तयार होण्यास सांगितले.  छोटी चिनू आज्ञाधारक बाळाप्रमाणे तशीच उठून हातपाय धुण्यास गेली.  


गरम गरम शिऱ्याचा खमंग वासाने चिनुची मोठी ताई चिऊ बाहेर आली.  अभ्यास करून तिच्या खोलीतून नेहमीप्रमाणे नाश्ता करायला येत असताना तिचं लक्ष आपल्या छोट्या चीनुकडे गेलं.  आपल्या छोट्या बहिणीला असं रुसलेल बघून तिने आईला नजरेनेच काय झाले ते विचारले, त्यावर आईने डोळ्यांनीच थोडा वेळ थांब सांगितले.  


चिनू नाश्त्याला बसल्यावर आईने गोड हसून तिला हळूच साद घातली तशी चिनू आईला घट्ट बिलगली.


अगदी लहान निरागस बाळासारखं मुसमुसतच शाळेत निंबंध स्पर्धेतल्या तिचा क्रमांक कसा हुकला ते रडत रडत आईला सांगायला लागली.  चिनुला तस करताना पाहून चिऊ ताईला हसूच आले.  तसं आईने डोळे मोठे करून चिऊला गप्प केले आणि गोड हसून मायने चिनुच्या डोक्यावरून हात फिरवला.  


स्पर्धा नेहमी चालूच असतात.  क्रमांक हुकला म्हणून रडण्यापेक्षा तू स्पर्धेत सहभाग घेतलास हीच गोष्ट तुला पुढे यश देणार आहे.  


क्रमांक हुकला म्हणून त्यासाठी आज रडत बसून नाराज होण्यापेक्षा पुन्हा नव्या जोमाने तयार होऊन येणाऱ्या संधीला हसून साद घाल. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, आपण त्यात रंग भरले पाहिजे.


प्रत्येकाच्या बाबतीत छोट्या-मोठ्या गोष्टी कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध होतच असतात.  


त्यातही गंम्मत म्हणजे प्रत्येक वेळी नवीन गुपित उलगडावं तसं नवीन ज्ञानाचं भांडार खुले होत असते.


म्हणतात ना, जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक मार्ग उघडे होत असतात.  फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे.


छोट्या छोट्या गोष्टीत रडण्यापेक्षा ऑप्टिमिस्टिक राहण्यात खरं सुख आहे.  त्या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.  तरंच खरी मज्जा! 


काय?  पटतंय ना!  


थोडा है, थोडे की जरुरत है|


आईचे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहून दोघींना नेहमीच खूप छान वाटायचं.   


आपल्या आईला जादू की झप्पी देत चिनू आणि चिऊ दोघींनीही हसून मान डोलावली आणि देवघरातील अगरबत्तीच्या सुंगांधासारखा विचारांतला सुंगंध प्रसन्नतेने सर्वत्र दरवळला.


                                                                - अनुप्रिया सावंत.

Wednesday, 2 June 2021

लेक

 
  

     बीज अंकुरत पालवी फुटायला लागली की हळू हळू मोठे होत जाणारे रोपटे झाडांचा आकार घेत वृक्षात रूपांतरित होते.  आपणही वयाने त्यांच्यासोबत मोठे होत असतो ही जाणीव मनाला सुखावत जाते. आणि जसे हे निसर्गाचे नाते घट्ट होत जाते तसे निसर्ग आणि अनुभव ह्यांचे विश्व एकमेकांत समरस होत जाते.  माझ्या आईला झाडांची फारच आवड.  नेहमी छोट्या कुंडीत झाडे लावणे, जोपासणे, त्यांना पाणी घालणे, त्यांना टवटवीतपणा येण्यासाठी पाण्याचे अधूनमधून सिंचन करणे ह्या छंदात तिला रमताना पाहून वेळ कसा जायचा कळायचेच नाही.  तिला मी त्यांच्यासोबत बोलताना पाहिले, त्यांच्या भावना जाणून घेताना तिच्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव मी जवळून पाहिले आहे.  जणू आईच ती त्या रोपट्यांची!  


     आपल्या बाळाची काळजी आई जशी घेते तशीच काळजी ती झाडांची घ्यायची.  आमच्या बाल्कनीत अनेक झाडे लावली होती.  ती झाडे त्यांच्या आकार विस्तारते झाले की त्यांना अजून पोषक वातावरण मिळावं म्हणून तिने आमच्या बगीचेत त्यांचे भरण पोषण केले.  शाळेतून येताना जाताना त्यांना बघताना वेगळाच आल्हाद जाणवायचा. आम्ही दोघं भावंडं नेहेमीच एकमेकांना टाळी देत म्हणायचो, ही तर आपल्या आईची बाळं आहेत, म्हणजे आपले भाऊ बहीण झाले.  


     शाळेत शिक्षिका असलेली माझी आई मृदू, शांत आणि सतत काही न काही नवीन करण्यात नेहमीच गुंतलेली असायची.  शाळा, घर, मुले आणि तिचं फुलत असलेलं नंदनवन हेच तिचं जीवन.  आणि ते जीवन जगताना त्यात नव्याने सातत्यपूर्ण आनंद ती छोट्या छोट्या गोष्टीतून घ्यायची आणि त्याची सवय आम्हालाही तिने करून दिली.  कुठलंही काम असो तिच्यातील सळसळता उत्साह नेहमीच कामासाठी एनर्जी देत असायचा.  


     आम्ही दोघेही बहीण भाऊ भरपूर मस्तीखोर.  काही न काही सतत एकमेकांच्या कुरघोडी काढत रुसवा फुगवा करत राहायचो.  तरीही न थकता, न दमता तिच्या कलेने आम्हाला छान समजावून सांगायची.  ती शाळेतून घरी यायची तेव्हा आम्हाला खिडकीत बसून वाट पहायला खूप धम्माल यायची.  कारण येताना आम्हाला भरपूर खाऊ  आणायची ती बाजारातून.  अर्थात त्यात फळांचे प्रमाण अधिक असायचे.  जेवणात पालेभाजी असायलाच हवी हा तिचा आग्रह असायचा.  जशी तिला आमच्या आहाराची काळजी असायची तशीच ती तिच्या बागेची तिथल्या प्रत्येक झाडांची काळजी तेवढ्याच तत्परतेने घ्यायची.  


     शाळेतल्या अनेक गरजू मुलांच्या पुस्तकांची शाळेच्या फीची व्यवस्था करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना शिकण्यास प्रोत्साहित करत असायची.  तिचा अध्यापनाचा दर्जा पाहून सरकारकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या माझ्या आईचा आम्हाला अभिमान असला तरी तिने ह्या गोष्टीने हुरळून न जाता सातत्यपूर्ण सकारात्मक कार्य करण्याची जिद्द आमच्यात रुजवली.


     आईने तिच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या.  आमचे शाळा, कॉलेज होऊन दोघेही नोकरीवर रुजू झालो.  बघता बघता संसारही सुरू झाला.  आमच्या बागेतील झाडांना आता फळे फुले बहरत होते आणि त्याचा आनंद आजीच्या मांडीवर बसून त्यांचे नातवंड घेत होते.  अजूनही आई जेव्हा जेव्हा बाहेर कामानिमित्त जाते तेव्हा तेव्हा आम्ही त्याच ओढीने ती घेऊन येणाऱ्या खाऊचे वाट पाहत असतो आणि आता तर तिचे नातवंडेही.


     माझ्या आईंनी मला संसारात अडकून राहू नये, म्हणून सतत माझ्या कलेला पाठिंबा देत मलाही शिक्षक ते प्राध्यापकापर्यंतचा प्रवास घडवून आणला होता.  माझ्या दोन्ही अहो आई आणि ए आईने माझ्या प्रपंचाचा भार आपापल्यापरीने हलका केला होता, असं मी नेहमीच माझ्या सख्यांना सांगते.  खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये खूप विलक्षण शक्ती असते, त्याची जाणीव व्हायला हवी.  माझ्या दोन्ही माऊली माझ्यासाठी खूपच विलक्षणच आहेत.


     सकाळी लेकीचा फोन येऊन गेला होता, घरी जाताना भेटायला येणार आहे सांगितलं.  आणि तसंही अजून बऱ्याच गप्पा प्रत्यक्ष भेटून करायच्या आहेत.  तिच्या येण्याची वेळ होत आलेली, थोडा चहा बनवून घेऊ म्हणजे आल्यावर एकत्र बसून चहा पिताना गप्पांचा मनमुराद आनंद घेता येईल म्हणून चहा ठेवायला आत आले.  चहाचे वाफाळत्या धुक्यांचे आवरण मला पुन्हा माझ्या विचारांच्या दुनियेत घेऊन आले.  


     आज घरात बऱ्याच दिवसांनी निवांतपणा मिळाला.  गौरीशा, गणेश दोन्ही मुलं आता आपापल्या संसाराला लागली.  तरीही गौरीशा मात्र अजूनही तिच्या दोन्ही घरांना घट्ट जोडून आहे.  गौरीशा माझी मोठी मुलगी.  मुली पटापट मोठ्या होतात असं म्हणतात.  पण माझं तर ठाम मत आहे, मुली त्याहीपेक्षा लवकर समजुतदार आणि कर्तव्यदक्ष बनतात.  स्वयंपाकाची आवड नसलेली गौरी किचन किंग म्हणून कधी ताबा घेता झाली कळलंच नाही.  अगदी लहान असतानाच तिने स्वतःची आवड कलामध्ये जपून स्वतःचा घरगुती क्लास मोठ्या स्वतंत्र कोचिंग क्लासमध्ये जिद्दीने रूपांतरीत केले.   ह्या गोष्टी करताना तिचे घराकडे मात्र कधीच दुर्लक्ष झाले नाही.  माझ्या आणि लेकीच्या नात्याची जागा आमच्या मैत्रीने केव्हाच घेतली.


     माझं ऑफिस ते घर हा वेळ नऊ तासाचा असायचा.  आईप्रमाणे मी देखील शिक्षिका म्हणून रुजू झाले होते आणि कालांतराने प्राध्यापक म्हणून नियुक्तही झाले.  घरातील कामे, शाळेतील मुलांचे पेपर, रिझल्टस ह्यात आमच्या आईंचा नेहमीच हातभार असे.  त्यामुळे, मुलांना माझ्यापेक्षाही जास्त लाड त्यांच्या आजीच्या चमचमीत पदार्थातून मिळून पुरवले जात.  नोकरी सांभाळून कुटुंब सांभाळणे हे एक आव्हानच मानते.  मला हे शक्य झाले ते केवळ  घर, नोकरी आणि कुटुंब ह्यांना जोडणारे मुख्य दुवे असणारे माझे 'अहो आई' आणि 'ए आई' ह्या दोघी आणि त्यांचे असलेले खंबीर पाठबळ आणि आधार.  मुलं ह्यांच्या संस्कारक्षम बीजात संस्कारीत होत होती.  घरी आल्यावर त्यांच्या आजीच्या गोष्टी ऐकण्याची हौस आमच्या दोघांचीही मनसोक्त पूर्ण व्हायची.


     घरातल्या भिंतींना बहर फुलत राहतो, जेव्हा घरात स्त्री असते.  हो, खरंच ही गोष्ट मला मनापासून मोहित करते.  मला सहज आठवलं म्हणून हा विषय.  बऱ्याच वर्षापूर्वी एका शाळेत डेमोसाठी मला बोलावण्यात आलेले आणि महत्वाचं म्हणजे त्यांची काही अट नव्हती की, पाठच घ्या किंवा कविताच घ्या किंवा व्याकरणच सादर करा.  पण मी मात्र तिन्ही गोष्टी व्यवस्थित तयारी करून गेलेले.  रस्त्यातून जाताना अगदी सहजच विचार आला आपल्याला दहा मिनिटांत त्यांनी डेमो द्यायला सांगितला आहे, तर काय बरं द्यावा?  पाठ घ्यावा? कविता घ्यावी? की व्याकरण मस्त घेऊ?  हे की ते करत मी शाळेचा गेट गाठला आणि आता मात्र मला विचार करायला काहीही फुरसत नव्हती.  


     पूर्ण वर्ग भरत आलेला जाणवला, ते विद्यार्थ्यांनी भरलेले नव्हे तर भावी शिक्षकांनी.  एक एक करत डेमोचे टप्पे पार पडत होते.  आता माझ्या आधी अजून एक शिक्षिका होती, तिच्या नंतर माझा डेमो ठरलेला, मात्र अचानक त्यांनी मला आधी डेमोला बोलावलं.  झालं.... आता मात्र माझं एक पक्क होतं की मी कविता घेते.  डेमोला विद्यार्थी नसून शिक्षक आणि शाळेचे मुख्य कॉर्डिनेटर बसले होते.  क्षणभर थांबले आणि मग जी गाडी माझी सुरू केली, ते अगदी ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेगवान झाली.  माझ्या कवितेचे नाव होते 'लेक'.


     गाडी गिअर मध्ये व्यवस्थित आल्यानंतर काय उदाहरण द्यावं? हा प्रश्नच मला पडला नाही.  त्यांच्याच नजरेतून विविध अनुभव विश्व मांडताना, मला उदाहरणे शोधावी लागलीच नाही.  ती अलगद उलगडली जात होती.  कारण आपला विषयच हार्ड.  त्यात मी एवढी समरस झाली, की मला बराच वेळ विसर पडला की, आपल्या समोर विद्यार्थी नसून अध्यापक आहेत, जे अनेक वर्षांपासून अनुभवी शिक्षक म्हणून वावरत आहे.  


     थोडक्यात, आपली कला आपल्याला सादर करायची असेल, तर त्या कलेला कोणतेही निमित्त अगदी चपखल बसते, हे माझ्या आईचे तत्वज्ञान.  विषयाचे विषयांतर झाले तरी, जर विषयाला प्रवाह योग्य असेल, तर आनंद घ्यायला व द्यायला आणि रसग्रहणाची निर्मिती करायला तुम्हाला आम्हाला रसिक हे व्यासपीठ आपला कणाच असतो.  


     बॅक टू टॉपिक.  मुलगी घरात असेल तर आईवडिलांना नुसती घरकामात मदत होते असे नाही, तर तिच्यात सतत नावीन्य भरलेले असते.  माझ्या मुलीला काही न काही सतत नवीन प्रयोग करण्यात जो आनंद मिळतो, त्यापेक्षा तो आनंद पालक म्हणून पाहताना गुणाकाराच्या पटात भर पाडत राहतो.  भाऊ-भाऊ मिळून जेवढे पराक्रमी नसतील, तेवढे अतुल्य पराक्रम हे दोघे भाऊ बहीण सतत एकमेकांच्या खोड्या काढून गाजवतात.  एखादा जरी रुसला तरी, त्यांच्यात असलेला आनंद किंवा नाराजी त्यांना स्वस्थ बसू देत नाही.  तरीही, ह्या सगळ्यात केंद्रीत असते ती 'लेक'.  


     घरात आई आजारी असेल तर ही लेक मात्र आईच्या भूमिकेत यायला सांगावं लागत नाही.  वडिलांची औषधं, भावाचा डब्बा, स्वयंपाक सगळं कसे अगदी माझं म्हणून करते.  हे माझंपण मला त्या प्रत्येक लेकीत दिसते.  म्हणूनच कदाचीत, शाळेतला अध्यापनाचा तो अनुभव ह्या लेकीने आधीच अध्ययन करून घेतला असावा.


     प्रवासात ये-जा करताना एक वाक्य मला नेहमीच दिसत असते, 'नसीब वालोंके घर लडकी होती है|'  मला हे वाक्य बघून स्त्रीत्वाचा अभिमान वाटतो.  आणि हीच ती 'लेक' स्त्री जीवनातील तिच्या प्रत्येक क्षणी अगदी तत्पर आणि कर्त्यव्यनिष्ठ असते.  मग तीची भूमिका मुलगी म्हणून असो की सून म्हणून.  कारण मायेच्या स्पर्शात लेकीला जबाबदारीचे ओझे कधीच होत नसते.


                                        - अनुप्रिया सावंत.

Friday, 22 January 2021

डिजिटल माईंड



         आपण प्रत्येक जण सतत काही ना काही विचार करत असतो.  काहीजण तो विचार मनात करतात, काही जण आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करतात, तर काही जण तो लिहून व्यक्त करतात.  प्रत्येक जण व्यक्त होत असतोच, पण प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे मार्ग मात्र वेगवेगळे असतात.  बऱ्याचदा आपण आपल्या मनातले विचार झटकून टाकण्यासाठी असो किंवा आपल्या विचारांना दिशा देण्यासाठी असो, कुठेतरी मन रमवत असतो.  अगदी बोटावर मोजण्या इतके लोक असतील, जे आपला वेळ सत्कारणी लावत असतात.  ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपला वेळ वाया घालवतो.  इतकंच आहे की अनेकदा उचित ठिकाणी तो देता येणे आपल्याला उमजत नाही.


     आम्ही नाही बाबा त्यातले, आम्हाला नाही जमत हे वेळ सत्कारणी लावणं वैगरे. तुम्ही मोठी माणसं.  आहे तोच वेळ पुरत नाही आणि म्हणे वेळ सत्कारणी लावा(मुरडले नाक :)).  आम्हाला काही कमी टेन्शन आहे का?  असे एक ना अनेक उत्तरे आपणच स्वतःला देत असतो आणि देत राहतो. नाही का?


     माझंच घ्या, किती दिवसापासून म्हणते, कि काही तरी नवीन करावं, आपला वेळ लावावा सत्कारणी.  पण, हा विचार काही प्रत्यक्ष उतरताना दिसला नाही.  हो कि नाही!  बघा, तुमचा माझा विचार एकच झाला.  हे असं करत अनेक महिने लोटले बघा, हा 'पण' काही करू देईना! 

पण अगदी खरं सांगू का?  तुम्हाला म्हणून सांगते हा!  

काही मनाला खटकलं ना, कि बरोबर गाडी रुळावर येते बघा. 

अहो हसताय काय?  खरंच.  

     आपल्याला कधीच वेळ नसतो.  आणि वेळ काढायला तर वेळ नसतोच नसतो.  पण जर कोणत्या बाबतीत आपलं मन खट्टू झालं कि बरोबर आपल्याला आपला वेळ मिळतो बघा. आणि हा वेळ खरंच 'सत्कार्य' करण्यासाठीच असतो, हे कळायला तुमच्या आमच्या सारख्यांना बऱ्याचदा बराच उशीर होतो.  पण काही हरकत नाही.


     सवयी ह्या लागत नाहीत, त्या लावाव्या लागतात.  आणि त्या अशा पटकन निर्माणही होत नाहीत, त्या तयार कराव्या लागतात.  तशी सवय लागण्यासाठी थोडंसं कष्ट मात्र आपल्याला करावेच लागते.  कष्ट म्हंटले तरी सुद्धा त्या कष्टाचा विचार करण्यातच आपला अर्धा दिवस निघून जातो.  खरंय ना!  मग आपण म्हणतो आम्हाला नाही वेळ.  

     अहो, हे सगळं जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जाणवते.  आणि जाणवलेल्या गोष्टी मनातच उजळत राहताना त्याचा सुंगंध म्हणजेच त्याची निर्मिती अगदी अलगद जडत जाते बघा!  अगदी १०८%.


     म्हणून मन खट्टू होण्याची वाट बघत बसू नका हं!  काहीही झालं तरी 'चांगले विचार' आणि 'सकारात्मक भावना' ह्या जोडगोळीला हृदयाशी घट्ट धरून ठेवलंच पाहिजे.  आणि हे असं लगेच नाही होत, असा विचार मनात येताच क्षणी त्या नकारात्मक विचाराला थांबवून आपला खरा प्रयास सुरु करायला हवा.  हा नकारात्मक विचार खरंच आपल्या मनाचा कहर आहे आणि त्याला आपणच STRANGE करतो.  हे आहे तिथेच STOP करून START WHERE YOU ARE... हे बिंबवता यायला हवं!

     
     शाळेत असतानाची धम्माल, आजीच्या गावी जाताना गावच्या मातीचा दरवळणारा सुगंध, आवडणारी व्यक्ती, तिच्याविषयी जाणवणाऱ्या भावना, आपल्या बाळाचे कौतुक, त्याची निरागसता, उतार वयातील गोष्टी, नातवंडांचा सहवास, प्रपंचाच्या व्यापात कामाची चाललेली धावपळ, आपले सहकारी, घडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी, त्यातून मनाला उभारी देत केलेला प्रवास, प्रवासातील धम्माल आठवणी, कितीs कितीs गोष्टी आहेत, ज्या आपल्या मनात वाचतानाच बघा झरझर येऊन गेल्या.  हो ना!  खरंच आपलं मन खूप STRONG आणि जबरदस्त आहे.


     आपल्यातले किती तरी जण ह्या गोष्टी आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवत असतात.  किती तरी जण त्या अल्बमच्या माध्यमातून पाहत राहतात.  किती तरी जण आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून देत पेनाच्या शाईने अलगद कागदावर उतरवत असतात.  कागदावर उतरताना त्याचा ओलावा खरंच स्पर्शून जातो.  आणि खरंच हे अगदी खरं आहे. 

     कित्येकदा आपल्या मनातले विचार आपल्या मनातच राहतात. पण कागदावर उतरलेला मायेचा स्पर्श आपल्या व्यक्तीला कधी ना कधी सहज देऊन जातात.  


     आजच्या ह्या डिजिटलायझेशनच्या युगात हाच स्पर्श आता डिजिटल झाला आहे.  बदलत्या जगानुसार घडणारा हा बदल CONSTANT आहे.  

 'CHANGE IS THE ONLY CONSTANT.'  

     म्हणून आपल्या मायेचा ओलावा काही थांबत नाही, ते  प्रेम काही कमी होत नाही, ती जाणीव काही आटत नाही.  प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे.  आणि ह्या प्रवाहात आपल्याला आपल्याच मार्गाने पुढे जात रहायचं आहे.  फक्त त्यासाठी थोडं डिजिटल विश्व अधिक जवळून जाणून घेता यायला हवं.

     प्रत्येकाने TECHNO SAVY होणं ही आता काळाची गरज आहे.  आणि हो, Techno Savy होण्यातही खूप गंम्मत आहे बरं का?  हम्म!!!  पण आता आपण इथेच थांबूयात.  ह्या डिजिटल विश्वातील खजिन्याची गंम्मत जाणून घेण्यासाठी नक्की भेटूयात पुढच्या सदरात.

                                                  - अनुप्रिया सावंत.

Monday, 15 June 2020

"Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."



          बऱ्याचदा आपल्याला हवं तसं घडतच असं नाही.  मनासारखी गोष्ट घडली नाही, तर मन अगदी नानाविध विचार करायला लागते.  जर ह्या मनाला विचार करण्यासाठी, नकारात्मक विचार असतील, तर मग मनाचे आणि डोक्याचे(बुद्धी) अगदी तुंबळ युद्ध जुंपते.  हा अगदी प्रत्येकाला येणारा अनुभव आहे.  बऱ्याचदा एखादा नवीन विषय अचानक समोर आला की, व्यक्तीची कशी तारांबळ उडते. त्यात विषय नावडता असेल, तर मनःस्ताप ठरलेला असतो. आणि जर विषय आपल्या मनाच्या विरुद्ध टोकाचा असेल तर मग स्वभाव, मन, बुद्धी ह्यांना भेदत डोक्याचा भुगा.  मैत्रीच्या भाषेत बोलायचं तर डोक्याची दही नक्कीच होते.  बरेचदा गोष्टी खूप छोट्या असतात.  पण मनाला त्या छोट्या गोष्टी अगदीच, आता पेलवत नाही असे होऊन जाते.  ह्याला प्रामाणिक कारण एकचं, आपण स्वतःला खूप कमी संधी देतो असं वाटतं. 


     एखादा वैयक्तिक पातळीवरील निर्णय घ्यायचा म्हंटलं की, सामान्यातला सामान्य जीवसुद्धा अगदी कासावीस होतो.  मग ती गोष्टी छोटी असली तरीही. गोष्ट विचारांच्या मर्यादेपलीकडे असेल, तर मग ह्या कासावीस जीवाला खऱ्या अर्थाने गरज लागते ते आपलेपणाची.  हे 'आपलेपण' म्हणजे काय?  माझे मित्र-मैत्रीण, आई-बाबा, नातेवाईक, आप्त ह्यांच्याशी जिव्हाळा, संवाद म्हणजे 'आपलेपण'.  हे जरी खरे असले, तरी खरे 'आपलेपण' हा स्वतःचा-स्वतःशी, मनाचा-बुद्धीशी असलेल्या योग्य सुसंवादाशी असतो.  ह्या कासावीस होणाऱ्या जिवाला जशी कोणाच्या तरी आधाराची गरज असते, तशीच त्याला स्वतःचा स्वतःशी असलेल्या आधाराची सुद्धा तितकीच गरज असते. राहतो प्रश्न तो स्वतःला ओळखण्याचा.  फार काही फिलॉसॉफी पद्धतीत नक्कीच नाही व्यक्त व्हायचंय.  सर्वात जवळचा मित्र, म्हणजे आपल्या गाठीशी असलेला अनुभव.  सोबत ह्या अनुभवाला असलेली बुद्धीची उचित सांगड. 


       ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच छूमंतर अजिबात नाहीत.  ह्याला गरज आहे स्वतःला वेळ देण्याची, नीट समजून घेण्याची आणि जी पारख आपल्याला त्यातून होते, त्यातही अनेक दृष्टिकोनातून स्वतःला स्वतः पैलू पाडण्याची नितांत आवश्यकता आहे.  अनेक अनुभवातून प्रत्येक जण शिकत असतो. हे अनुभव, आपण आपल्या आयुष्यात कसे वापरतो? हे महत्वाचे आहे.  कारण तेही तितकेच आपल्या मनाला आशावादी बनवण्यासाठी प्रेरित करत असतात. 


    अशा फिलॉसॉफिकल गोष्टी आपण जेव्हा समोरच्याला सांगतो किंवा आपले मत आपण मांडतो, त्यावेळी बऱ्याचदा आपणही त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो.  It's OK.  काही हरकत नाही.  Just Let it beFocus on good changes inside you.  आपल्यातील चांगल्या बदलांवर लक्ष केंद्रित करायला हवं.  ह्यात एक गोष्ट नक्की, 'Acceptance is more important in our life'.  ती गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात स्वीकारणे अधिक महत्वाचे आहे.  कारण 'Change is only constant'.  आपल्या आयुष्यात होणारा 'सातत्यपूर्ण' बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे.  ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या बुद्धीला स्थिर करण्यास आपण स्वतःच स्वतःला मदत करू शकतो.


       'बुद्दिभेद' म्हणजे माझ्या अर्थी, मनाचे आणि डोक्याचे असलेले वाकडेपण.  मन आणि बुद्धी स्थिर नसेल तर शरीर सुद्धा व्याधिमय बनते.  हा बुद्धिभेद बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्यावर हल्ला करण्याआधीच, स्वतःच्या विचारांच्या चुकीची पद्धतीमुळेच आपल्याला विनाशाकडे नेतो.  बऱ्याचदा आपण फार पटकन समोरच्याला आपले रिऍकशन्स देतो.  आपले मत आपण लगेच बनवतो.  आपल्या मृदू, प्रेमळ किंवा काळजीयुक्त स्वभावामुळे का असेना, आपले रिऍक्ट होणं बऱ्याचदा आपल्यालाच त्रासदायक ठरतं.  इतकंच नाही तर  आपण स्वतः देखील एखादी गोष्ट केली की, स्वतःवरही तितक्याच चंचलतेने रिऍक्ट होऊन जातो.  आणि हेच रिऍक्ट होणं, मग आपल्याला विचारांच्या चक्रीवादळात खेचून घेतो.  आणि त्यातून निष्पन्न काय होतं? तर मनाला होणाऱ्या भयंकर वेदना, अस्वस्थता, चलबिचलता, निर्णय शून्यता, आणि परिणामी चुकीचे पाऊल.


          पाऊल वाकडे पडले की, ते पुन्हा मार्गावर आणता येतातही.  पण जर ते चुकीच्या निर्णयामुळे जीवावर बेतले, तर त्याला पुन्हा मार्गावर आणता येऊ शकत नाही.  Nothing is bigger than Life.  आयुष्य हे एकदाच मिळते. कोणत्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा गोष्टीमुळे आपण ते वाऱ्यावर सोडून दिले, तर कसे चालेल?  असे म्हणतात, संधी एकदाच चालून येते, मला असं अजिबात वाटतं नाही.  'संधी ह्या चालून येत नाहीत, तर संधी ही निर्माण करावी लागते.'  कोणीतरी येईल आणि मला संधी मिळवून देईल, असं कधीच होतं नाही.  संकटात जेव्हा सगळे मार्ग खुंटतात, तेव्हा Optimistic (आशावादी) व्यक्तीसाठी हेच संकट संधी बनून स्वतः त्याच्याकडे येते.  जेव्हा कोणत्या कार्याचा बेस (पाया) हा अध्यात्माला सोडून असतो, तेव्हा ह्या संधी त्यांचे सगळेच दारं बंद करून घेतात.  म्हणजे काय? आपल्या मनाचा बुद्धीचा एकमेकांशी संवाद तुटतो आणि तिथे सुरु होतो तो वाद.  वादातून कधीच काही चांगले निष्पन्न होऊ शकत नाही.  आणि राग येणं हे स्वाभाविक जरी असले, तरी त्या रागाला वादाच्या दारात उभं करायचं की नाही?  ते आपल्या हातात असते.  एखादी गोष्ट आपल्याला राग आणणारी असली, की आपण पटकन रिऍक्ट होतो.  आणि हे रिऍक्ट होणं जर चुकीच्या पद्धतीत व्यक्त झाले, तर वाद वाट पाहतच असतो.  कलियुगाच्या चरणात सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल?  तर हा द्वेष, राग, आणि त्यातून निर्माण होणारा वाद.  


         हे सगळे बोलण्यासाठी ठीक आहे असे जरी वाटले, तरी आता ह्यावर खऱ्या अर्थाने विचार करायला हवा.  ह्या सगळ्याचे सकारात्मक अनुकरण झटपट नक्कीच नाही होऊ शकंत.  पण हे सवयीने नक्कीच बदलू शकते.  नुसते सकारात्मक वाचून, बघून आणि लिहून व्यक्ती आशावादी बनत नाही.  तर त्याप्रमाणे त्याला स्वतःला स्वतःवर मेहनत घ्यावी लागते.  ही मेहनत घेणं सोपं नाही, पण अशक्यही नाही.  स्वतःवर चिडण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा, द्वेष, मत्सर, लोभ ह्या मोहमायेत अडकण्यापेक्षा आपल्या 'Nothing is bigger than Life' असणाऱ्या ह्या स्वतःच्या अमूल्य जीवाला संधी द्यायला काय हरकत आहे.  एक गोष्ट मनाशी आपण पक्की बांधली पाहिजे, "संधी ह्या चालून येत नाही, त्या स्वतःला निर्माण कराव्या लागतात."  You have to create it.


       आज माझ्याकडे नोकरी नाही म्हणून मी रडत बसलो, तर चालेल का?  माझा पगार कमी आहे आणि माझा मित्र जास्त कमावतो, असं करत राहिलो, तर घर चालेल का?  घरात कोणी मदत करत नाही म्हणून स्वतःवर चिडचिड करत राग करत बसलो, तर माझा जगणं सुसह्य होईल का?  मला आधी जास्त पगार होता, आता कमी पगारात काम करावं लागतंय, असं करत आहे ती नोकरी सोडली, तर मला पुन्हा नवीन संधी मिळतील का?  असे खूप प्रश्न आहेत, मला - तुम्हाला, आपल्या सगळ्यांनाच.  


       आज लॉकडाऊन चालू होऊन ३ महिने झाले, आधीची परिस्थिती आणि आताची व पुढची परिस्थिती ह्यात नक्कीच बरंच अंतर निर्माण होणार आहे, किंबहुना झाले आहे.  अशा वेळेस मनाचा आणि बुद्धीचा संयम हाताळणे थोडं अवघड आहेच, पण जमणारचं नाही, असं अजिबात नाही.  परिस्थितीला गिव्ह अप(सोडून देत)  करत हतबल होण्यात काहीच अर्थ नाही.  ह्यात तरून जायचे असेल तर 'संधी' निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही.  संधी ही कोणत्याही प्रकारची असू शकेल, ते म्हणजे बुद्धिभेदापासून स्वतःचा बचाव करण्यापर्यंत ते स्वतःला अशाही परिस्थिती 'Optimistic' व्यक्तिमत्त्वाकडे नेण्यासाठी, आपला जोपासला जाणारा छंद ही त्याचाच भाग असू शकेल.  आणि नसेलच काही छंद किंवा नसेलच काही आवड, तर मला माझ्या आयुष्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे.  मग अगदी स्वतःवर सकारात्मक प्रयोग ही त्याचा भाग असू शकेल.  काय वाटतं तुम्हाला? 


        अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना मान्य करून, स्वतःला संधी आपणच दिली पाहिजे.  स्वतःला आपण आहे तसे Accept(स्वीकार) करत, स्वतःवरही प्रेम केले पाहिजे.  दुसऱ्यांना मदत करताना आपल्याला आनंद होतोच.  इतकंच नाही, तर दुसऱ्याचा छोटासा आनंद बघतानाही आपण किती हरखून जातो.  मग आपल्या स्वतःच्या जीवनाला आपण स्वतःच जर हा आनंद मिळवून दिला, तर आयुष्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.  जीवनात कोणीच परफेक्ट नसतात आणि परफेक्शनच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नसतो.  


         इतिहास घडविणाऱ्यांमध्ये सातात्यतेने सकारात्मक वृत्ती होती. त्यांच्या शिकण्यात नाविन्यता होती, अनुभवांचे गाठोडे होते. त्याचा सकारात्मक वापर करून मन आणि बुद्धीवर मिळवलेला, तो विजय म्हणजे हा 'इतिहास'.  आपल्याला आपल्या इतिहासातील  'आदर्श' व्यक्तींची नुसती आठवण जरी आली, तरी अंगावर शहारे येतात.  अभिमान वाटतो आपल्याला आपल्या पूर्वजांचा.  आणि नकळत स्वतःचाही अभिमान वाटतो की, असे थोर संत, नेते, राजे, व्यक्ती आपले इतिहासकार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांनी आपल्याला संदेश तर दिला आहेच, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अनेकानेक संधी दिल्या आहेत.  जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि त्याचे अनेकानेक पैलू आपल्याला प्रत्यक्ष दिले आहेत.  असे म्हणतात, 'जिंदगी का दुसरा नाम ही प्रॉब्लेम है|' पण जर प्रॉब्लेम आलेच नाही, तर जीवनातल्या संधी कळणार तरी कशा? आयुष्यातली सुंदरता अनुभवणार तरी कशी?


          माझी आई आम्हाला नेहमी सांगते, एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाण्याची सहजता आपल्याकडे असायला हवी.  प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला असतात, तुम्ही त्याला कसे पाहता?  ते महत्वाचे.  'श्रद्धा' आणि 'भक्ती' ह्या दोन गोष्टी आणि त्यानुसार असलेले आपले कर्म जीवनात प्रत्यक्ष उतरत असते.  Spiritually आपला strongness आपल्याला सकारात्मक स्पंदन निर्माण करण्यास सहाय्यभूत होतात.  'भक्ती' हा प्रत्येक कार्याचा बेस आहेच, पण 'प्रपंच हाच परमार्थ', हे विसरून चालणार नाही. 


त्यासाठी...

     "Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."

              अनुप्रिया सावंत