Wednesday, 28 January 2026
कविता #23 - शाळा!
Saturday, 25 October 2025
"देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास!"
हे अगदीच खरंय! आपण मुलांना जे सांगतो त्याचा बॅक ऑफ द माईंड मुले खूप खोल विचार करत राहतात. ती ऐकत असणाऱ्या अग्रलेख मधल्या कथा, 'प्रत्यक्ष'मध्ये येणारे शेवटच्या पानांवरील ललित लेखन, तिला वाचून दाखवत असणारे लेखन, कविता ह्या सगळ्या तिच्या बुद्धीला, मनाला ज्या भिडल्या त्या प्रमाणे आलेल्या तिच्या विचारांचा हा संगम आहे. प्रत्यक्षपणे 🙏हरीकृपा ही केवलम्! श्रीराम!🙏
कथेचं नाव: "देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास!"
प्राजक्तावीरा सावंत (वय — ८ वर्षे)
लिहिण्याची तारीख: २८/०८/२०२५ (गुरुवार)
"देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास"!
एक मुलगा होता. तो नेहमी खूप प्रश्न विचारत असे,
“हे असे का? ते असे का?” त्याला सतत प्रश्न पडत राहत होते. तो स्वतःही खूप विचार करत असे,
“देवाने मला असं का बनवलं? तसे का बनवले?”
घरातले लोक त्याचे प्रश्न ऐकून कधी कधी कंटाळून म्हणत,
“तू देव बाप्पाला विचार.”
मुलगा खरंच गेला आणि गणपती बाप्पाला विचारायला लागला, गणेश उत्सव सुरू असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात बाप्पा आले होते. त्याच्याही घरी आले होते.
त्याने प्रेमाने बाप्पाच्या डोळ्यात बघत म्हटलं, “बाप्पा, मी काय करु? मी कोणाला काही विचारलं तर म्हणतात, ‘ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, ह्याला विचार, त्याला विचार, उत्तर तर कोणीच देत नाही!’ आणि आज आई म्हणाली, ‘तू बाप्पालाच जाऊन विचार.’ आता मला तू तरी सांग.”
तो बोलत बोलत तिथेच झोपी गेला. स्वप्नात बाप्पा आले आणि म्हणाले, “बाळा, तू जे काही प्रश्न विचारतोस, त्याची उत्तरे तुला नक्की मिळतील. मी उद्या तुला भेटायला येईन.”
सकाळ झाली. मुलाला वाटलं, “बाप्पा आता येतील, मग माझ्याशी बोलतील.” पण बाप्पा आले नाहीत. शेवटी तो कंटाळून पुन्हा गणपती बाप्पाला विचारतो, “तू तर आलाही नाहीस, भेटलाही नाहीस, आणि काही सांगतही नाहीस!”
तो बाहेर चालत चालत नदीकाठी गेला आणि शांत बसून विचार करू लागला,
“माझे प्रश्न इतके का आहेत? मला खरंच उत्तरे मिळणार नाहीत का? की मी जास्त विचार करतोय का?”
शेवटी तो आर्त स्वरात म्हणाला,
“हे गणेशा, मी कंटाळलो ह्या प्रश्नांनी.”
त्याच वेळी त्याच्या डोक्यावर एक हात आला. तो डोळे उघडतो तर एक आजोबा हसत त्याच्याकडे पाहत होते.
आजोबा म्हणाले, “बाळा, एवढा विचार करणे गरजेचे आहे का? काही प्रश्नांना लगेच उत्तरे मिळतात, काही प्रश्नांना थोडा वेळ लागतो. पण विश्वास आणि आपले कार्य दोन्ही चालू ठेवले पाहिजे. थोडा वेळ लागेल, पण मार्ग नक्की मिळतो.”
मुलगा फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला. आजोबांचा हस्तस्पर्श आणि बोलणे त्याच्या मनाला खूप आवडून गेले.
तो शांतपणे नदीकाठी बसून राहिला. येताना डोळ्यात खूप प्रश्न घेऊन येणारा मुलगा आता स्वतःमध्ये आनंद आणि विश्वास असलेला अनुभवत होता. त्याला समजलं की, काहीही प्रश्न असोत, माझा देव मला पाहतो आहे. माझा बाप्पा माझ्या नेहमी जवळ आहे, मार्ग दाखवण्यासाठी.
मुलगा पुन्हा आपल्या आजी आजोबांच्या घराकडे जायला निघतो. दोन दिवस राहून आपल्या घरी जाणारे काही गणपती बाप्पा वाजत गाजत मिरवणुकीतून जात असताना एकच धून त्यात सतत वाजत असते, ज्यावर सर्वच खूप आनंदाने नाचत असतात.
“बोलो भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा!”
आता मात्र त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास आणि शांतीची चमक अधिक वाढत जाते. तो हसतो आणि मनात स्वतःशी बोलतो,
“प्रश्न विचारणे चुकीचे नाही; त्यातून मी शिकतो आणि तयार होतो. विश्वास ठेवणे आणि कार्य करत राहणे हेच महत्वाचे आहे.
आम्ही प्रश्न विचारतो, आम्ही खूप अगावपणा करतो, आम्ही खूप रागावतो, आम्ही खूप भांडतो आणि आम्ही खूप खूप धम्माल पण करतो, कारण आमच्या बाप्पाला आवडते म्हणून.”
गणपती बाप्पा मोरया!
- अनुप्रिया सावंत
Friday, 3 October 2025
लघुकथा #2 - Never Forget Your Roots!

शाळेतील दुपारची वेळ होती. अभ्यासाचे तास संपले होते आणि कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती. समोरून शिक्षिका येताना दिसल्या. त्यांना पाहताच एक विद्यार्थिनी-शिक्षिका आदराने उभी राहिली.
शिक्षिका थोडं थांबल्या, हलकंसं स्मित करत म्हणाल्या,
“प्रत्येक वेळी असं उभं राहण्याची गरज नाही गं! मी इतकी मोठी नाहीये.”
त्यांचा मृदू आवाज मनाला भिडला. त्या क्षणी बालपणात शिकवलेले संस्कार डोळ्यांसमोर आले. गुरुजनांप्रती आदर, मोठ्यांचा सन्मान, नम्रता हे सगळं वागण्यात नकळत प्रकट झालं होतं.
काही दिवसांपूर्वीच प्रिन्सिपल मॅडम भेटल्या होत्या. विद्यार्थिनी शिक्षिका नेहमीप्रमाणे उभी राहिली. त्या हसत म्हणाल्या,
“बस, गरज नाही उभं राहायची.”
ती बसली, पण मनात मात्र अस्वस्थता जाणवली. थोड्या वेळाने नम्रपणे म्हणाली,
“मॅडम, मी कंफर्टेबल आहे. तुम्ही आहात तोपर्यंत मला उभं राहायचं आहे.”
क्षणभर शांतता पसरली. मॅडमच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. त्यांच्या नजरेत एक भाव स्पष्ट दिसत होता. ही कृती शरीराने होत नाही, ती मनातून उमटते. संस्कारांची खरी ताकद अशा न बोललेल्या क्षणांत जाणवते हे मात्र तितकेच खरे!
त्या संध्याकाळी घरी निवांत वेळ मिळाला. गरमागरम चहाच्या वाफेत मी आणि आई गप्पा मारत बसलो. शाळेतील प्रसंग सांगताना आई शांतपणे ऐकत राहिली. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. ती म्हणाली,
“हे त्या बाळामध्ये असणारे संस्कार आहेत अनु. शिक्षकांनी, मोठ्यांनी लावलेली बीजे वागण्यातून उमलतात.
म्हणूनच म्हणतात — "मूळ कधी विसरू नये."
त्या शब्दांतला गहिरा अर्थ मनात कोरला गेला. चहाच्या कपात फक्त चहाचा स्वाद नव्हता, तर नात्याचं उबदारपण, संस्कारांची जाणीव आणि आठवण होती.
रात्रीच्या शांततेत विचार मनात फिरत राहिले. शाळेतील जुन्या दिवसांची आठवण झाली. शिक्षक केवळ विषय शिकवत नव्हते, तर आयुष्य जगण्याचे मूल्यही देत होते. आदर, नम्रता, कृतज्ञता या गोष्टी कुणी दररोज सांगून शिकवलेल्या नव्हत्या; त्या बालपणातच मनात रुजलेल्या होत्या.
संस्कार हे कृत्रिम नसतात. ते लहान लहान कृतींमधून झळकतात. शिक्षक वर्गात आले की उठणं, नमस्कार करणं, मोठ्यांशी संवाद साधताना आदर राखणं. या सगळ्या कृती नियम म्हणून नव्हे, तर भावना म्हणून घडतात.
हो, हे अगदी खरं आहे. या सगळ्या अनुभवातून एक महत्त्वाची शिकवण स्पष्ट झाली ते म्हणजे, संस्कार हे कृतीतून नव्हे तर नजरेतून, मनापासून आणि भावनांमधून प्रकट होतात.
मुळे घट्ट असतील, तर व्यक्तिमत्त्व स्थिर उभं राहतं.
आजच्या आधुनिक काळात बऱ्याच गोष्टी बदलत आहेत, पण एक गोष्ट कायम राहायला हवी, ती म्हणजे आपल्या मुळांप्रती 'कृतज्ञता'. कारण मुळेच झाडाला बळ देतात, आणि संस्कारच व्यक्तिमत्त्वाला दिशा देतात.
त्या छोट्याशा प्रसंगाने जीवनाची मोठी शिकवण दिली.
“Never forget your roots — कारण तेच आपल्याला खरं मोठं बनवतात.”
- अनुप्रिया सावंत
Monday, 1 September 2025
नाटिका: समर्पण
आज खरं तर लेख लिहिण्यापेक्षा मला काहीतरी वेगळं लिहिण्याची ओढ लागली होती. आणि ती समर्पणाची ओढ खऱ्या अर्थाने समर्पण रुपी लेखणीतून उतरली. निमित्त जरी शिक्षक दिनानिमित्त छोटासा भावना व्यक्त करणारा लेख असावा, असे जरी वाटले तरी हे जे समर्पण मांडले गेलंय ते फक्त केवळ त्यांच्याच स्फूर्तीमुळे.
सिखने के लिये सिखाओगे तो सीख पाओगे…
किसी को सिखाने के लिये सिखाओगे तो कभी नही सीख पाओगे!
बघायला गेले तर जणू काही आताच्या काळातली catchy लाईन असावी, जी खऱ्या अर्थाने त्यांच्या निर्मळ शुद्ध भावनेतून, विचारांतून मला जणू कळत नकळत लाभलेली शिकवण असावी आणि हेच समर्पण त्यांनी माझी गुरुदक्षिणा पुष्प म्हणून स्वीकारावे ह्या पेक्षा मोठा आनंद तो काय!
नाटिका: समर्पण
(शिक्षक दिनाचा कार्यक्रम नुकताच संपला आहे. दोन शिक्षिका बेंचवर बसलेल्या आहेत. मुलांनी दिलेली ग्रीटिंग्ज, फुलं आणि सोबतीला हक्काचा चहाचा कप. वातावरण हलकंफुलकं, पण चर्चेला उधाण येणार आहे. पार्श्वभूमीत विद्यार्थ्यांचा गडबडाट आणि हलके स्वरात श्लोक/गाणी ऐकू येत आहेत.)
शिक्षिका १ (हसत, फुलांकडे बघत):
किती गोड ग्रीटिंग्ज दिली आहेत मुलांनी! खरंच, त्यांच्या निरागस डोळ्यातलं प्रेम पाहून मन भरून आलं.
शिक्षिका २ (मस्करीत):
हो ना! ही फुलं आपल्या शिकवण्याला मिळाली आहेत, आपल्या चेहऱ्याला नाही.
(दोघी हसतात. थोडा वेळ शांतता.)
शिक्षिका १ (थोड्या गंभीर स्वरात):
आजचा दिवस नेहमीच विशेष वाटतो. पण मला एक गोष्ट नेहमी हृदयाला स्पर्शून जाते, आपण शिक्षक असूनही अजून शिकतच आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांतून, त्यांच्या उत्सुकतेतून, त्यांच्या निरागस उत्तरांतून… कधीकधी त्यांच्या बंडखोर वृत्तीतून सुद्धा, रोज नवं काहीतरी कळतं.
शिक्षिका २ (मान डोलावत):
हो, अगदी खरं आहे. पण एक गोष्ट नक्की, शिकवणं आणि शिकणं यात फार मोठा फरक आहे.
जो शिकायला तयार असतो, त्याला शिकवणं आपोआप जमतं.
पण जर मनात फक्त 'मी शिकवतेय' एवढंच ठेवलं, तर खरं शिकणं कधीच होत नाही.
'धडा शिकवणं आणि धडा शिकणं', ही जणू दोन टोकं आहेत, पण दोन्ही आवश्यक आहेत.
शिक्षिका १ (उत्सुकतेने):
म्हणजे तुझं म्हणणं काय आहे?
शिक्षिका २ (हळू पण ठाम आवाजात):
सिखने के लिये सिखाओगे, तो सीख पाओगे…
किसी को सिखाने के लिये सिखोगे, तो कभी नही सीख पाओगे!
शिक्षिका १ (विचारात):
म्हणजे?
शिक्षिका २ (शांत स्वरात):
हल्ली बऱ्याचदा आपला अहंकार आपल्यापेक्षा मोठा व्हायला लागतो.
आणि आपण चांगल्या गोष्टींपेक्षा चूक कुठे आहे? यावरच जास्त लक्ष केंद्रित करतो.
तिथेच गफलत होते आणि छोटी गोष्ट मोठी होते. हे मला नेहमी खटकतं.
खरं सांगायचं तर – “छोटी बात को हम छोटी क्यो नही रख सकते?”
शिक्षिका १ (विचारात):
बरोबर आहे. आपण बरंच काही चुकांमधून शिकू शकतो, पण त्याऐवजी आपण समोरचा कधी चुकतोय? आणि मी त्याला कधी एकदा पकडतोय, यावरच वेळ घालवतो.
कधी आपण एक विचार असाही करतो, “मी मोठी आहे तर माझं ऐकलंच पाहिजे”… किंवा “माझी पोस्ट मोठी म्हणून माझा अहंकार जणू सुखावला पाहिजे”. पण आपण शिक्षक असूनसुद्धा, 'शिक्षक' आहोत हेच विसरतो.
शिक्षिका २ (हसत-उपरोधाने):
हो! आणि कुणी खराखुरा, मेहनती दिसला, तरी आता कौतुकापेक्षा अर्थहीन चर्चाच जास्त ऐकू येतात. आणि हे हल्ली प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते.
एखादी गोष्ट छोटी करून सोडवता येईल का हे बघण्याऐवजी, “समोरच्याची चूक कशी दाखवता येईल?” यातच जास्त लक्ष जातं.
मोठेपणाचा अहंकार म्हणजे खरंतर एक मोठ्ठा दगड आहे, ज्यावर आपणच डोकं आपटून घेतो!
(काही क्षण शांतता. शाळेच्या अंगणात लाऊड स्पीकर वर श्लोक चालू आहे , “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः…”)
शिक्षिका १ (थोडं थांबून):
आपल्याला बर्याचदा वाटतं की “मला खूप काही येतं, माझा इतका अनुभव आहे, मी अमुक आहे, तमुक आहे…”
आणि मग समोरच्याचं बोलणं आपण आपल्या सो कॉल्ड EGO वर घेतो.
पण खरं सांगू? जिथे EGO येतो ना, तिथे व्यक्ती म्हणून स्वार्थ नक्कीच शिरतो.
हा EGO म्हणजे अगदी शत्रू! सोयीस्कर चांगल्या गोष्टी विसरतो.
थोडा है थोडे की जरुरत है!
एखादी गोष्ट छोट्या प्रमाणात सोडवली तर झालं असतं, पण नाही… आपल्यातला लपलेला अहंकार दगडासारखा आडवा येतो आणि आपणच त्यावर डोकं आपटून घेतो.
शिक्षिका २ (हसत मंजूर करत):
हो अगदी खरं!
बर्याचदा आपण वेळ घालवतो तो 'समोरच्याची चूक कशी दाखवता येईल?' ह्यावर. पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे त्या वेळेत स्वतःला आणि देणाऱ्यालाही काहीतरी चांगलं देणं.
चुका सगळ्यांकडून होतात, पण त्या शोधत बसण्यापेक्षा त्यातून शिकणं जास्त महत्त्वाचं आहे.
शिक्षिका २ (खळखळून हसत):
हो! हल्ली चर्चेचं पीक भारीच आलंय!
कौतुकाचं खतच नाही उरलं म्हणायचं!
शिक्षिका १ (गंभीर होत):
पण मग उपाय काय? आपणही त्यांच्यासारखं करायचं का? की काही गोष्टी NEGLECT करायच्या? पण हे NEGLECT करण्याचंही प्रमाण कसं ठरवायचं?
शिक्षिका २ (संयमाने):
अगं उपाय फार अवघड नाही. जोपर्यंत तुला तुझ्या कामात आनंद मिळतो, तो आनंद फुलाच्या सुगंधासारखा पसरवायचा. शिक्षक म्हणून आपले विद्यार्थी आपल्या शिकवणीतून फक्त धडा शिकणार नाहीत, तर नकळत ते प्रेम, ती आत्मीयता, तो आनंद, शिकण्याची जिद्द आणि प्रेरणा घेऊन जातील. आणि हीच गोष्ट त्या-त्या क्षेत्रातील अगदी प्रत्येकाला लागू होते, बरं का!
शिक्षिका १ (उत्साहाने, डोळ्यात चमक):
वा! म्हणजे लक्ष इतरांवर नाही, तर माझ्या कार्यातून स्वतःला व स्वतःसोबत इतरांना काय चांगलं देता येईल ह्यावर हवं.
म्हणजे... जणू परीस स्पर्शे सोने व्हावे!
शिक्षिका २ (मिश्कील टोनमध्ये):
हो… आणि बाकी लोकांचं?
त्यांचं MUTE BUTTON ऑन करून टाकायचं!
नुसतं दुर्लक्ष नाही, तर त्यांच्या गोष्टींना त्यांच्या जागी ठेवून आपला वेळ आणि उर्जा दोन्ही वाचवायची.
शिक्षिका १ (हसत, डोकं हलवत):
खरंय! शेवटी समाधान तेव्हाच मिळतं, जेव्हा आपलं काम पूर्ण केल्याची जाणीव होते.
एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद – तीच तर खरी कमाई!
एक व्यक्ती म्हणून समाजाचे लागणारे देणं – हेच तर खरं
समाधान!
शिक्षिका २ (हात जोडत, हसत):
हो… तोच खरा समर्पण!
(दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. मंचावर हलका प्रकाश पसरतो. पार्श्वभूमीत श्लोकाचा आवाज वाढतो. पडदा हळूहळू खाली येतो.)
- अनुप्रिया सावंत
Sunday, 17 August 2025
कविता #22 - वाटेवरचा प्रवास!
जीवन हा एक अखंड प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर नवनवीन अनुभव, संघर्ष, आनंद-दुःख यांचे मिश्रण आपल्याला सतत घडवत असते. म्हणतात ना... Change is only constant. आपण चालत आलेली वाट कधी उभी-आडवी, काटेरी; तर कधी हिरवीगार, पावसाळी. पावलोपावली बदलणारा निसर्ग हा आपल्याच मनोवृत्तीचा आरसा असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती नक्की होणार नाही. प्रवास थांबत नाही, चालूच राहतो. थकव्याच्या क्षणीही अंतरंगातील ऊर्जाच पुन्हा पावलं पुढे टाकायला भाग पाडते. त्यातूनच नवे बळ देत असते.
'वाटेवरचा प्रवास!' ही कविता जीवनाच्या ह्या प्रवासाचीच कहाणी सांगत आहे. संघर्ष आणि थकवा असूनही आशेचा, धैर्याचा आणि उभारीचा प्रकाश आपल्याला पुन्हा चालायला शिकवतो. अंधारानंतर प्रकाश, पावसानंतर ऊन, आणि दुःखानंतर उमलणारा हसरा क्षण, याचं प्रतिबिंब म्हणजे हा 'वाटेवरचा प्रवास!'
पहाटेच्या पायवाटेवर,
पाऊल टाकताच वारा गाई,
दगडधोंड्यांच्या गोष्टींनी,
पाऊल थांबवुनी पाहे जाई!
विचारांचे वळणवाटे,
ओझे जड मनावर चढते,
थकलेले देह-श्वास माझे,
उसासा घेऊन मागे वळते!
अंतरातून ऊब हलकी,
श्वास नवा स्पंदन भरते,
पुन्हा पाऊल पुढे सरके,
धूसरपणावर उजेड फुलते!
कधी वारा झोंबणारा,
कधी सूर्य उबदार होई,
वळणावर धीर नवा तो,
मनाला उभारी देत राहे!
प्रवास कधी लांब, ओसाड,
कधी पावसात भिजवितो,
पावलांच्या ठशांत मात्र,
सूर उभारीचा साठवितो!
शक्ती नसे शब्दांमध्ये,
हृदयात ती साठवलेली,
अदृश्य स्पर्शातून जेव्हा,
जिवाला नवी उभारी देई!
एक काळजाची हळवी हाक,
पोहोचावी काळजापर्यंत,
सूर्यकिरण शुभ्र प्रकाशी,
चांदण्यासारखा तेजोमय!
दाट अरण्यातही सापडावा,
मार्ग एक अंतरीचा शुद्ध,
अंतरात्मा निर्मळ व्हावा,
जैसे परिस स्पर्श सुवासिक!
- अनुप्रिया सावंत
Thursday, 8 May 2025
थर्ड वर्ल्ड वॉर ९ - ऑपेरेशन सिंदूर
हल्लीच शाळेत आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भातील मॉक ड्रिल झाली. सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच इतर सहकर्मचारी ह्यात शांतपणे पण तितक्याच जलद गतीने कृती करत होते. बरेच विद्यार्थी गोंधळलेले तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या व्यवस्थापनेसंदर्भात घरून ज्ञान प्राप्त असलेले त्यांच्याशी मॉक ड्रिल संदर्भात बोलताना आढळून आले. शिक्षक विद्यार्थी चर्चा नंतर मनात हा विचार येऊन गेला जर खरंच अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आलीच तर काय? बऱ्याच ठिकाणी ह्या मॉक ड्रिल घेतल्या जातात पण सामान्य जनतेचे काय? गृहिणीचे काय? वयस्कर लोकांचे काय? लहान मोठी मुले ज्यांना ह्या विषयावर चर्चा तर दूर पण साधी माहितीही नसते त्यांचे काय? त्यांनी काय करावे?

बऱ्याच जणांना मॉक ड्रिल हे माहित आहेच. पण वेळ आल्यावर प्रत्यक्ष घराघरात लोक त्याला कसे सामोरे जातील? किती गोंधळ होईल? विचार आलाच मनात. माझ्या प्रमाणे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असणारच तेही अनेकदा. त्याचे प्रात्यक्षिक उत्तर आजच्या 'नॅशनल सिव्हील मॉक ड्रिल' ह्या भारत सरकारच्या निर्णयाने दिला.
आज घराघरात ह्या विषयी चर्चा केली जात आहे. माहित नसलेली गोष्ट किंवा अर्धवट माहित असलेली गोष्ट दोन्ही व्यक्तीला घातकच असतात. पण त्यामुळे माहिती घेऊच नये किंवा चर्चा करूच नये हे त्याहूनही भयानक असते.
पहलगाम दहशतवादी हल्ला हा प्रत्येक भारतीयांसाठी वेदनादायक आणि तितकाच तीव्र निषेध व्यक्त करणारा आहे. आज भारतीयच नाही तर अनेक देशांमध्ये ह्या हल्लाविरुद्ध निषेध केला जात आहे.
हा निषेध फक्त निषेध म्हणून नाही तर त्याविरुद्ध आणि त्यापलीकडे आपल्या भारताने भारतासाठी घेतलेला स्टॅन्ड आहे. आणि त्याचे प्रत्युत्तर भारताने 28 सप्टेंबर 2016 चा उरी हल्ला, पुलवामा 'सर्जिकल स्ट्राईक' 26 फेब्रुवारी २०१९ आणि आज 7 मे 2025 रोजी पहलगाम येथे 'ऑपेरेशन सिंदूर' दहशतवाद्यांचा हिशोब करून घेतला गेला.
गो द्विज धेनु देव हितकारी। कृपा सिंधु मानुष तनुधारी॥
जन रंजन भंजन खल ब्राता। बेद धर्म रच्छक सुनु भ्राता॥2॥
दहशतवाद्याला धर्म हा नसतोच. ती एक विकृती आहे. आणि अशी विकृती त्यांचे पाळेमुळे खणूनच वाढत राहतात. त्यामुळे त्यांना दिले जाणारे खतपाणी(नेमके काय, कसे व कोणते?) ह्यावर एक सजग नागरिक म्हणून आपले लक्ष असणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीला खतपाणी मानसिक, भावनिक आणि आर्थिक ह्या मुख्य गोष्टीने मिळते. ह्याविषयी अधिक बोलण्यापेक्षा प्रत्येकाने मागच्या १० वर्षाच्या घडामोडी जागतिक आणि राजकीय पातळी अशा प्रत्येक घटनेचा गोष्टींबद्दल विचार करायला हरकत नाही.
सुशिक्षित अडाणी आपल्या आजूबाजूला बरेच पाहायला मिळतात जे मागचा पुढचा विचार न करता सरळ बोलून जातात, 'आपल्याला काय करायचे आहे?' 'अमुक असा नि तमुक तसा.', 'शेवटी राजकारण आहे जो तो आपली खळगी भरतो.'; एका अर्थी त्यांचे म्हणणे बरोबरच आहे, मात्र हेच राजकारण जेव्हा घराच्या उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करते तेव्हा मात्र आपण आकांडतांडव करतो.
राजकीय(राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ), न्यायाधिक , लष्करी प्रमुख आणि परकीय सत्ता चालवणारे हे सर्वच त्या-त्या देशाला प्रत्यक्ष आकार देत असतात. पूर्वापार चालत असलेली ही गोष्ट आपण ऐकत आलो आहोत, बघत आलो आहोत आणि अनुभवतही आलो आहोत.
देशाचा नेता जितका सक्षम नेतृत्व करणारा तितकाच तो देश सुरक्षित. ह्याचे प्रत्यक्ष स्वरूप आज आपण सर्वच पाहत आहोत. भारत म्हणून हिणवणारे तेच लोक आज आपल्याकडे विश्वासाच्या, मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत. हिमालयासारखी पोलादी छाती असणारा आपला 'भारत' ना कोणी जिंकू शकला ना कोणी हरवू शकला.
ज्या हाताने मदतीचा हात पुढे करता येते त्याच हाताने ह्या भारताला वेळप्रसंगी शत्रूला मुळासकट उखडूनही काढता येते.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:
अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन परिसरात दहशतवादी घटना घडली जिथे पर्यटक पर्यटनासाठी आले होते. या भागाला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणूनही ओळखले जाते.
लहानांपासून वयस्करांपर्यंत सगळेच पर्यटनाच्या आनंदात व्यस्त असताना जो भ्याड हल्ला तिथे झाला तो निंदनीय आणि हृदयद्रावक आहे.
ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हा क्रूर खेळ खेळला, त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने उचललेले हे पाऊल. म्हणजेच.....
श्री राम राम रणकर्कश राम राम
पाकव्याप्त काश्मीर (पोक), ज्याला पाकिस्तानमध्ये 'आझाद जम्मू आणि काश्मीर' म्हणून ओळखले जाते, हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग पाकिस्तानने कब्जा करून बळकावलेला भाग आहे.
कलम ३७० ह्या कलम अंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला होता. भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात स्थित असलेला हा काश्मीरच्या मोठ्या प्रदेशाचा भाग आहे. 1947 पासून भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्यातील हा वादाचा विषय आहे.
हा कलम रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश बनला आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील गुंतवणूक आणि विकास त्याच प्रमाणे तिथली जनता देखील जी आधी तिथल्या दहशतवादांच्या दबावात होती ती मुक्त झाली आहे. कारण तेथील अनेक लोकांचा असा विश्वास होता की हे कलम जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला आणि सामाजिक प्रगतीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे जनमत कौल देखील कलम रद्द करण्यासाठी तितकेच महत्वाचे होतेच.
(जम्मू काश्मीर हे स्वतंत्र संस्थान आणि त्याचे महाराजा हरिसिंह असताना कलम ३७० नक्की का आणि कसे आले? ह्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल.)
या करारानुसार पश्चिम नद्या (सिंधू, झेलम, चिनाब) पाकिस्तानला आणि पूर्व नद्या (रावी, बियास, सतलज) भारताला वाटल्या जातात. त्याच वेळी, या करारामुळे प्रत्येक देशाला दुसऱ्या देशाला वाटलेल्या नद्यांचे काही विशिष्ट वापर करण्याची परवानगी मिळते.
भारताला विशेष वापरासाठी वाटप केलेल्या पूर्वेकडील नद्यांच्या पाण्याचा वापर करण्यासाठी, भारताने खालील धरणे बांधली आहेत:
सतलजवरील भाक्रा धरण
बियासवरील पोंग आणि पांडोह धरणे आणि
रावी थीन.
हरि प्रेरित तेहि अवसर चले मरुत उनचास।
अट्टहास करि गर्जा कपि बढ़ि लाग अकास॥25॥
नोटबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370, 35A, राम मंदिर, सिंधू जल करार स्थगिती आणि आता ऑपेरेशन सिंदूर.
Wednesday, 7 May 2025
पत्रलेखन - पत्रलेखन कसे करावे?
पत्रलेखन - पत्रलेखन कसे करावे?
पत्रलेखन म्हणजे आपणच मांडलेले आपले विचार, भावना, आपले मत किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रारी यांचे लेखी स्वरूपात केलेले लेखन म्हणजे 'पत्रलेखन' होय.
बऱ्याचदा आपल्याला भावना व्यक्त करतांना शब्दांची जमवाजमव करावी लागते. काहीवेळेस भावना व्यक्त करायला वेळेचा अभाव असतो तर काही वेळेस समोरची व्यक्तीच उपलब्ध नसते. अशा वेळेस लिखित मजकूर आपले कार्य चोख बजावतो. थोडक्यात , हे महत्वाचे संवाद माध्यम आहे. ज्याचे महत्तव आजच्या काळातही तितकेच टिकून आहे.
प्राचीन काळापासून हा प्रकार आपण पाहत आलो आहोत. काळानुसार त्यात बरेच बदल झाले असले तरी 'पत्रलेखन' हा विषय अजूनही विशिष्ट स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतो.
त्याच गोष्टी लक्षात ठेवून मी आपल्यासमोर पत्रलेखन करतानाचे काही प्रमुख गोष्टी, त्यांचे घटक व स्वरूप सोप्या करून मांडण्याचा प्रयास असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तयार केलेला हा आराखडा असला, तरी प्रत्येकाला पत्रलेखन करताना हे स्वरूप डोळ्यासमोर आल्यास सोपे होईल ह्याची खात्री आहे.
पत्रलेखन अनौपचारिक (मित्र - मैत्रिणी, कुटूंब, जवळचे व्यक्ती), औपचारिक(संस्था, कार्यालय किंवा विशिष्ट उद्देशाने), व्यावसायिक(मागणी पत्र, तक्रार) अशा प्रकारांची असतात.
खालील पत्रलेखन स्वरूप हा तिन्हींचा एकत्रित करून समजायला सहज असावा अशा स्वरूपाचा नमुना बनवलेला आहे. अर्थातच विद्यार्थ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल.
अशा स्वरूपात तुम्ही पत्रलेखन पूर्ण करू शकता. विद्यार्थ्यांनी पत्रलेखन करताना कोणत्या भागाला किती गुण आणि कसे गुण विभागले असतात त्यानुसार जर अभ्यास केला तर नक्कीच पत्रलेखन प्रकारात उत्तम गुण मिळवू शकतात.
आजच्या जगात सोशल मिडीयासारखे साधने, ई-मेल, चॅटबॉक्स असे अनेक साधने उपलब्ध असली तरी, पत्रलेखन अजूनही तितकेच प्रभावी संवाद माध्यम म्हणून वापरले जाते. त्यामुळे नमुना म्हणून सादर केलेला हा पत्रलेखन प्रकार सामान्य माहिती स्वरूपात आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल तसा विषयानुरूप त्यात बदल करू शकता.
- अनुप्रिया सावंत.
Friday, 22 November 2024
कविता #21- लेखणीचा लपंडाव
![]() |
| Published in #Pratyaksha newspaper |












.jpeg)







