आपण अशा काळात जगतो आहोत जिथे जगाशी जोडणारी साधनं वाढली, पण स्वतःशी जोडणारे क्षण कमी झाले. दिवसाची सुरुवात स्क्रीनने होते आणि शेवटही त्याच प्रकाशात. मधल्या वेळेत किती बातम्या, किती व्हिडिओ, किती पोस्ट, किती प्रतिक्रिया समोरून गेल्या... पण दिवस संपल्यावर मन मात्र अनेकदा रिकामंच वाटतं.
मोबाइल, सोशल मीडिया किंवा तंत्रज्ञान चुकीचं नाही. उलट त्याने आयुष्य अनेक प्रकारे सोपं केलं आहे. पण प्रत्येक सोयीची एक किंमत असते. नकळत आपण आपल्या वेळेची, शांततेची आणि स्वतःशी असलेल्या संवादाची किंमत मोजू लागतो.
आज आपण प्रत्येक क्षण टिपतो, पण तो जगायला विसरतो. इतरांच्या आयुष्यात डोकावताना स्वतःच्या मनात डोकावण्यासाठी वेळच उरत नाही. जवळची माणसं शेजारी बसलेली असतात, पण प्रत्येकाच्या नजरा वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये हरवलेल्या असतात. संवाद कमी होतो, प्रतिक्रिया वाढतात. माहिती वाढते, पण मन हलकं होत नाही.
कधी स्वतःलाच प्रश्न पडतो... शेवटचं आपण शांत बसून काहीच न करता केव्हा राहिलो होतो? शेवटचं आकाशाकडे पाहून मन भरून आलं होतं ते कधी? शेवटचं स्वतःच्या मनाचं बोलणं आपण खरंच ऐकलं होतं का?
कदाचित या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगळी असतील. पण प्रश्न मात्र जवळजवळ सगळ्यांचाच एकसारखाच आहे.
ही कविता कोणावर टीका करण्यासाठी नाही. मोबाइल बाजूला ठेवा, असं सांगण्यासाठीही नाही. ही फक्त आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नकळत घडत गेलेल्या बदलांकडे एक शांत नजरेने पाहण्याचा प्रयत्न आहे. कारण कधी कधी बदलाची सुरुवात मोठ्या निर्णयाने होत नाही; ती फक्त एका क्षणाच्या जाणीवेने होते.
त्या जाणीवेच्या प्रवासातील काही कवितारुपी शब्द...
डोळे थकतात, मन सैरभैरते.
स्क्रीनवर जग धावतं पुढे,
आपण मात्र मागेच राहतो तिथे.
एक पोस्ट, मग दुसरी करत क्षण हरवतो.
हातात मोबाइल, मनात कोलाहल,
शांततेचा पत्ता मात्र शून्यच राहतो.
इतरांच्या हसण्यात आनंद शोधतो,
स्वतःच्या मनाशी बोलणं टाळतो.
Status रंगीत, आयुष्य फिकं,
तुलनेच्या गर्दीत हरवतं अस्तित्व एकटं.
निसर्ग बाहेर, आपण आत,
आभासी प्रकाशात हरवलेले हात.
आकाश निळं, पण नजरेत नाही,
स्क्रीनचं आकाश मात्र सतत सोबत राही.
जवळची माणसं जवळ असून दूर,
स्क्रीनवरची नाती मात्र रोजच हजर.
घरात संवाद कमी होत जातो,
Notification चा आवाज मात्र वाढत जातो.
सेकंदागणिक बातम्यांचा मारा,
कधी भीती, कधी राग, कधी सारा.
कोमल मन थरथरतं आत,
कठोर मन होतं दगडासारखं घट्ट.
स्क्रोलिंगमध्ये विचार विरघळतात,
भावना हळूच बोथट होतात.
हसणं reaction मध्ये अडकतं,
खरं हसू कुठेतरी हरवतं.
वेळ जातो, पण कळत नाही,
आज संपतो, उद्या सुरूच राही.
आयुष्य live असतं बाहेर कुठे,
आपण replay मध्ये अडकलेलो इथे.
आभासी गर्दीत श्वास अडखळतो,
मन मात्र काहीतरी शोधत राहतो.
अचानक शांततेची हलकी जाणीव,
आणि आत कुठेतरी… काहीतरी उमजतं.
त्या उमजण्यात काही सांगणं नसतं,
काही बदलायचंही नसतं,
फक्त आत कुठेतरी हलकं वाटतं,
आणि तेवढंच पुरेसं ठरतं.
- अनुप्रिया सावंत


No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.