Monday, 15 June 2020

"Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."



          बऱ्याचदा आपल्याला हवं तसं घडतच असं नाही.  मनासारखी गोष्ट घडली नाही, तर मन अगदी नानाविध विचार करायला लागते.  जर ह्या मनाला विचार करण्यासाठी, नकारात्मक विचार असतील, तर मग मनाचे आणि डोक्याचे(बुद्धी) अगदी तुंबळ युद्ध जुंपते.  हा अगदी प्रत्येकाला येणारा अनुभव आहे.  बऱ्याचदा एखादा नवीन विषय अचानक समोर आला की, व्यक्तीची कशी तारांबळ उडते. त्यात विषय नावडता असेल, तर मनःस्ताप ठरलेला असतो. आणि जर विषय आपल्या मनाच्या विरुद्ध टोकाचा असेल तर मग स्वभाव, मन, बुद्धी ह्यांना भेदत डोक्याचा भुगा.  मैत्रीच्या भाषेत बोलायचं तर डोक्याची दही नक्कीच होते.  बरेचदा गोष्टी खूप छोट्या असतात.  पण मनाला त्या छोट्या गोष्टी अगदीच, आता पेलवत नाही असे होऊन जाते.  ह्याला प्रामाणिक कारण एकचं, आपण स्वतःला खूप कमी संधी देतो असं वाटतं. 


     एखादा वैयक्तिक पातळीवरील निर्णय घ्यायचा म्हंटलं की, सामान्यातला सामान्य जीवसुद्धा अगदी कासावीस होतो.  मग ती गोष्टी छोटी असली तरीही. गोष्ट विचारांच्या मर्यादेपलीकडे असेल, तर मग ह्या कासावीस जीवाला खऱ्या अर्थाने गरज लागते ते आपलेपणाची.  हे 'आपलेपण' म्हणजे काय?  माझे मित्र-मैत्रीण, आई-बाबा, नातेवाईक, आप्त ह्यांच्याशी जिव्हाळा, संवाद म्हणजे 'आपलेपण'.  हे जरी खरे असले, तरी खरे 'आपलेपण' हा स्वतःचा-स्वतःशी, मनाचा-बुद्धीशी असलेल्या योग्य सुसंवादाशी असतो.  ह्या कासावीस होणाऱ्या जिवाला जशी कोणाच्या तरी आधाराची गरज असते, तशीच त्याला स्वतःचा स्वतःशी असलेल्या आधाराची सुद्धा तितकीच गरज असते. राहतो प्रश्न तो स्वतःला ओळखण्याचा.  फार काही फिलॉसॉफी पद्धतीत नक्कीच नाही व्यक्त व्हायचंय.  सर्वात जवळचा मित्र, म्हणजे आपल्या गाठीशी असलेला अनुभव.  सोबत ह्या अनुभवाला असलेली बुद्धीची उचित सांगड. 


       ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच छूमंतर अजिबात नाहीत.  ह्याला गरज आहे स्वतःला वेळ देण्याची, नीट समजून घेण्याची आणि जी पारख आपल्याला त्यातून होते, त्यातही अनेक दृष्टिकोनातून स्वतःला स्वतः पैलू पाडण्याची नितांत आवश्यकता आहे.  अनेक अनुभवातून प्रत्येक जण शिकत असतो. हे अनुभव, आपण आपल्या आयुष्यात कसे वापरतो? हे महत्वाचे आहे.  कारण तेही तितकेच आपल्या मनाला आशावादी बनवण्यासाठी प्रेरित करत असतात. 


    अशा फिलॉसॉफिकल गोष्टी आपण जेव्हा समोरच्याला सांगतो किंवा आपले मत आपण मांडतो, त्यावेळी बऱ्याचदा आपणही त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो.  It's OK.  काही हरकत नाही.  Just Let it beFocus on good changes inside you.  आपल्यातील चांगल्या बदलांवर लक्ष केंद्रित करायला हवं.  ह्यात एक गोष्ट नक्की, 'Acceptance is more important in our life'.  ती गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात स्वीकारणे अधिक महत्वाचे आहे.  कारण 'Change is only constant'.  आपल्या आयुष्यात होणारा 'सातत्यपूर्ण' बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे.  ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या बुद्धीला स्थिर करण्यास आपण स्वतःच स्वतःला मदत करू शकतो.


       'बुद्दिभेद' म्हणजे माझ्या अर्थी, मनाचे आणि डोक्याचे असलेले वाकडेपण.  मन आणि बुद्धी स्थिर नसेल तर शरीर सुद्धा व्याधिमय बनते.  हा बुद्धिभेद बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्यावर हल्ला करण्याआधीच, स्वतःच्या विचारांच्या चुकीची पद्धतीमुळेच आपल्याला विनाशाकडे नेतो.  बऱ्याचदा आपण फार पटकन समोरच्याला आपले रिऍकशन्स देतो.  आपले मत आपण लगेच बनवतो.  आपल्या मृदू, प्रेमळ किंवा काळजीयुक्त स्वभावामुळे का असेना, आपले रिऍक्ट होणं बऱ्याचदा आपल्यालाच त्रासदायक ठरतं.  इतकंच नाही तर  आपण स्वतः देखील एखादी गोष्ट केली की, स्वतःवरही तितक्याच चंचलतेने रिऍक्ट होऊन जातो.  आणि हेच रिऍक्ट होणं, मग आपल्याला विचारांच्या चक्रीवादळात खेचून घेतो.  आणि त्यातून निष्पन्न काय होतं? तर मनाला होणाऱ्या भयंकर वेदना, अस्वस्थता, चलबिचलता, निर्णय शून्यता, आणि परिणामी चुकीचे पाऊल.


          पाऊल वाकडे पडले की, ते पुन्हा मार्गावर आणता येतातही.  पण जर ते चुकीच्या निर्णयामुळे जीवावर बेतले, तर त्याला पुन्हा मार्गावर आणता येऊ शकत नाही.  Nothing is bigger than Life.  आयुष्य हे एकदाच मिळते. कोणत्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा गोष्टीमुळे आपण ते वाऱ्यावर सोडून दिले, तर कसे चालेल?  असे म्हणतात, संधी एकदाच चालून येते, मला असं अजिबात वाटतं नाही.  'संधी ह्या चालून येत नाहीत, तर संधी ही निर्माण करावी लागते.'  कोणीतरी येईल आणि मला संधी मिळवून देईल, असं कधीच होतं नाही.  संकटात जेव्हा सगळे मार्ग खुंटतात, तेव्हा Optimistic (आशावादी) व्यक्तीसाठी हेच संकट संधी बनून स्वतः त्याच्याकडे येते.  जेव्हा कोणत्या कार्याचा बेस (पाया) हा अध्यात्माला सोडून असतो, तेव्हा ह्या संधी त्यांचे सगळेच दारं बंद करून घेतात.  म्हणजे काय? आपल्या मनाचा बुद्धीचा एकमेकांशी संवाद तुटतो आणि तिथे सुरु होतो तो वाद.  वादातून कधीच काही चांगले निष्पन्न होऊ शकत नाही.  आणि राग येणं हे स्वाभाविक जरी असले, तरी त्या रागाला वादाच्या दारात उभं करायचं की नाही?  ते आपल्या हातात असते.  एखादी गोष्ट आपल्याला राग आणणारी असली, की आपण पटकन रिऍक्ट होतो.  आणि हे रिऍक्ट होणं जर चुकीच्या पद्धतीत व्यक्त झाले, तर वाद वाट पाहतच असतो.  कलियुगाच्या चरणात सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल?  तर हा द्वेष, राग, आणि त्यातून निर्माण होणारा वाद.  


         हे सगळे बोलण्यासाठी ठीक आहे असे जरी वाटले, तरी आता ह्यावर खऱ्या अर्थाने विचार करायला हवा.  ह्या सगळ्याचे सकारात्मक अनुकरण झटपट नक्कीच नाही होऊ शकंत.  पण हे सवयीने नक्कीच बदलू शकते.  नुसते सकारात्मक वाचून, बघून आणि लिहून व्यक्ती आशावादी बनत नाही.  तर त्याप्रमाणे त्याला स्वतःला स्वतःवर मेहनत घ्यावी लागते.  ही मेहनत घेणं सोपं नाही, पण अशक्यही नाही.  स्वतःवर चिडण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा, द्वेष, मत्सर, लोभ ह्या मोहमायेत अडकण्यापेक्षा आपल्या 'Nothing is bigger than Life' असणाऱ्या ह्या स्वतःच्या अमूल्य जीवाला संधी द्यायला काय हरकत आहे.  एक गोष्ट मनाशी आपण पक्की बांधली पाहिजे, "संधी ह्या चालून येत नाही, त्या स्वतःला निर्माण कराव्या लागतात."  You have to create it.


       आज माझ्याकडे नोकरी नाही म्हणून मी रडत बसलो, तर चालेल का?  माझा पगार कमी आहे आणि माझा मित्र जास्त कमावतो, असं करत राहिलो, तर घर चालेल का?  घरात कोणी मदत करत नाही म्हणून स्वतःवर चिडचिड करत राग करत बसलो, तर माझा जगणं सुसह्य होईल का?  मला आधी जास्त पगार होता, आता कमी पगारात काम करावं लागतंय, असं करत आहे ती नोकरी सोडली, तर मला पुन्हा नवीन संधी मिळतील का?  असे खूप प्रश्न आहेत, मला - तुम्हाला, आपल्या सगळ्यांनाच.  


       आज लॉकडाऊन चालू होऊन ३ महिने झाले, आधीची परिस्थिती आणि आताची व पुढची परिस्थिती ह्यात नक्कीच बरंच अंतर निर्माण होणार आहे, किंबहुना झाले आहे.  अशा वेळेस मनाचा आणि बुद्धीचा संयम हाताळणे थोडं अवघड आहेच, पण जमणारचं नाही, असं अजिबात नाही.  परिस्थितीला गिव्ह अप(सोडून देत)  करत हतबल होण्यात काहीच अर्थ नाही.  ह्यात तरून जायचे असेल तर 'संधी' निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही.  संधी ही कोणत्याही प्रकारची असू शकेल, ते म्हणजे बुद्धिभेदापासून स्वतःचा बचाव करण्यापर्यंत ते स्वतःला अशाही परिस्थिती 'Optimistic' व्यक्तिमत्त्वाकडे नेण्यासाठी, आपला जोपासला जाणारा छंद ही त्याचाच भाग असू शकेल.  आणि नसेलच काही छंद किंवा नसेलच काही आवड, तर मला माझ्या आयुष्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे.  मग अगदी स्वतःवर सकारात्मक प्रयोग ही त्याचा भाग असू शकेल.  काय वाटतं तुम्हाला? 


        अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना मान्य करून, स्वतःला संधी आपणच दिली पाहिजे.  स्वतःला आपण आहे तसे Accept(स्वीकार) करत, स्वतःवरही प्रेम केले पाहिजे.  दुसऱ्यांना मदत करताना आपल्याला आनंद होतोच.  इतकंच नाही, तर दुसऱ्याचा छोटासा आनंद बघतानाही आपण किती हरखून जातो.  मग आपल्या स्वतःच्या जीवनाला आपण स्वतःच जर हा आनंद मिळवून दिला, तर आयुष्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.  जीवनात कोणीच परफेक्ट नसतात आणि परफेक्शनच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नसतो.  


         इतिहास घडविणाऱ्यांमध्ये सातात्यतेने सकारात्मक वृत्ती होती. त्यांच्या शिकण्यात नाविन्यता होती, अनुभवांचे गाठोडे होते. त्याचा सकारात्मक वापर करून मन आणि बुद्धीवर मिळवलेला, तो विजय म्हणजे हा 'इतिहास'.  आपल्याला आपल्या इतिहासातील  'आदर्श' व्यक्तींची नुसती आठवण जरी आली, तरी अंगावर शहारे येतात.  अभिमान वाटतो आपल्याला आपल्या पूर्वजांचा.  आणि नकळत स्वतःचाही अभिमान वाटतो की, असे थोर संत, नेते, राजे, व्यक्ती आपले इतिहासकार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांनी आपल्याला संदेश तर दिला आहेच, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अनेकानेक संधी दिल्या आहेत.  जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि त्याचे अनेकानेक पैलू आपल्याला प्रत्यक्ष दिले आहेत.  असे म्हणतात, 'जिंदगी का दुसरा नाम ही प्रॉब्लेम है|' पण जर प्रॉब्लेम आलेच नाही, तर जीवनातल्या संधी कळणार तरी कशा? आयुष्यातली सुंदरता अनुभवणार तरी कशी?


          माझी आई आम्हाला नेहमी सांगते, एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाण्याची सहजता आपल्याकडे असायला हवी.  प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला असतात, तुम्ही त्याला कसे पाहता?  ते महत्वाचे.  'श्रद्धा' आणि 'भक्ती' ह्या दोन गोष्टी आणि त्यानुसार असलेले आपले कर्म जीवनात प्रत्यक्ष उतरत असते.  Spiritually आपला strongness आपल्याला सकारात्मक स्पंदन निर्माण करण्यास सहाय्यभूत होतात.  'भक्ती' हा प्रत्येक कार्याचा बेस आहेच, पण 'प्रपंच हाच परमार्थ', हे विसरून चालणार नाही. 


त्यासाठी...

     "Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."

              अनुप्रिया सावंत

Wednesday, 29 April 2020

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)


     तिसरे महायुद्ध सदरात अनेक वेगळे विषय विशिष्ट घटकांसंदर्भात पाहताना, मुख्यतः तो त्या देशातीलच प्रश्न त्या देशाला भेडसावत होता आणि परिणाम काही अंशी इतर देशांवर पाहायला मिळत होते.  मात्र सध्याच्या ह्या अनप्रेडिक्टेबल परिस्थितीत सगळ्याच घडामोडी विचित्र आणि विक्षिप्त पाहायला मिळत आहेत. लॉक डाऊन हे एखाद्या तत्सुनामी पेक्षाही भयंकर स्वरूप घेऊन आले आहे. सगळेच देश ह्या काळ्या सावलीत अडकल्यासारखे डाऊन मोड वर आहेत. आणि ह्याहून बिकट गोष्ट अशी, की कोणत्याही देशाला ठामपणे ह्याची समाप्ती कालावधी सांगता येऊ शकत नाही. फक्त व्याप्ती दिवसेंदिवस प्रत्येक देशात वाढलेली पाहायला मिळत आहे.


     कोरोना दिवसेंदिवस पूर्ण जगाला विळखा घालत सुटला आहे. आणि त्याचे स्वरूप प्रत्येक देशात तितकीच काळीकुट्ट सावली पसरवत थैमान घालत आहे. पण अचानक ही महामारी आली कशी व कुठून?  की ह्याची उत्पत्ती ही ठरवून केली गेलेली षड्यंत्राची रचना असावी?  खरं तर नाट्यमयपूर्ण रीतीने 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' घेऊन ती साऱ्या जगाला गिळू पाहत आहे. 


     लाखो जणांचा बळी घेणाऱ्या आणि जागतिक अर्थव्यवस्था ठप्प करणाऱ्या ह्या महामारीचा साथीचा उगम झाला आणि बघता बघता सर्वत्र आणीबाणी लागू झाली. जगभरातील १८० हून अधिक देश ह्या विळख्यात सापडले आणि ह्याचे थेट परिणाम नागरिकांच्या जीवनावर आघात करता झाला आहे.  'न्यू वर्ल्ड ऑर्डर' हे नक्की आहे काय?  हे मागच्या भागात आपण वाचलंय.  त्याची व्याप्ती विळखा कशी घालत सुटली आहे हे पाहणे भयंकर आहे.


    लाखोंचा बळी आणि कमकुवत अर्थव्यवस्था ह्याचा फायदा नक्की होणार तरी कोणाला? आणि ह्या मागे नेमका हेतू काय? आणि कशासाठी? उत्तर एकच 'जागतिक महासत्ता'.  पण कोणाची? प्रत्येक देश आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. हो, प्रत्येक देश स्वतः आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षमतेच्या दिशेने वाटचाल करत आहेच.  स्वतःचे लष्कर आणि आधुनिक शस्त्रास्त्रे ह्यांच्या परिपक्वतेसहित आपल्या शत्रूंशी लढण्यास सुसज्ज होत आहेत.  अनेक देश प्रभावशाली ठसा उमठवण्यासाठी सर्व बाजुंनी प्रयत्नशील आहे.  मग ते आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय कोणत्याही पातळीवरची समस्या असो, स्वतःच्या आत्मनिर्भरतेसाठी तयारच आहेत.  पण युद्ध हे विविध पातळींवर त्यांच्या विशिष्ट रूपात आकार घेत असते. सध्या चाललेली पॅनडेमिक स्थिती आणि युद्ध ह्याचा नेमका संबंध काय? हा प्रश्न बराच जणांना पडला असावा.


     आताच्या घडीला देखील 90 टक्के जनतेला तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे, ह्याची सुतरामही जाणीव नाही. आणि हे तिसरे महायुद्ध केव्हाच सुरू झाले आहे, ह्याची ओळखही फार कमी जणांना असावी. कारण युद्ध म्हंटलं तर ते देशाची सीमा हल्ला, बॉम्बहल्ला, शस्त्रास्त्रांचा मारा ह्या भोवतालीच आणि ह्या संदर्भाला लागूनच असते अशी समजूत आहे.  जैविक युद्ध हाही एक युद्धाचा प्रकार आहे. आधुनिक शस्त्रात्रे म्हणून ह्याचा वापर ह्या आधी झालेला आहे. आणि त्याचा प्रभाव संपूर्ण जगाने अनुभवलाही आहे.  जैविक हल्ला करून समाजात, पर्यायाने देशात अस्थिरता माजवणे, असंख्य बळी घेणे आणि आर्थिकदृष्ट्या त्या देशाला कमकुवत करणे म्हणजे पाया ढासळण्यास षड्यंत्राद्वारे युद्धनीती आखणे.  हो, संदर्भ पहाल तर 'प्लेगची साथ'.


     याच प्लेगने चीनमधील दोन तृतीयांश लोकसंख्या नष्ट केली होती आणि तो युरोपात पोहोचला. मग युरोपातील एकतृतीयांश लोकसंख्याही त्याने झटपट नष्ट करून टाकली.  त्यात तरुण, वृद्ध, गरीब, श्रीमंत वगैरे सर्व प्रकारचे लोक सापडले. 


     हल्लीच, डॅन ब्राउन लिखित इन्फर्नो पुस्तक वाचनात आलं.  अर्थात हे पुस्तक सध्याच्या ह्या Pandemic परिस्थितीला वाचायला मिळणं म्हणजे हा नक्कीच योगायोग नसावा. 'Coincidence is nothing but God creations.'


    ह्या पुस्तकात आलेल्या व्हेनिसच्या वर्णनात प्लेगची साथ व्हेनिसमध्ये पसरल्यावर, तिथे जो हाहा:कार उडाला त्यात एवढी मोठ्या प्रमाणात माणसं मेली की, त्यांना पुरण्यासाठी कुठेही कोरडी जमीन व्हेनिसमध्ये उरली नाही.  शेवटी प्रेते कालव्यात फेकून दिली जाऊ लागली.  अशी बरीच प्रेते कालव्यात तरंगत रहात.  काही ठिकाणी तर त्यांची एवढी दाटी व्हायची की, मोठमोठ्या ओंडक्यांच्या साहाय्याने ती प्रेते ढकलत, ओढत समुद्राकडे नेऊन तिथे सोडून दिली जायची. त्यामुळे प्लेगचा जोर किंचितही ओसरला नाही. नंतर नगराधिकाऱ्यांना कळून चुकले की, उंदरांकडून प्लेगचा प्रसार होतो.


     व्हेनिसने बंदरात येणाऱ्या सर्व परकीय जहाजांना किनाऱ्यापासून काही अंतरावर किमान ४० दिवस थांबून रहाण्याचा हुकूम काढला.  नंतरच त्यांना बंदरात येण्यास परवानगी दिली जाऊ लागली.  आजही इटलीत असे रोगराई पसरवणारे संशयित जहाज आल्यास त्याला ४० दिवस वेगळे ठेवले जाते.  त्याला इटालियन भाषेत ‘क्वॉरन्ट’ असे म्हणतात. त्यातूनच इंग्रजीत quarantine –‘क्वॉरन्टाईन’ हा शब्द आला.


  इतिहासात इस्तंबूलमध्ये अनेक वेळा भयानक प्लेगच्या साथी उद्भवलेल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पावल्याने लोकसंख्या कमी झाली होती. प्लेगच्या साथीच्या शेवटच्या काळात जेव्हा कहर झाला होता, तेव्हा तर इस्तंबूल शहराला, ‘प्लेगचे केंद्र’ असे लोक म्हणू लागले.  एकदा तर एका दिवसात १० हजार रहिवासी मृत्युमुखी पडले होते.  ऑटोमान साम्राज्याच्या काळात जी चित्रे काढली गेली, त्यात अनेक चित्र प्लेगवरची होती.  ती पुढे खूप गाजली.  एका चित्रात तर तक्सिम नावाच्या मैदानापाशी प्रेतांचे ढीग रचलेले होते आणि ती प्रेते पुरण्यासाठी लोक बेभान होऊन अनेक खड्डे खणताना दिसत होते. (इन्फर्नो)


   ह्याच पुस्तकातील मुख्य खलनायक असलेल्या झोब्रिस्टने ‘मानव संहाराचे घड्याळ’ सादर केले होते. त्याच्या म्हणण्यानुसार लोकसंख्यावाढीवर मर्यादा घालण्यासाठी आनुवंशिक शास्त्राची मदत घेऊन एखादा असा उपाय शोधायचा की, ज्यामुळे कोणाचाही रोग, व्याधी, दुखणे हे बरे न होता, उलट रोग, व्याधी आपोआप त्यांच्यात निर्माण होतील. रोग बरे होणार नाहीत, पण ते वाढतील असे करायचे. आहे की नाही भयंकर? आता आपण बोलू हे फक्त पुस्तकी कथेत आहेत.  पण, खरंच तुम्हाला वाटतं असं? 


     त्याने असे प्रतिपादन केले होते, प्रगत तंत्रज्ञानानुसार अनेक रोग निर्माण करणारा एक असा संकरित विषाणू किंवा जंतू निर्माण करायचा की, त्यावर आपल्या आधुनिक औषधशास्त्रात कसलाही उपाय असणार नाही.  आताच्या परिस्थितीला हे वाक्य आणि ह्या गोष्टी अगदी वास्तव आहेत. 


  'परदेशातील चैनीच्या वस्तूंची समाजात आवड असल्यामुळेच शेवटी विनाश होतो. त्यामुळेच तो महाघातक प्लेग चीनच्या लोकांमधून व्हेनिसमध्ये व्यापारी जहाजातील उंदरांमधून प्रवास करीत उगवला.' ह्या पुस्तकातील हे वाक्य वाचलं आणि जाणीव झाली, चीनची असलेली महत्वकांक्षा सर्व जगावर महासत्ता स्थापन करण्याचं, स्वतःचं शक्तिशाली वर्चस्व प्रस्थापित करण्याचं.  आणि दिसले ते चीनने त्यासाठी विस्तारलेले जाळे. अगदी खरं आहे हे सर्व. (5G, टिकटॉक, चीप टेक्नॉलॉजि, लो मार्केट व्हॅल्यू)


   सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा विळख्यात अडकला आहे.  जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जवळ जवळ सगळेच देश ह्या व्हायरसचा प्रदूर्भावात आहे. असे असूनही ह्याच व्हायरसचा वापर अगदी युद्धातील शस्रासारखा करण्यात कित्येक देश गुंतले आहेत.  चीनविषयी सांगायचं तर एखादी लांबलचक यादी तयार होईल.  सध्या चीनच्या ह्या उपद्व्यापामुळे इतर देशातील घडणाऱ्या घडामोडी बघता, युद्ध काय स्वरूपात आकार घेतंय?  ते लक्षात येईल.


    चीनचा खास मित्र असणाऱ्या म्हणजे म्हणाल तर घरचा पाव्हनां असणारा पाकिस्तान चीनच्या सहाय्याने अनेक कारस्थान करत आहे.  अर्थातच तो एक मोहरा आहे आणि त्या प्यादाला हलवणारा चीन त्यातूनच आपले कुटील हेतू विस्तारतो आहे. चीन संदर्भात अमेरिकेने वारंवार लक्ष वेधले आहे. 


     अण्वस्त्रांंसाठी लागणारे साहित्य चीन मधून घेऊन पाकिस्तानला निघालेले जहाज आपल्या भारताने अडवले होते व त्यातील साहित्य जप्त केले.  यामुळे चीन व पाकिस्तानचे छुपे आण्विक सहकार्य पुन्हा एकदा जगाच्या समोर आले होते. पाकिस्तानला कितीही समज दिली किंवा अद्दल घडवली तरीही त्यात काही बदल होण्यासारखे नाही.  काही गोष्टी मुळासकट उखडावे लागतात. जग संकटाच्या खाईत असताना आणि मुळात स्वतःच्या देशात रुग्णांसाठी बेसिक सुविधाही उपलब्ध न करणाऱ्या पाकिस्तानने मात्र अरबी समुद्रात जहाजभेदी क्षेपणास्त्राच्या चाचण्या केल्या. तसेच काश्मीर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रे तैनात केल्याचेही वृत्त आहे. सर्वात चीड आणणारी गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आपल्याच कोरोनाग्रस्तांचा वापर आतंकवादांप्रमाणे चालवला आहे. सीमेचा वापर करून अशा कोरोनाग्रस्त रुग्णांना त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी जैविक हल्ला अंतर्गत त्यांचा वापर केला जात आहे. 


  सर्वत्र लॉकडाऊन असताना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात  काबुलमधील शिखधर्मीयांच्या गुरुद्वारावर झालेला दहशतवादी हल्ला. हल्ल्याशी संबंधित व्यक्तीला पकडल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तान सरकारला त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली होती.  कशासाठी?  म्हणजेे हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा संबंध अधोरेखित होत आहे.


     पाकिस्तानातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या २८१ पार आहे तर साडेतेरा हजाराहून अधिक रुग्ण पाकिस्तानात आहेत. पुढच्या काळात या साथीचा भयंकर विस्फोट पाकिस्तानात होईल, अशी भयावह शक्यता या देशातील वैद्यकीय तज्ञ व पत्रकार वर्तवित आहेत.  कारण इतकं होऊनही हा एकमेव देश असावा, जो कोरोनव्हायरस आणि लॉकडाउन ह्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असे मानतो.  संपूर्ण लॉकडाऊनच्या ऐवजी स्मार्ट लॉकडाऊन करायला हवा, असे ह्यांचे म्हणणे आहे.  मात्र नक्की काय? त्याचे तपशील काही त्यांनी उघड केलेले नाहीत.


   तुर्की आणि सीरिया ह्यांच्यातील वाद व संघर्ष आपल्याला माहीतच आहे. अस्साद राजवट आणि तेथील चाललेले खरे खोटे संघर्ष ह्याबद्दलही आपल्याला वृत्तपत्रातून हळू हळू माहिती होत चालली आहे.  सीरिया हा मध्य पूर्वेतील देश त्याच्या बाजूला लेबेनॉन, भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कीस्तान, पूर्वेला असलेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैऋत्येला असलेला इस्राईल देश. 


  तुर्की लष्कर व समर्थक बंडखोरांनी सीरियन लष्करावर नवे हल्ले चढविले आहेत.  संयुक्त राष्ट्रसंघाने ‘कोरोनाव्हायरस’ साथीच्या पार्श्वभूमीवर सिरियात संघर्षबंदीचे आवाहन केले असतानाही तुर्कीने हे हल्ले केले.   तुर्की सरकारने सिरियातील अस्साद राजवट तसेच कुर्दवंशियांना सातत्याने विरोध केला असून त्यांच्याविरोधात संघर्ष कायम ठेवण्याची धमकी वारंवार दिली आहे.  या मुद्यावरून तुर्कीचे अमेरिका व रशियाशी सातत्याने खटके उडाल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे.

    तुर्कीचा युरोपीय देशांशी करार झाला आहे, त्यानुसार सिरिया व इतर देशातील निर्वासित तुर्की सामावून घेण्यास तयार आहे, कारण त्यासाठी युरोपीय देशांकडून तुर्कीला मोठे अर्थसहाय्यही मिळत आहे. मात्र सिरियावर अशा परिस्थितीत हल्ले करून तुर्कीने कराराचे उल्लंघन केले आहे.  इतकेच नसून पाकिस्तान प्रमाणेच तुर्कीही कोरोनाबाधित व्यक्तींना ग्रीसमधून युरोपीय देशांमध्ये घुसवत आहे आणि ह्याचा खुलासा सॅटेलाईट फोटोमार्फत ग्रीस सरकारकडून झाला आहे.


    तुर्कीच्या ह्या वागण्यावर संताप व्यक्त करत सुरक्षिततेसाठी ग्रीसच्या सागरी सुरक्षेला अधिक धोका निर्माण होऊ नये म्हणून, लढाऊ विमाने व युद्धनौका ह्यांची मागणी ग्रीसच्या संरक्षण मंत्र्यांनी नाटोकडे केली आहे.  नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) ही जगातील अनेक देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे.  


    अमेरिकेकडून या स्वरूपाचा दर्जा हा एखाद्या मित्रराष्ट्राला दिला जातो.  यासाठी काही निकष त्यांनी ठेवलेले आहेत.  ‘नाटो’चा सदस्य नसला, तरीही ज्या देशाचे अमेरिकेशी घनिष्ट लष्करी वा संरक्षण संबंध आहेत, अमेरिकेच्या लोकशाहीचा प्रसार, दहशतवादाचा सामना करणे या उद्दिष्ष्टांमध्ये जो देश मदत करतो, त्या देशाला हा दर्जा दिला जातो.  अशा प्रकारचा दर्जा दिल्यामुळे या राष्ट्रांबरोबर घनिष्ट लष्करी संबंध प्रस्थापित करण्याची परवानगी मिळते.  तसेच अमेरिका त्या राष्ट्राबरोबर मोठ्या प्रमाणावर संरक्षण क्षेत्रातील व्यापार करू शकते. हे वाचून नक्कीच लक्षात येते, ते म्हणजे अमेरिका हा एक महाशक्तीशाली देश आहे. त्यामुळे तुर्कीवर असणारी नाराजी आणि तुर्कीचा ह्या देशांकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्याचा सर्वसाधारण अंदाज आपण सर्वसामान्य नागरिक तर नक्कीच बांधू शकतो.


    कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर सिरियात संघर्षबंदीचे आवाहन केले असतानाही तुर्कीने हल्ले केले.  तुर्की सरकारने सिरियातील अस्साद राजवट तसेच कुर्दवंशियांना सातत्याने विरोध केला असून त्यांच्याविरोधात संघर्ष कायम ठेवण्याची धमकी वारंवार दिली आहे.  ह्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशिया ह्यांचे तुर्कीशी खटके उडत आहेत. नाटोचा सदस्य असलेला हा शत्रू एकेकाळी रशियाचा मित्र होता मात्र पुन्हा तुर्कीचे रशिया आणि अमेरिकेशी असलेले संबंध बिघडत आहेत. 


    ‘लाखो जणांचा बळी घेणाऱ्या आणि जागतिक अर्थव्यवस्था ठप्प करणाऱ्या ह्या कोरोनाव्हायरस. ह्याचा उगम चीनमधील वूहान शहरातून झाल्याचे बोलले जाते.  पण कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे हे सत्य अजून अंधारातच आहे. ह्याविषयी डिसेंबर महिन्यातच चीनकडे या साथीची माहिती होती, पण चीनने जाणीवपूर्वक ही माहिती दडवून ठेवली. 


    2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनला या विषाणूची पूर्ण माहिती होती.  या साथीचे सत्य जगापासून दडपवण्यासाठी चीनने जे काही केले, त्याचा लांबलचक पाढा वाचला जाईल.  30 डिसेंबर रोजी एका वेगळ्याच विषाणूचा रोगी चीनमध्ये सापडला होता. त्यासंदर्भात सर्वप्रथम वुहान मध्ये आढळून आलेल्या न्यूमोनियाविषयी कोणतीही माहिती बाहेरील जगामध्ये उघड करण्यास बंदी आणण्यात आली.  इतकेच नाही तर त्याबद्दल वाच्यता करण्याऱ्यांवर कारवाईचे आदेश निघाले.  खरं तर जाणीवपूर्वक चीन हा न्यूमोनिया रोग आहे असे सांगून दिशाभूल करत होता.  नंतर पुन्हा नावे बदलून दिशाभुल करण्यात आली.


    डॉक्टर ली वेनलियांग (Li Wenliang), वय ३४ वर्षे फक्त. पेशाने नेत्रतज्ज्ञ (ophthalmologist). चीनच्या वूहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये कामाला होते. हे तेच वुहान जिथून हा कोरोना व्हायरस जगभर पसरला. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये तापाने ग्रस्त लोकं यायला सुरुवात झाली. बऱ्याच लोकांमध्ये सारखेच लक्षणं आढळल्याने त्यावर संशोधनाअंतर्गत डॉक्टर ली वेनलियांग ह्यांना हा आजार इतर आजारापेक्षा वेगळा आणि भयंकर आहे ह्याचा पूर्ण अंदाज आला होता.  त्यांनी यासंदर्भात जागृती करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र हुकूमशाही प्रशासनाचा प्रभाव त्यांना आणि कालांतराने जगाला मारक ठरला. खोट्या अफवा आणि शांतता भंग ह्यांचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. इतकेच नाही तर ह्या व्हायरस संदर्भातील त्यांचे सोशल मीडयावरील सगळे ट्विट्स, पोस्ट डिलिट करण्यात आले. पण सोशल मीडियामुळे ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. मात्र दुर्दैवाने डॉक्टर ली ह्यांनाच ह्या विषाणूची लागण झाल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. 


    डॉक्टर ली यांनी जगाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण मुर्दाड व्यवस्थेनं त्यांचा जीव घेतला आणि आज जग वेठीस धरल गेलंय.  हे कोणामुळे? आणि मुळात ही गोष्ट कशासाठी? सगळ्या गोष्टीच्या खोलीत जेवढं जाऊ तेवढं केंद्रबिंदूला चीनचा विक्षिप्त कहर सापडत आहे. 


    ३० डिसेंबर रोजी पहिला रूग्ण मिळाल्याचे स्पष्ट होऊनसुद्धा त्याविषयी कोणतीही माहिती चीन सरकारतर्फे देण्यात आली नव्हती. पण शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत होती. टीकेचे लक्ष होऊ नये म्हणून वुहान मध्ये मिळालेला व्हायरस हा वटवाघळामुळे होतोय, कारण जिनोम क्रम मिळताजुळता आहे असे सांगण्यात आले.  म्हणजे हा व्हायरस नैसर्गिक आहे, हे चित्र उभं करण्याचा प्रयत्न. 


    पुन्हा एक गोष्ट अधोरेखित होते, की मानवनिर्मित जैविक शस्राचा वापर करून काय उत्पात माजवता येतो.  बॅक टू पॉईंट अगेन.  चीनमध्ये भक्ष्य आणि भक्षक हा जणू फरकच नसावा. कोणताही जीव हे विकृत लोक सहज खातात. नुसतं चीनच्या मार्केटवरील विडिओवर नजर जरी फिरवली तरी माणसाला किळस येईल इतकी राक्षसी वृत्ती.  ह्या मार्केट मधून हा व्हायरस पसरला गेला आणि त्यामुळे इथूनच ती साथ वाढत गेली असा निष्कर्ष चीन सरकारने लोकांपुढे मांडण्यास सुरुवात केली. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जाणीवपूर्वक वुहान बाजारात कधी गेला होता का? हे प्रश्न विचारून त्यांच्यावर बिंबवण्यात आले, पर्यायाने जगाला गुंडाळण्याचा हा कुटील डाव.  त्यानंतर २३ जानेवारी रोजी वुहान शहरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली.


   संस्थेमध्ये काम करणाऱ्यांची अवस्था त्याहूनही बिकट होती. डॉक्टर ली वेनलियांग ह्यांच्याबाबतीत घडलेली घटना पाहून अनेक जण समोर येण्यास धजावत होते. मात्र जनतेच्या संतप्त भावना, प्रतिक्रिया किती वेळ सरकार दाबून ठेवू शकते.


     ह्या व्हायरसची निर्मिती वुहान संस्थेतच झाली असून, तिथूनच हा पसरला हे स्पष्ट आपल्या खऱ्या नावानिशी शु बो यांनी जाहीर केले. आणि तिथून भरभर गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली. त्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी चिनी लष्कराचे बायोवेपन्स (जैविक शस्त्रात्रे) तज्ञ चेन वा ई यांची संस्थेची सूत्रे हाती घेतली गेली आणि एका आठवड्यात म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी शी जिन पिंग यांनी देशाच्या संरक्षण आराखड्यामध्ये जैविक सुरक्षा अंतर्भूत केल्याचे जाहीर केले.  आता प्रश्न इथे असा आहे की यासाठी प्रत्यक्ष लष्कराचा हस्तक्षेप का? व कशासाठी घडला?  संकट भीषण होतं म्हणून की लपाछपी म्हणून एकावर एक शंभर खोटं, हा प्रश्न नक्कीच पडतो.


    पहिल्या महायुद्धातही जैविक शस्त्राचा वापर झाला होता जो जर्मन सैन्याने केला होता.  ग्लॅन्डर्स, कॉलरा हे त्यातलेच आहेत. असे बऱ्याच गोष्टी आहेत त्या सर्वच मांडणे शक्य नाही.  (गुगल वर बायोलॉजिकल विपन बद्दल सविस्तर माहिती वाचायला मिळते.)


  'डब्ल्यूएचओ' जागतिक आरोग्य संघटनेने ह्यासंदर्भात गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. उलट चीनचं पितळ उघडं पडू नये म्हणून चीनच्या प्रयत्नांना लपवाछपवी करत अप्रत्यक्षपणे साथ दिली आहे. त्यामुळे रोखू शकत येऊ शकणाऱ्या ह्या उद्रेकाला ह्या संस्थेने मोकळी वाट करून दिली आहे. 'डब्ल्यूएचओ' चे बेजबाबदारपणे वागणे प्रत्येक देशाला महाग पडत आहे.  मात्र यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही अशी सडेतोड भूमिका घेत अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’चे अर्थसहाय्य रोखत आहे, या निधीचा अमेरिका पुढच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने वापर करेल, असे वक्तव्य करून ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’ सहित चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. 


   कोरोनाव्हायरसची साथ अमेरिकेत दाखल झाल्यानंतर निकी हॅले, यांनी चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन या देशाला धडा शिकविण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.  चीन आपला प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवत आहे आणि हा प्रभाव वेळीच रोखण्यासाठी अमेरिकी विद्यापीठातील प्राध्यापक आणि अभ्यासकांना चीनकडून मिळणारे फंडिंग याची माहिती उघड करुन हे फंडिंग थांबविण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने कारवाई करावी’, अशी मागणी हॅले यांनी केली.  अमेरीकेने ग्रीनलँडवर मिळवलेला ताबा हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चीनला थोपवण्यासाठीच आहे.

    
     कोरोनाव्हायरसचे उगमस्थान असलेल्या वुहानमधील लॉकडाउनचे सत्य जगासमोर मांडणाऱ्या चिनी लेखिका ‘फँग फँग’ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यांनी 13 फेब्रुवारी रोजी जगाला हादरवून टाकणारे दफणभूमीतील विदारक सत्य मांडले होते. त्यांच्या डॉक्टर मित्राने पुरविलेल्या फोटोमध्ये मृतदेह आणि मोबाईल फोन ह्यांचा ढीग पडलेला होता.  कोरोना व्हायरस हा मानवी संसर्गाने होत आहे, याबाबत वुहान च्या डॉक्टरांनी आपल्या वरिष्ठांना कळवून सुद्धा कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही आणि जनतेला सावधही केले गेले नाही, हे त्यांच्या डॉक्टर मित्राने त्यांना कळवलं होते, अशा प्रकारचे पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते.  मात्र आता फँग ह्यांचे सोशल मिडयावरील अकाऊंटही बंद केले गेले आहे. तसेच त्यांच्या पोस्टही डिलिट केली गेल्याची माहिती त्यांनी स्वतः स्थानिक माध्यमांना दिली आहे. 


  कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या आड हॉंगकॉंगमधील चीनधार्जिण्या प्रशासनाने १४ लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांना अटक करुन चीन येथील लोकशाही संपविण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका या देशांकडून तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांकडून केली जात आहे.  जितका पाढा वाचू तितका कमीच आहे.


    एवढे कारस्थान करूनही कोरोनाग्रस्त देशाला टेस्टिंग किट्स पुरवण्याची जबाबदारी चीनने घेतली खरी.  मात्र पुरविलेले टेस्टिंग किट्स हे सरळ सरळ सदोष होते. भारतालाही चीनने असेच सदोष किट्स पुरवले त्याचे परिणाम आता चीनला भोगावे तर लागणारच. 


    गेल्याच आठवड्यात भारताने एफडीआय (थेट परकीय गुंतवणूक) नियमात बदल केला आहे.   इतकेच नाही तर चिनी कंपनीची ऑर्डर भारताने रद्द करत चीनला धक्का दिला आहे.  त्यामुळे, टेस्टिंग किट्स हा भारत आणि चीनमध्ये वादाचा नवा मुद्दा ठरू शकतो, अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करीत आहेत. 

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी अधिक वाचण्यासाठी:
http://newscast-pratyaksha.com/


     ह्या संदर्भात अधिक सविस्तर वाचण्यासाठी तुम्ही डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक वाचू शकता.  तिसऱ्या महायुद्धाविषयी लिहिताना डॉ. अनिरुद्ध म्हणतात, “दोन राष्ट्रांमधील लढाई त्या त्या राष्ट्रांमधील प्रत्येक घराच्या अंगणापर्यंत जाऊन पोहोचते व त्यामुळे फक्त दोन राष्ट्रांची सैन्ये लढत नाहीत तर दोन्ही राष्ट्रांमधील प्रत्येक नागरीक या लढाईत सहभागी असतोच.  त्याचप्रमाणे विषारी वायू, जैविक बॉंब (रोगजंतूंचा प्रसार), व प्रचंड कृत्रिम पाऊस पाडून दलदल व सर्वत्र चिखल निर्माण करण्याची क्षमता (अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये जे केले) इत्यादीमुळे संपूर्ण राष्ट्राच्या रोजच्या व्यवहरात थोडीही सुरक्षितता उरत नाही.”


      सध्या चाललेले घटनाक्रम बघता प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवं.  कारण अजूनही लोकांना तिसरे महायुद्ध म्हणजे नेमकं काय? आणि त्याने फार आधीच अक्राळ विक्राळ जबडा उघडला आहे, ह्याची जाणीवच नाही.  आपण जे बघतोय, पाहतोय, आणि ऐकतोय त्याही पलीकडे खूप साऱ्या घडामोडी घडत आहेत.  ह्या घडामोडी कोणत्या पातळीवर आहेत किंवा असतील ह्याचा उलगडा हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला झाल्याशिवाय राहणार नाही.


    'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता.  सध्या हे पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे. तिसऱ्या महायुद्धासंदर्भात वाचकांना नक्कीच ह्यातून अनेक संदर्भ लागणार आहेत आणि माहीत नसलेल्या ह्या घडामोडींचा उलगडा होण्यास मदतच होणार.

तिसरे महायुद्ध 

https://ebooks.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=TWWMAR


    शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समीकरण प्रत्येकाला माहीत आहे.  डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांचे तिसरे महायुद्ध हे 2006 साली प्रकाशित झालेले पुस्तक आजच्या काळाची आणि पुढे घडणाऱ्या घटनांची अगदी अचूक वेध घेणाऱ्या गोष्टींची प्रचिती देणारे आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच डॉ. अनिरुद्ध म्हणतात, “पुढील काळात आजचे समीकरण उद्या असेलच असे नाही, तर अगदी सकाळी सातचे समीकरण सात वाजून पाच मिनीटांनी मूळ हेतू साध्य होताच पूर्णपणे भिरकावून दिलेले आढळणार आहे.” ह्या ओळींचे गांभीर्य आजची सद्य स्थिती पाहताच लक्षात येते.  2006 साली केलेले विश्लेषण किती अचूक वेध घेणारे आहे.

     ह्या पुस्तकाचे लेखक डॉ. अनिरुद्ध स्पष्टपणे मांडतात की, सर्व जगालाही (विशेषतः अमेरिकेला) त्रासदायक ठरू शकणारे एक भयप्रद 'त्रिकूट’ जन्माला आलेले आहे.  चीन, पाकिस्तान व नॉर्थ कोरिया.  हे अभद्र त्रिकूट, त्याला चौथा भागीदार मिळताच संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटणार आहे.  हा चौथा भागीदार इराण, जर्मनी किंवा सिरीया असू शकतो”.

ह्याविषयी अधिक माहिती खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता.



       येणाऱ्या काळात बरीच उलथापालथ होणार आहे, हे एकंदरीत लक्षात येतंय.  तिसरे महायुद्ध हे फक्त देशा देशात चाललेले नाही हे सद्य परिस्थिती नीट जाणून घेतल्यास लक्षात येते.  देशातील लॉकडाऊनमुळे जगभरातील बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे.  रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोजगार ह्या साथीने हिरावून घेतला आहे.  जगभरात ह्या रोगाने लाखोंनी मृत्युमुखी पडलेले माणसे आहेत.  आणि लागण झालेले त्याहून अधिकपटीने आहेत.  पुढच्या काळाविषयी सगळेच अनभिज्ञ आहेत.  असे असले तरी, ना धीर सोडून चालणार ना हतबल होऊन चालणार.  कारण हे युद्ध आताशी सुरू झालेले आहे आणि ते देशांच्या सीमेवरून थेट घरात घुसू पाहत आहे.   आपल्याला जे दिसतंय ते खुप छोटं स्वरूप आहे.  वर उल्लेखलेल्या घटना हे तिसऱ्या महायुद्धाची फक्त सुरुवात आहे.  जगात अनेक ठिकाणी अनेक घटना खूप वेगाने घडत आहे.  
सध्या एकंच करायचं आहे, ते म्हणजे लक्ष्मण रेषा.
Stay Home, Stay Safe.

कारण... Third World War has been started...
  - अनुप्रिया सावंत.

Saturday, 18 April 2020

ई-मेल(E-Mail) २ - ई-मेलचा वापर

          आपला ई-मेल अकाऊंट आपण मागच्या लेखात तयार करायला शिकलो आहोत. आता आपण आपल्या ई-मेलचा वापर कसा करायचा ते पाहुयात.


त्या आधी सर्वात महत्वाचे:

  • सर्वप्रथम तुम्ही तुमचे ई-मेल अकाऊंट ओपन करण्यासाठी तुमचे लॉगिन नेम (Login Name) लक्षात ठेवा.
  • यात तुमचे अक्षर/अल्फाबेट/ अंक/ नंबर तसेच अंडरस्कोर ( _ ) यांचा किंवा यांपैकीं गोष्टींचा समावेश असतो.
  • लॉगिन नेम मध्ये कुठेही मोकळी जागा ह्यालाच आपण स्पेस (Space) म्हणतो, ते येत नाही. आणि सर्वात महत्वाचे पासवर्ड कुठेही शेअर करायचा नाही म्हणजेच कोणालाही सांगायचा नाही.
  • तुमच्या युजरनेम किंवा ई-मेल आयडी तुम्ही लिहिता, तेव्हा त्यात '@' हे चिन्ह असते. ह्याला 'ऍट द रेट ऑफ' असे म्हणतात. ह्याचा वापर तुमचे युजरनेम आणि वेबसाईट नेम यांना वेगळे ठेवण्यासाठी वापरला जातो.
         उदाहरणार्थ, आपण जीमेल म्हणजे गूगल अकाऊंट बनवला आहे.  त्यात 'gmail. com' लिहिलेले दिसतंय        ते वेबसाईट नेम आहे किंवा त्याला सर्व्हर नेम असेही म्हणतात.  त्यामुळे तुमचे अकाऊंट किंवा आपले इ-मेल अकाऊंट कुठल्या सर्व्हरवर आहे, हे ओळखण्यासाठी होतो.
  • आपले अकाऊंट एकदा का ओपन झाले, की मग मात्र आपण कुठूनही आणि कितीही वेळा ते ओपन करु शकतो किंवा केव्हाही इमेल करू शकतो.  मात्र ह्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.


बॅक टू टॉपिक.

वेब ब्राऊझर (Web Browser - Crome/Internet Exolorer) वर क्लिक करा.


www.gmail. com हा साईट अड्रेस, आपल्या अड्रेस बार मध्ये टाईप करा (अड्रेस बारची माहिती मागच्या लेखात पाहिली आहे) आणि एंटर(Enter) की दाबा. 

युजर नेम आणि पासवर्ड टाईप करा व साइन इन (Sign in) वर क्लिक करा.


     मला माझा जीमेल एक्सेस मिळत आहे. म्हणजेच माझं अकाउंट वरील कृतीद्वारे ओपन झालेले आहे.

     आता मला मेसेज पाठवण्यासाठी ई-मेल वापर सुरू करायचा आहे. खालील स्क्रिनमध्ये मी लाल रंगाने वर्तुळ केलेले आहे.   त्याला कंपोस(Compose) म्हणतात.

( हे सध्याच्या अपडेट वर्जन नुसार आहे. ज्यांना ह्याप्रमाणे दिसत नसेल त्यांनी Compose Mail / Write Mail ह्या आयकॉन वर क्लिक करावे.)


          Compose बटन दाबल्यानंतर आपल्याला एक छोटी विंडो ओपन झालेली दिसेल. New Message ची स्क्रीन आपल्याला खालील चित्रात पाहायला मिळेल.

     आता इथें ज्याला मेसेज पाठवायचा आहे, त्याचा इमेल आयडी आपल्याला माहीत असणे आवश्यक असते.  ह्यातील महत्वाच्या बेसिक सेक्शनची माहिती आपण जाणून घेऊयात.


To

ह्या सेक्शन मध्ये आपण आपल्याला ज्या व्यक्तीला ई-मेल करायचा आहे, त्याचा इ-मेल आयडी लिहिणार. 


Subject

आपल्याला कशा संदर्भात ई-मेल करायचा आहे, तो विषय ह्या रकान्यात लिहायचे असते.


     महत्वाची गोष्ट इथे अशी की आपण -मेल करताना तो एकाच वेळी अनेकांना देखील पाठवू (send) शकतो. म्हणजेच जर मला एकच मेसेज किंवा माझा निरोप 10 जणांना सारखा आणि एकाच वेळी पाठवायचा असेल, तर मी एकाच इमेलद्वारे ते करू शकते. पण प्रत्येक ईमेल आयडी पूर्ण (xyz@gmail.com) लिहिताना, मला तो ईमेल आयडी किंवा ईमेल ऍड्रेस लिहून त्याच्यानंतर लगेच सेमी कॉलन (;) वापरून क्रमशः पाठवावा लागतो. म्हणजे प्रत्येक अड्रेस वेगळा आहे, हे कळण्यास संगणकाला मदत होते.  नाहीतर आपला ईमेल ऍड्रेस चुकीचा होतो आणि तो ईमेल आपल्याला ज्याला पाठवायचा आहे त्याच्या पर्यंत पोहचू शकत नाही.


Example: 

अशा प्रकारे लिहितात:
123@gmail.com; we@yahoo.co. in



खालील आकृतीमध्ये आपल्याला To नंतर CC, BCC हे दोन सेक्शन दिसत आहेत. 

CC : कार्बन कॉपी 

आपण एखाद्याला ईमेल केल्याचा पुरावा दाखविण्यासाठी वापरण्यात येणारे सेक्शन आहे.
     
बऱ्याच वेळेला महत्वाच्या व्यक्तींना किंवा अशी व्यक्ती ज्यांना आपण अमुक व्यक्तीला ईमेल केला आहे आणि काही महत्वाच्या गोष्टी त्यात आहे, त्याची माहिती त्या महत्वाच्या व्यक्तींना असावी ह्यासाठी ह्याचा वापर होतो. 

उदाहरणार्थ,
     ह्याचे डे टू डे लाईफ मधील घडणाऱ्या गोष्टींचे सोपे उदाहरण सांगायचं झालं तर बऱ्याचदा आपण ऑनलाईन पैसे पाठवताना पैसे बँकेतून कापले जातात, पण ते पैसे ट्रान्सफर म्हणजे दुसऱ्या अकाऊंटला मिळत नाही. मग अशा वेळी आपल्याला बँकेत कॉलद्वारे आणि ई-मेलद्वारे ह्याचा पाठपुरवठा करत राहावा लागतो. ह्या महत्वाच्या वेळी आपण ज्याच्याशी संभाषण साधत असतो त्या व्यक्तीशी संभाषण देवाण घेवणीचा एक रेकॉर्ड आपण त्याच्या वरिष्ठांना त्यांच्या इमेल आयडीद्वारे CC मध्ये ठेवून करू शकतो. जेणे करून ह्या फॉलोअप प्रोसेसमध्ये कामाची गती वाढते आणि एक प्रकारची जबाबदारी राहते, की आपण जे काम करतोय त्याची नोंद ह्या CC म्हणजे कार्बन कॉपी द्वारे वरिष्ठांनाही जात आहे.


BCC: ब्लाईंड कार्बन कॉपी

     तोच ई-मेल जर आपल्याला अशा तिसऱ्या व्यक्तींना पाठवायचा आहे, जेणे करून ह्या ई-मेलमधील माहिती अशा तिसऱ्या व्यक्तीलाही CC प्रमाणे मिळावी मात्र ही व्यक्ती गुपित असावी. थोडक्यात BCC मध्ये असलेले ई-मेल आयडी इतर युजर्स किंवा इतर व्यक्तींना दिसू शकत नाही.

Attachment (अटेच्मन्ट): ई-मेल सोबत बऱ्याच वेळेला आपल्याला एखादे डॉक्युमेंट्स किंवा एखादी फाईल (उदाहरणार्थ - वर्ड फाईल, फोटो, प्रेझेन्टेशन किंवा साऊंड फाईल्स) पाठवायची असेल तर ह्या अटेच्मन्टचा वापर करून आपण आपली फाईल त्याला जोडून घेऊन पाठवू शकतो.


खालील आकृती पहा:

      Attachment (अटेच्मन्ट) वर आपण क्लीक केल्यानंतर आपल्याला आपल्या संगणकातील/ लपटॉपमधील फाईल व फोल्डर्स पाहायला मिळतात. त्यानुसार आपल्याला ज्या फाईलची जोडणी करायची आहे ती फाईल ओपन करून आपले डॉक्युमेंट्स attach करू शकतो.
 

खालील आकृतीमध्ये आपल्याला Attach Files वर क्लीक केल्यानंतरची विंडो पाहायला मिळते.

वरील सर्व कृती मधून आपण ई-मेल लिहिण्यासंदर्भात व त्यातील विविध सेक्शन संदर्भात पाहिलं. आता आपण आलेले ई-मेल म्हणजे आपल्याला कोणी ई-मेल केला आहे, तो पाहण्यासाठी काय करतात ते पाहुयात.


Inbox (इनबॉक्स)

     खालील आकृती मध्ये लाल वर्तुळातील शब्द आपण पाहतोय - Inbox (इनबॉक्स). 

   हे Inbox(इनबॉक्स) हे एक फोल्डर आहे, ज्यात आपल्याला आपल्या इमेल आयडीवर येणारे सर्व ई-मेल्स असतात आणि हे ई-मेल्स एका खाली एक अशा पद्धतीने असतात.  सगळ्यांत नवीन आलेला ल आपल्याला सगळ्यात टॉप म्हणजे सगळ्यांत वर अशा रचनेत दिसतो.

     जर आलेला ई-मेल पाहायचा असेल तर काय करणार?  मला इथे एक ई-मेल आला आहे.  तो वाचण्यासाठी मला माझा माऊस पॉईंटर त्या आलेल्या ई-मेलवर नेऊन क्लीक करावे लागेल.  त्यासरशी मला इनबॉक्समध्ये आलेला माझा ई-मेल माझ्या स्क्रीनवर ओपन होईल.


Reply:

आलेल्या ई-मेलला मला काही Reply (रिप्लाय) द्यायचे असेल म्हणजे मला काही त्यांना ई-मेल द्वारे सांगायचे असेल तर मी ह्या Reply बटनावर क्लीक करून त्यांना रिप्लाय इमेल स्वरूपात पुन्हा पाठवू शकते.



Reply All

     रिप्लाय ऑल केल्यास सगळ्यांना रिप्लाय सारखाच आणि एकच वेळेस पाठविला जातो.
     त्याचप्रमाणे ह्यात जर मला इमेल पाठविणाऱ्याने कोणाला CC आणि BCC मध्ये ऍड केले असेल, म्हणजे माझ्यासोबत इतर अनेकांना हाच ईमेल केला असेल, तर मात्र Reply All करताना सगळ्यांनाच माझा रिप्लाय जाऊ शकेल. 

उदाहरणार्थ,

     अनेकांचे वाढदिवस एकाच दिवशी असतात.  बऱ्याचदा आपल्या एखाद्या साईटवरून इमेल येतात, कारण हल्ली सगळं डिजिटीलायझेशन आहे. त्यावेळी व्यक्तिशः डेटा असल्यामुळे त्यांच्या संगणकात प्रत्येक व्यक्तीची नोंदी असते. ज्यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला येतात त्यावेळी कदाचित मेसेज आपल्यासहित इतरही व्यक्तींना म्हणजे ज्यांचा त्याच दिवशी वाढदिवस आहे त्यांना ईमेल अड्रेस मध्ये ऍड करत पाठवला असू शकतो. (ऍड कसे करतात हे आपण अभ्यासले आहे). मग जर अशा वेळी आपण Reply All केला तर तो reply इतरांनाही जाणार म्हणजे त्यात गोंधळ (Miscommunication) होऊ शकतो.

     त्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीला रिप्लाय करायचा असेल, त्यावेळी आपण ह्याची खबरदारी घेतली पाहिजे की तो ईमेल फक्त आपल्यासाठी आला आहे?  की त्यात इतरही ईमेल अड्रेस ऍड आहेत.  आणि जर ऍड असतील तर आपण रिप्लाय करताना तो रिप्लाय त्या मेसेजला अनुसरून असेल ह्याची तितकीच काळजी घेणे आवश्यक असते.



Forward (फॉरवर्ड):

     आलेला मेल जर आपल्याला दुसऱ्या कोणाला पाठवायचा असेल, तर फॉरवर्ड बटनावर क्लीक करून आपण तो इमेल आपल्या इमेलला attach (ऍटेच) होऊन पाठविला जाईल.

     खालील स्क्रीन तुम्हाला  Reply आणि Forward हे दोन बटन दर्शविते, ह्याचे विश्लेषण वर केलेले आहे. 


रिप्लाय बटनावर क्लिक केल्यास त्या व्यक्तीला आपला मेसेज पाठविता येतो.

फॉरवर्ड बटनावर क्लिक केल्यास आपल्याला ज्याला पाठवायचा आहे तो पुढे तसाच आपल्या ईमेल सहित पाठविता येतो.



Draft (ड्राफ्ट):

     खालील स्क्रिनवर आपल्या Draft वर्तुळाकार चिन्हांत दिसत आहे. 

    आपण पूर्ण न लिहिलेला ईमेल, न पाठविता सेव्ह करून ठेवू शकतो. त्यांनतर हवं तेव्हा पुन्हा Draft मध्ये जाऊन ओपन करून केव्हाही पाठविता (send) येतो.



लक्षात ठेवा: 

*  तुम्हाला तुमचे 'लॉगिन नेम' (Login Name) लक्षात असणे गरजेचे आहे.

* लॉगिन नेम लिहिताना कुठेही स्पेस (मोकळी जागा) ठेवत नाही.

* पासवर्ड कोणालाही देऊ नये.

* ई-मेल सुविधा देणाऱ्या कोणत्याही साईटवर ई-मेल अकाऊंट अशाप्रकारे तयार करून त्याचा वापर करता येतो.


     आपण ई-मेल्स करण्यासाठीचे बेसिक महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या आहेत. ह्या आधी आपण ई-मेल कसा बनवायचा हे शिकलो आणि आता त्याचा वापर करायला शिकलो.

     सध्याच्या या जगात प्रत्येकाला संगणकाविषयी बेसिक माहिती असणे जितके गरजेचे आहे, तितकाच त्याचा प्रभावी वापरही आवश्यक आहे. सुरुवात ही छोट्या गोष्टीतूनच होते आणि आपण तर आता नक्कीच छोट्या गोष्टींतून महत्वाच्या आणि तेही उपयोगाच्या गोष्टी शिकत, ह्या आनंदाची देवाण घेवाण करित आहोत. 

      भेटुयात पुढच्या सदरात.

     - अनुप्रिया सावंत.

Friday, 20 March 2020

डब्ल्यूएफएच_लॉकडाउन - कंप्युटर्जी लॉक किये जाय?


  प्रत्येकजण नेहमीच विचार करतो कामाच्या धावपळीत स्वतःला वेळ मिळत नाही त्यामुळे घराकडे लक्ष नाही मुलांकडे लक्ष नाही. फिरणं नाही, घरात वेळ देता येणं नाही नि काही नाही. सुट्टी लागली की पळायचच बाबा! सुट्टी लागल्यावर सगळी काम आवरून मामाच्या गावाला मीही जाणार इथपर्यंत झालेला प्लॅन माझा, मात्र वर्क फ्रॉम होमच्या चार भिंतीत कधी फ्रेम झाला हे कळलंच नाही.

     सुट्टीच्या आधीच मुलांना सुट्टी! खरं तर उद्गारवाचक चिन्ह प्रश्नार्थक स्वरूपात प्रकट होईल, ह्याची कल्पना माझ्या मी मध्ये आ वासून उभी राहिलीही आणि मला माझ्या वर्तमानात आणून प्रश्नाच्या स्वरूपात कंबरडे मोडल्यावाणीच गत करून गेली. गंम्मत तर करत नाही ना कोणी ह्या आविर्भावातुन बाहेर येते ना येते तोच एकामागुन एक गोष्टी कानावर येऊ लागल्या. परिक्षेपासून सगळंच कसं लॉक झाल्यासारखे डाउन झाले. आणि बघता बघता 'कंप्युटर्जी लॉक किये जाय' सारखे सगळेच घरात स्टे ऍट होम झाले. 

   आता खरी धम्माल घरातून घराकडे आणि पुन्हा घरातच ह्या सर्कशीतील फिलिंग आकाशपाळणावाणी घिरट्या घेती झाली. खरं तर कुठलंही अतिशयोक्ती नसून विविध अलंकारांनी त्याच्या उपमाच्या छायेत वसलेले माझे हे घरकुल आज मला वास्तवाची एकापाठोपाठ फिल्मी रिव्ह्यू देते झाले. हो हो म्हणता पूर्ण शहरच वर्क फ्रॉम होमच्या कचाट्यात आले आणि सुरू झाले नवे पर्व अगदी बोंबलत सर्व.

     घराच्या सवयी नसलेल्या ह्या भिंतीला माणसांची चिवचिवाट उभारी देताना मला जाणवलं खरं. पण सवय नसलेल्या ह्या वातावरणाला सकाळी उठल्यापासून वेळेचं जुळवाजुळवीची गणितं काही केल्या सोडवता येईना. बाजारात तर जत्राच होती जिथे स्पष्टपणे गर्दी टाळा सांगितले असताना सहकुटुंबाला भाजी पाला घेताना मात्र त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह जाणवला. मलाच चुकल्यासारखे वाटलं, आपणही तर आलोच की बाजारात, मग नक्की लॉक डाउन म्हणजे असते तरी काय? बाजार आवरून घरी येते न येते तोच उंबरठा उलडल्यानंतरचा भयंकर पछाताप नवरा मुलांनी माझ्या चेहऱ्यावर येईल ह्याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसली. 

   पसारा आवरताना माझ्या नाकी नऊ येऊन दहाव्याला तोल जातोय तोच साहेबांचा वर्क फ्रॉम होमचा अलर्ट वाजला आणि धावत पळत अग्निदिव्य पार केल्याच्या आविर्भावात नवऱ्याने त्याच्या संगणकावर लॉगिन केले आणि गड काबीज झाल्याच्या आनंदात मुलं टाळ्या वाजवून सेलिब्रेशन करायला लागली. पण महत्वाचं म्हणजे सध्याची गरज आणि 'चिल, इट्स न्यु फॅमिली टाईम' म्हणून स्वतःला समजवण्याखेरीज दुसरा काहीच पर्याय मला तरी दिसत न्हवता.

     ऑफिस कम होम बॅलन्स सांभाळताना 24 बाय 7 चे समीकरण काही केल्या वर्क होत न्हवते. मुलांसोबत खेळताना त्यांच्या नवीन नवीन आईडीयाज थांबतच न्हवते आणि नवऱ्याचे कोड स्क्रिनिंग काही केल्या बॉस आवरेते घेईनासे होते. टीव्ही वर एकच बाई दोन हाताने दहा काम करणारी दाखवताना तिच्या चेहऱ्यावर दाखवणारे गोड हास्य मला खऱ्या अर्थाने आज लाजवते झाले. रील आणि रिअल ह्याच्यात आपणच बऱ्याच वेळा गफलत करतोय ह्याची वास्तविक जाणीव मनाला शांत करत 'नोबडी इज परफेक्ट, बट चेंज इज ओन्ली कॉन्स्टंट' ची खूण पटवून देत होती.

    घडणाऱ्या घडामोडीने आज एक गोष्ट मला मनापासून जाणवली आणि मुख्य म्हणजे पटली. कुटुंबाला वेळ मिळत नाही ही तक्रार आपण प्रत्येक जण करतच असतो, पण वर्क बॅलन्स असेल तर फॅमिली बॅलन्स नक्कीच साधला जातो. आणि येणारी परिस्थिती पाहता जमा खर्चाची आकडेवारी बाउन्स न होता बॅलन्स झाली तर साठवणीची पुंजी नक्कीच सहकार्य करती होईल. 

     'डब्ल्यूएफएच' चा फॉर्म्युला माझ्या मनाच्या इमॅजिकेला अक्षरशः हवेत पेलवत आहे, पण तरीही कॅरी ऑन करायची काहीच हरकत नाही, आणि मुख्य म्हणजे ती काळाचीही गरज आहे.  आफ्टरऑल पळती झाडे पाहायला मज्जा तेव्हाच येईल, जेव्हा लॉक डाउन बंद होऊन वर्क मस्ट गो ऑन होईल.
                              - अनुप्रिया सावंत.

Thursday, 6 February 2020

दिल दोस्ती दुनियादारी -1


अरे काय चालू आहे प्लॅन करा रे बाबांनो किती दिवस झाले भेटलो नाही


हा रे बहुत दिन हुए मिले नही|

या रे इट्स व्हेरी लॉंग टाईम.

हा आता कन्नड तेलगु असेल तर त्या भाषेत पण टाईप करा रे.

एक काम करा संस्कृत मध्येच चालू करा ना. नुसता परत परत एकच वाक्य भाषांतरित चालू आहे. 

आरे चाललाय काय बोलताय काय ठरताय काय, माका काय कळत नाही बघा.

आला हा आता अर्धवट मालगुडे डेज घेऊन.

काय भावा गोवा, दिवे आगार, कोंकण मालवण... लागतात का कुठे दिवे लागतात का?

अरे हाच तो जाऊया जाऊया केलं आणि बसला कामावर जाऊन.

सुट्टी जाहीर करून पण कोणी प्लॅन होऊन दिला नाही तुमच्या आता....

बास रे भाऊ थंडा घे.

मला मसाला दूध, मला चहा चालेल, मेको कॉफी...

तुमच्या तर ना आता... ओतू का ह्या व्हाट्स अप मधून... काडी लावा त्या मोबाईलला.

अरे तुम्ही तर ना नुसते फुसके बार आहात फुसके बार... दिवाळीत कसं बस प्लॅन तयार केला आणि त्या इवलीश्या डॉन ने आकाश कंदील पेटावलाsss. डझनभर लोकांना घेऊन पूर्णत्वास गेलेल्या प्लॅनला इथे दिवाळी स्टेशनात करावी लागली.

कोणत्या रे भावा? मी जॉईन झालो असतो की.

हा नवीन आला आहे का? भाऊ पोकळ बांबू भेटता भेटता वाचला रे. थोबाड चांगल्या घरचा दिसला पोलिसांना.

काय पोलीस?

हो ना, मज्जा आली पण.

हा बहुत मज्जा आया|

बास रे आता सगळ्या भाषा एंटर करू नका रेsss
दमला तो हे बोंबलून...

हो ना! पण वन डे तरी जाऊन येऊ रे आपण.

हा अलिबाग बेस्ट है| 

काय आहे अलिबागला त्यापेक्षा आपण मस्त ट्रेकिंगला जाऊ. रायगड दर्शन आणि मग येताना गणपती दर्शन असं करून घरी येऊ.

मी काय बोलतोय त्यापेक्षा सर्वांनी आधी दादरला भेटू. आपला अड्डा ओस पडायला आला आहे.  ह्या संडे ला एक क्रिकेट मॅच होऊन जाऊ देत.

अरे अरे अरे....

आला आला आला आला... अरे अरे 

इथे ना सगळे फुकटच आहेत.  काही काम नाहीत तुम्हाला नुसते टाईमपास करता.  पिकनिकच्या नावाने बोंबा नुसता विषयांतर बास.

मन्या शांत हो. मित्रांनो आपलं ठरलं, आपण ह्या संडेला सकाळी 7 वाजता भेटतो. मग क्रिकेट थोडा फुटबॉल. हनम्या सगळं घेऊन येईल.  दुपारी आपल्या अण्णाकडे मस्त हादाडू आणि मग मस्त गप्पा आणि मग पुढे बघू.

ह्या संडेला मला थोडं काम आहे.  खुप दिवसापासून पेंडिंग आहे रे!

लेका, झालं का सुरू.  कसं जमतं रे लगेच रडायला.  कुठून शिकला कुठून तू???

भावा, आपण एकाच शाळेतले की.  जमायचं.

अरे लाजा बीजा सोडून दिल्या आहेत रे तुम्ही तर. 

तो अन्या त्या दिवशी भल्यामोठ्या पिशव्या घेऊन चालला होता पाठून मांजरासारखा.

तो विख्या त्याचा तर आताsss नुसता पडला असतो ऑनलाइन.  भेटा बोललं तर उंदऱ्याला कामं आठवतात.   तो सर्व्या दादरला असतो...  अम्या नुसता आयोजन करत असतो... कशासाठीssss कोणासाठीsss.... हीच का दोस्ती आपली.

भाऊ भाऊ भाऊ, तू आधी शांत हो.

मी काय बोलतोय आता 2 वाजत आले आहेत.  आपण आपला प्लॅन नक्की करणारच आहोत पण थोडी विश्रांती घेऊयात का?

अरे अरे लाजा... लाजा गहाण ठेवल्यात का?

चाललंय काय, बोलतोय काय, करतोय कायsss

सुश्या मी आहे रे तू प्लॅन कर आपण भेटतोय ह्या प्लॅनला नक्की.

हा भाई, ये संडे पक्का. 

हा भाई.

हा मित्रा.

बास बास पुरे. तर मग ह्या रविवारी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी आपल्या ठरलेल्या कट्ट्यावर जमणार ना मंडळी?

हिप हिप हुर्रेय हिप हिप _____... 

काय रे कुठे गेले सगळे... हॅलो टिक टॉक मित्रहो....

वाह काय दिवस आले आहेत देवाssss सगळं कसं ऑनलाइन मध्येच सामावले आहे.   हे विश्वच ऑनलाइन झालं बघ देवा... जिथे सगळे इथुनच भेटतात इथुनच बोलतात इथूनच आनंद घेतात. सो कॉल्ड वर्च्युल फ्रेंडशीप.

अरे ए, काळ्या 

अरे ए काळतोंडया

अरे ए उंदराच्या

अहाहा... किती बरं वाटलं ऐकून.  इथेच आहात माझ्या मित्रांनो.

हा ढेकण्या रविवारी भेट.  बघतो तुला सो कॉल्ड.

येही ही अपनी दोस्ती और 
हमारी अपनी प्यारी सबसे न्यारी
थोडीसी हटके प्लॅन की बारी
सिर्फ यारोंकी हमारी दुनियादारी

(तळटीप: हलकं फुलकं कथानक, वास्तविकतेशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.  सर्व हटके अतरंगी सतरंगी फुल नौटंकी फ्रेंड्सला समर्पित)

                                  - अनुप्रिया