Thursday, 8 May 2025

थर्ड वर्ल्ड वॉर ९ - ऑपेरेशन सिंदूर

 


     हल्लीच शाळेत आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भातील मॉक ड्रिल झाली.  सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच इतर सहकर्मचारी ह्यात शांतपणे पण तितक्याच जलद गतीने कृती करत होते.  बरेच विद्यार्थी गोंधळलेले तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या व्यवस्थापनेसंदर्भात घरून ज्ञान प्राप्त असलेले त्यांच्याशी मॉक ड्रिल संदर्भात बोलताना आढळून आले.  शिक्षक विद्यार्थी चर्चा नंतर मनात हा विचार येऊन गेला जर खरंच अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आलीच तर काय?  बऱ्याच ठिकाणी ह्या मॉक ड्रिल घेतल्या जातात पण सामान्य जनतेचे काय?  गृहिणीचे काय?  वयस्कर लोकांचे काय?  लहान मोठी मुले ज्यांना ह्या विषयावर चर्चा तर दूर पण साधी माहितीही नसते त्यांचे काय?  त्यांनी काय करावे?  



     बऱ्याच जणांना मॉक ड्रिल हे माहित आहेच.  पण वेळ आल्यावर प्रत्यक्ष घराघरात लोक त्याला कसे सामोरे जातील?  किती गोंधळ होईल?  विचार आलाच मनात.  माझ्या प्रमाणे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असणारच तेही अनेकदा.  त्याचे प्रात्यक्षिक उत्तर आजच्या 'नॅशनल सिव्हील मॉक ड्रिल' ह्या भारत सरकारच्या निर्णयाने दिला.  


     आज घराघरात ह्या विषयी चर्चा केली जात आहे.  माहित नसलेली गोष्ट किंवा अर्धवट माहित असलेली गोष्ट दोन्ही व्यक्तीला घातकच असतात.  पण त्यामुळे माहिती घेऊच नये किंवा चर्चा करूच नये हे त्याहूनही भयानक असते. 


     पहलगाम दहशतवादी हल्ला हा प्रत्येक भारतीयांसाठी वेदनादायक आणि तितकाच तीव्र निषेध व्यक्त करणारा आहे.  आज भारतीयच नाही तर अनेक देशांमध्ये ह्या हल्लाविरुद्ध निषेध केला जात आहे. 


     हा निषेध फक्त निषेध म्हणून नाही तर त्याविरुद्ध आणि त्यापलीकडे आपल्या भारताने भारतासाठी घेतलेला स्टॅन्ड आहे.  आणि त्याचे प्रत्युत्तर भारताने 28 सप्टेंबर 2016 चा उरी हल्ला,  पुलवामा 'सर्जिकल स्ट्राईक' 26 फेब्रुवारी २०१९ आणि आज 7 मे 2025 रोजी पहलगाम येथे 'ऑपेरेशन सिंदूर' दहशतवाद्यांचा हिशोब करून घेतला गेला.   


गो द्विज धेनु देव हितकारी। कृपा सिंधु मानुष तनुधारी॥

जन रंजन भंजन खल ब्राता। बेद धर्म रच्छक सुनु भ्राता॥2॥


     दहशतवाद्याला धर्म हा नसतोच.  ती एक विकृती आहे.  आणि अशी विकृती त्यांचे पाळेमुळे खणूनच वाढत राहतात.  त्यामुळे त्यांना दिले जाणारे खतपाणी(नेमके काय, कसे व कोणते?) ह्यावर एक सजग नागरिक म्हणून आपले लक्ष असणे गरजेचे आहे.  कोणत्याही गोष्टीला खतपाणी मानसिक, भावनिक आणि आर्थिक ह्या मुख्य गोष्टीने मिळते.  ह्याविषयी अधिक बोलण्यापेक्षा प्रत्येकाने मागच्या १० वर्षाच्या घडामोडी जागतिक आणि राजकीय पातळी अशा प्रत्येक घटनेचा गोष्टींबद्दल विचार करायला हरकत नाही.  


     सुशिक्षित अडाणी आपल्या आजूबाजूला बरेच पाहायला मिळतात जे मागचा पुढचा विचार न करता सरळ बोलून जातात, 'आपल्याला काय करायचे आहे?'  'अमुक असा नि तमुक तसा.',  'शेवटी राजकारण आहे जो तो आपली खळगी भरतो.'; एका अर्थी त्यांचे म्हणणे बरोबरच आहे, मात्र हेच राजकारण जेव्हा घराच्या उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करते तेव्हा मात्र आपण आकांडतांडव करतो. 


    राजकीय(राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ), न्यायाधिक , लष्करी प्रमुख आणि परकीय सत्ता चालवणारे हे सर्वच त्या-त्या देशाला प्रत्यक्ष आकार देत असतात.   पूर्वापार चालत असलेली ही गोष्ट आपण ऐकत आलो आहोत, बघत आलो आहोत आणि अनुभवतही आलो आहोत.


     देशाचा नेता जितका सक्षम नेतृत्व करणारा तितकाच तो देश सुरक्षित.  ह्याचे प्रत्यक्ष स्वरूप आज आपण सर्वच पाहत आहोत.  भारत म्हणून हिणवणारे तेच लोक आज आपल्याकडे विश्वासाच्या, मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत.  हिमालयासारखी पोलादी छाती असणारा आपला 'भारत' ना कोणी जिंकू शकला ना कोणी हरवू शकला.  


     ज्या हाताने मदतीचा हात पुढे करता येते त्याच हाताने ह्या भारताला वेळप्रसंगी शत्रूला मुळासकट उखडूनही काढता येते.


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:



     अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन परिसरात दहशतवादी घटना घडली जिथे पर्यटक पर्यटनासाठी आले होते.  या भागाला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणूनही ओळखले जाते.



     लहानांपासून वयस्करांपर्यंत सगळेच पर्यटनाच्या आनंदात व्यस्त असताना जो भ्याड हल्ला तिथे झाला तो निंदनीय आणि हृदयद्रावक आहे.  


      ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हा क्रूर खेळ  खेळला, त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने उचललेले हे पाऊल.   म्हणजेच.....


श्री राम राम रणकर्कश  राम राम




     पाकव्याप्त काश्मीर (पोक), ज्याला पाकिस्तानमध्ये 'आझाद जम्मू आणि काश्मीर' म्हणून ओळखले जाते, हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग पाकिस्तानने कब्जा करून बळकावलेला भाग आहे.  


      कलम ३७० ह्या कलम अंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला होता.  भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात स्थित असलेला हा काश्मीरच्या मोठ्या प्रदेशाचा भाग आहे.  1947 पासून भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्यातील हा वादाचा विषय आहे. 





      हा कलम रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश बनला आहे.  या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील गुंतवणूक आणि विकास त्याच प्रमाणे तिथली जनता देखील जी आधी तिथल्या दहशतवादांच्या दबावात होती ती मुक्त झाली आहे.  कारण तेथील अनेक लोकांचा असा विश्वास होता की हे कलम जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला आणि सामाजिक प्रगतीला अडथळा ठरत आहे.  त्यामुळे जनमत कौल देखील कलम रद्द करण्यासाठी तितकेच महत्वाचे होतेच.  




(जम्मू काश्मीर हे स्वतंत्र संस्थान आणि त्याचे महाराजा हरिसिंह असताना कलम ३७० नक्की का आणि कसे आले?  ह्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल.)




     २३ एप्रिल २०२५ रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येतील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सुरक्षा विषयक बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सिंधू पाणी करार रद्द ते अटारी बॉर्डर बंद हे निर्णय घेतले.  





     स्वातंत्र्याच्या वेळी, दोन नव्याने निर्माण झालेल्या स्वतंत्र देशांमधील म्हणजेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सीमारेषा सिंधू खोऱ्याच्या अगदी पलीकडे ओढण्यात आली होती, ज्यामुळे पाकिस्तान खालचा किनारी भाग राहिला. 


      शिवाय, दोन महत्त्वाचे सिंचन मुख्य प्रकल्प, एक रावी नदीवरील माधोपूर येथे आणि दुसरे सतलज नदीवरील फिरोजपूर येथे, ज्यावर पंजाब (पाकिस्तान) मध्ये सिंचन कालवा पूर्णपणे अवलंबून होता, ते भारतीय भूभागात सोडण्यात आले. अशाप्रकारे दोन्ही देशांमध्ये विद्यमान सुविधांमधून सिंचन पाण्याच्या वापराबद्दल वाद निर्माण झाला.







     या करारानुसार पश्चिम नद्या (सिंधू, झेलम, चिनाब) पाकिस्तानला आणि पूर्व नद्या (रावी, बियास, सतलज) भारताला वाटल्या जातात. त्याच वेळी, या करारामुळे प्रत्येक देशाला दुसऱ्या देशाला वाटलेल्या नद्यांचे काही विशिष्ट वापर करण्याची परवानगी मिळते.


     भारताला विशेष वापरासाठी वाटप केलेल्या पूर्वेकडील नद्यांच्या पाण्याचा वापर करण्यासाठी, भारताने खालील धरणे बांधली आहेत:


सतलजवरील भाक्रा धरण

बियासवरील पोंग आणि पांडोह धरणे आणि

रावी थीन.




     बियास-सतलज लिंक, माधोपूर-बियास लिंक आणि इंदिरा गांधी नाहर प्रकल्प यासारख्या इतर कामांमुळे भारताला पूर्वेकडील नद्यांच्या जवळजवळ संपूर्ण पाण्याचा वापर करण्यास मदत झाली आहे.


     १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार, रावी, सतलज आणि बियास या तीन नद्यांचे सर्व पाणी भारताला विशेष वापरासाठी देण्यात आले होते. सिंधू पाणी करार हा १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील पाणी वाटप करार आहे. तो जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केला होता. हा एक महत्त्वाचा करार आहे आणि आजपर्यंतच्या सर्वात यशस्वी पाणी वाटप करारांपैकी एक आहे.


     या करारानुसार पश्चिम नद्या (सिंधू, झेलम, चिनाब) पाकिस्तानला आणि पूर्व नद्या (रावी, बियास, सतलज) भारताला देण्यात आल्या आहेत.


      पाकिस्तान हा आधीच जगातील सर्वात जास्त पाण्याची टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे.  पाकिस्तानातील ८०% लागवडीखालील जमीन, सुमारे १.६ कोटी हेक्टर, सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.  


     जर भारताने सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचा प्रवाह कमी केला तर त्याचा परिणाम तात्काळ आणि गंभीर होईल ह्याची जाणीव असलेल्या भारताचे हे पाऊल म्हणजे दहशतवादी गटांना लगाम घालण्यासाठी आणि घुसखोरी थांबवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याची रणनीती आहे.

हरि प्रेरित तेहि अवसर चले मरुत उनचास।

अट्टहास करि गर्जा कपि बढ़ि लाग अकास॥25॥


      नोटबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370, 35A, राम मंदिर, सिंधू जल करार स्थगिती आणि आता ऑपेरेशन सिंदूर.




      अजून असे बरेच मोठे मोठे अचूक शिवधनुष्य पेलले जाणार आहेत, तेही योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी.  आपण फक्त रामाचे वानर सैनिक म्हणून कार्य करत राहायचे.  त्याच्या कार्यात खारीचा वाटा उचलता यावा, हीच आई महिषासुरमर्दिनी चरणी प्रार्थना!


युद्ध करेंगे मेरे श्रीराम। समर्थ दत्तगुरु मूल आधार। मैं सैनिक वानर साचार। रावण मरेगा निश्चित ही॥


आजचा मॉक ड्रिल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अगदी जबरदस्त (How is the Josh... High Sir!!!) पार पडला आहे.  


बोलो "जय श्री राम हो गया काम!" 


त्याच्या नामा शिवाय पर्याय नाहीच आणि तो काहीही करू शकतो, अगदी काहीही!


सुंदरकांड मधील शेवटची ओवी सतत मनात गुंजी घालते...

सकल सुमंगल दायक रघुनायक गुन गान।
सादर सुनहिं ते तरहिं भव सिंधु बिना जलजान॥60॥




     वेगाने घडणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळींवरील घडामोडींवर आपले जमेल तितके आणि समजेल तसे लक्ष असलेच पाहिजे. कारण... Third World War has been Started... 

                                                  - अनुप्रिया सावंत.

Wednesday, 7 May 2025

पत्रलेखन - पत्रलेखन कसे करावे?



पत्रलेखन - पत्रलेखन कसे करावे?


पत्रलेखन म्हणजे आपणच मांडलेले आपले विचार, भावना, आपले मत किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रारी यांचे लेखी स्वरूपात केलेले लेखन म्हणजे 'पत्रलेखन' होय.


बऱ्याचदा आपल्याला भावना व्यक्त करतांना शब्दांची जमवाजमव करावी लागते.  काहीवेळेस भावना व्यक्त करायला वेळेचा अभाव असतो तर काही वेळेस समोरची व्यक्तीच उपलब्ध नसते.  अशा वेळेस लिखित मजकूर आपले कार्य चोख बजावतो. थोडक्यात , हे महत्वाचे संवाद माध्यम आहे. ज्याचे महत्तव आजच्या काळातही तितकेच टिकून आहे.


प्राचीन काळापासून हा प्रकार आपण पाहत आलो आहोत.  काळानुसार त्यात बरेच बदल झाले असले तरी 'पत्रलेखन' हा विषय अजूनही विशिष्ट स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतो.


त्याच गोष्टी लक्षात ठेवून मी आपल्यासमोर पत्रलेखन करतानाचे काही प्रमुख गोष्टी, त्यांचे घटक व स्वरूप सोप्या करून मांडण्याचा प्रयास असणार आहे.


विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तयार केलेला हा आराखडा असला, तरी प्रत्येकाला पत्रलेखन करताना हे स्वरूप डोळ्यासमोर आल्यास सोपे होईल ह्याची खात्री आहे.


पत्रलेखन अनौपचारिक (मित्र - मैत्रिणी, कुटूंब, जवळचे व्यक्ती), औपचारिक(संस्था, कार्यालय किंवा विशिष्ट उद्देशाने), व्यावसायिक(मागणी पत्र, तक्रार)  अशा प्रकारांची असतात.  


खालील पत्रलेखन स्वरूप हा तिन्हींचा एकत्रित करून समजायला सहज असावा अशा स्वरूपाचा नमुना बनवलेला आहे.  अर्थातच विद्यार्थ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल.  



पत्रलेखन स्वरूप:


दिनांक:
प्रति,
नाव
पत्ता
महोदय / प्रिय व्यक्तीचे नाव   (औपचारिक / अनौपचारिक)
नमस्कार  (नमस्कार पद्धत)


विषय (ज्या विषयावर आपल्याला पत्रलेखन करावयाचे आहे तो विषय थोडक्यात स्प्ष्ट असावा.)


विषयानुरूप पत्राचा आशय  (तुम्ही तुमच्या खास शैलीमध्ये तुम्हाला आवडेल तसा आशय / मुद्दे / मत ह्यात मांडू शकता.  जेणे करून पत्राचा मूळ उद्देश ह्यात सविस्तरपणे समोरच्याला कळेल.  आशयामध्ये कमीत कमी दोन परिच्छेद असायला हवे.)


आपला नम्र  किंवा तुझा/तुझी भाऊ/बहीण,   (विषयानुरूप - तुम्ही कोणाला किंवा कोणत्या संदर्भात(औपचारिक / अनौपचारिक) लिहीत आहात त्यावर आधारित तुम्ही पत्र आवरते घेऊन त्यांचे निरोप घेता.) 



(पत्राचा शेवट)
तुमचे नाव  
पत्ता
ई-मेल आयडी
संपर्क साधन


       अशा स्वरूपात तुम्ही पत्रलेखन पूर्ण करू शकता.  विद्यार्थ्यांनी पत्रलेखन करताना कोणत्या भागाला किती गुण आणि कसे गुण विभागले असतात त्यानुसार जर अभ्यास केला तर नक्कीच पत्रलेखन प्रकारात उत्तम गुण मिळवू शकतात.


     आजच्या जगात सोशल मिडीयासारखे साधने, ई-मेल, चॅटबॉक्स असे अनेक साधने उपलब्ध असली तरी, पत्रलेखन अजूनही तितकेच प्रभावी संवाद माध्यम म्हणून वापरले जाते.  त्यामुळे नमुना म्हणून सादर केलेला हा पत्रलेखन प्रकार सामान्य माहिती स्वरूपात आहे.  तुम्ही तुम्हाला आवडेल तसा विषयानुरूप त्यात बदल करू शकता.

                                                                                                                                                 - अनुप्रिया सावंत.



Friday, 22 November 2024

कविता #21- लेखणीचा लपंडाव

 

Published in #Pratyaksha newspaper 


     आज बऱ्याच दिवसानंतर हो नाही करत काही तरी लिहायला सुचलंय.  पण त्या मागे मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे दोन्ही इच्छा शक्तिंचे पाठबळही होतेच.  ह्याचे सर्व श्रेय त्यांचेच आहे.  कारण त्यांच्यामुळेच थांबलेल्या या गाडीला पुन्हा नव्याने 'एक्स्प्रेस वे' गवसावा असं वाटतंय.  आणि हे वाटणं मला मात्र पूर्णपणे मनसोक्त अनुभवायचं आहे.


     सध्याच्या गडबडीत शब्द सुचणं म्हणायला गेलं तर मला कठीणच वाटत होतं. हृदयाला गोष्टी भिडत नाहीत तोपर्यंत मनाचा आणि बुद्धीचा मेळ साधला जात नाही, अगदी तसंच काहीसं!  भिडलेल्या हृदयाला हे वाक्य कारणे दाखवा निमित्त म्हणावं तरी काही रुपी हे खरंही असावं.  काय वाटतं?


     मन शांत जरी ठेवले तरी विचारांना लगाम द्यायचा की त्यांना मुक्तविहार करू द्यायचं?  लगाम दिला तर डोक्यातल्या भूणभूण करणाऱ्या भुंग्यांना आपण किती थांबवणार! आणि मुक्ताविहार करायला द्यायच म्हंटले तरी किती धरून ठेवणार!  नाही का?


     ह्यांच्या लुटूपुटूच्या भांडणात मात्र ज्ञानेंद्रियांना आपला डाव साधला.  आणि ना हा म्हणता म्हणता 'लेखणीचा लपंडाव' सरसर पानांवर धावला.  डोक्याने मनाशी गट्टी करत हृदयावर पकड धरली आणि अलगद त्यावर विसावत ओठांच्या कडांवर रुंदावली.


लेखणीच्या कुशीत पेनच रुसला
कागदावर त्याचा फटकाच बसला.

शाईने सोडली पेनाची साथ
रबर म्हणाला ही काय बात!

डोळ्यांनी दिले त्यावर इशारे
गोल-गोल फिरले ह्यावर बिचारे!

नाकाचा शेंडा भलताच उडाला
हलकाच पाण्याचा थेंब गळाला.

ओठांच्या बाणाने निशाणा साधला
सरळ रेषेत समांतर धावला!

कानांच्या पाकळ्यांनी हलक्यात घेतले
दातांच्या फटीत जिभेला धडकले.

मनाने थेट इशाराच साधला
बुद्धीच्या विचारांना छेद लगावला!

हळूच उतरले काव्यांचे रंग
गोबऱ्या गालावर हसूच दंग.

जमले म्हणत हात सरसावले
त्यावर पायाने ठेकाच लगावले.

लेखणीला आले हुरूप शाईवर
उतरले शब्द थेट पानांवर.

                                         - अनुप्रिया सावंत.

Friday, 10 May 2024

शिदोरी - लव्ह यू जिंदगी💞

निळभोर आकाश, चंदेरी रुपेरी वाळू, समोर लाटांवर स्वैर होणारा मुक्त आणि अथांग समुद्र आणि समुद्राला शोभा देणारी, त्याचे अस्तित्व जाणवून देणारी नारळाची उंच उंच झाडी.  


सागराचा साथी असणारा त्याचा एकमेव किनारा ज्याच्यावर हक्क गाजवताना आपल्याला साऱ्या जगाचा विसर पडतो.  


ह्या सागराच्या खोलीचा थांगपत्ता कधी लागणं खरंच शक्य नाही.  अगदी प्रत्येकाच्या मनासारखं.  पोटात अनेक गोष्टी दडवून ठेवल्या असतात.   त्याच्यासोबत अनेक जीवांना सांभाळत आपले कार्य पूर्ण करत त्याचा प्रवास मात्र चालूच असतो, अगदी अनादिकाळापासून अनंतापर्यंत.  त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेताना गडद होऊन गुडूप व्हायला होत.  अगदी कितीतरी रहस्य दडवून तो तसाच त्याच्या साथीदारांसोबत खळखळत असतो.  त्याचे अश्रू कधी दिसत नाही, मात्र जाणीव होत राहते.  


राग, आनंद, दुःख, वेदना, जाणीव, लोभ, प्रेम, त्याग अगदी सर्वच.  भावनेचा पुरही वाहून जातो, त्यात अनेक गोष्टींचा उच्छाद मांडला जातो, कधी मनासारखं तर कधी मनाविरुद्ध.  कधी तर खवळल्यासारखं अगदी बाहेर किनाऱ्यावर फेकून देतो.  तर कधी त्या किनाऱ्यावर संथपणे तरंगत राहतो आणि पुन्हा परतीचा प्रवास करत त्याच्या दाट खोलीत सामावून जातो.  


हा सागर त्याचं कार्य कधीच विसरत नाही.  किंबहुना त्याला त्याच कार्य विसरून चालतच नाही.  म्हणूनच तो त्याचं भान हरपून जगतो आणि जगताना त्या आकाशाला पुन्हा नव्याने मिठी मारत साद घालत राहतो, कारण त्याला त्याची डेस्टिनी माहीत असते.  अशी डेस्टिनी जी त्याच्या कार्याला पूर्णत्व देते.  कसलीही अपेक्षा न करता तो फक्त निर्सगाच्या सानिध्यात स्वतःला झोकून देतो आणि तेच खर त्याच अस्तित्व असत.


माणसाच्या आयुष्याचं ही तसच तर असत.  कुठे थांबायचं हे आपलं आपल्याला कळायला हवं.  मला हे हवंय किंवा मला हे मिळालच नाही म्हणून स्वतःला कोसत राहण्यापेक्षा आपला किनारा आपण सांभाळायला हवा.  


सागर जेव्हा समुद्राचा किनारा सोडून वाहतो तेव्हा त्याच्या कृतीने बऱ्याच गोष्टी हातापलिकडे जातात ज्यांना सांभाळणं कठीण होत.


आपल्या आयुष्याचा किनारा सुद्धा असाच आहे, तो ओलांडला की मार्ग हरवतोच. 

 

आपली मर्यादा माहीत पाहिजे हे नक्की, 'But remember that Sky is the only limit.' 


आयुष्य जगायचं असेल तर समुद्रासारखे जगले पाहिजे.  सगळ काही सामावून सुद्धा नामा-निराळा.  आहे त्यात सुख शोधून आपली डेस्टिनी मिळवणारा.  सतत खळखळणारा, कधी संथ होऊन वाहत राहणारा, तर कधी लाटांवर मुक्तपणे संचार करणारा.  


आयुष्य म्हणजे एक सुंदर फुल आहे.  त्या फुलात देवाने त्याचा सुगंध अगदीच भरभरून दिला आहे.  त्या फुलाला जपत त्याचा ताजेपणा बहरत ठेवणं हे आपलं कार्य आहे.  कारण मनुष्य हा 'प्रवासी' आहे.  प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, मात्र परतीचा प्रवास प्रत्येकाला सारखाच आहे.


आदमी मुसाफिर है

आता है जाता है|

आते जाते रस्ते मे 

यारी छोड जाता है|


आपण कोण आहोत हे लोकं नक्कीच विसरून जातील.  मात्र आपण काय आहोत, काय केले आणि कसे जगलो हे नक्कीच लक्षात राहतं.  


आमची आई नेहमी सांगते...

"Say yourself just... Love you Jindagi💞".

                                                            

                                                                  - अनुप्रिया सावंत.

Friday, 3 May 2024

लघुकथा #1 - Be Optimistic!


चिनू शाळेतून रडतच घरी आली.  आल्या-आल्या हातपाय न धुता तशीच नाराज बसली.  देवघरातील अगरबत्तीचा सुवासाने तिला प्रसन्न वाटत होतं.  तरीही शाळेतल्या गोष्टीमुळे ती पुन्हा उदास झाली.  आईने तिला स्वच्छ हातपाय धुवून तयार होण्यास सांगितले.  छोटी चिनू आज्ञाधारक बाळाप्रमाणे तशीच उठून हातपाय धुण्यास गेली.  


गरम गरम शिऱ्याचा खमंग वासाने चिनुची मोठी ताई चिऊ बाहेर आली.  अभ्यास करून तिच्या खोलीतून नेहमीप्रमाणे नाश्ता करायला येत असताना तिचं लक्ष आपल्या छोट्या चीनुकडे गेलं.  आपल्या छोट्या बहिणीला असं रुसलेल बघून तिने आईला नजरेनेच काय झाले ते विचारले, त्यावर आईने डोळ्यांनीच थोडा वेळ थांब सांगितले.  


चिनू नाश्त्याला बसल्यावर आईने गोड हसून तिला हळूच साद घातली तशी चिनू आईला घट्ट बिलगली.


अगदी लहान निरागस बाळासारखं मुसमुसतच शाळेत निंबंध स्पर्धेतल्या तिचा क्रमांक कसा हुकला ते रडत रडत आईला सांगायला लागली.  चिनुला तस करताना पाहून चिऊ ताईला हसूच आले.  तसं आईने डोळे मोठे करून चिऊला गप्प केले आणि गोड हसून मायने चिनुच्या डोक्यावरून हात फिरवला.  


स्पर्धा नेहमी चालूच असतात.  क्रमांक हुकला म्हणून रडण्यापेक्षा तू स्पर्धेत सहभाग घेतलास हीच गोष्ट तुला पुढे यश देणार आहे.  


क्रमांक हुकला म्हणून त्यासाठी आज रडत बसून नाराज होण्यापेक्षा पुन्हा नव्या जोमाने तयार होऊन येणाऱ्या संधीला हसून साद घाल. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, आपण त्यात रंग भरले पाहिजे.


प्रत्येकाच्या बाबतीत छोट्या-मोठ्या गोष्टी कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध होतच असतात.  


त्यातही गंम्मत म्हणजे प्रत्येक वेळी नवीन गुपित उलगडावं तसं नवीन ज्ञानाचं भांडार खुले होत असते.


म्हणतात ना, जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक मार्ग उघडे होत असतात.  फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे.


छोट्या छोट्या गोष्टीत रडण्यापेक्षा ऑप्टिमिस्टिक राहण्यात खरं सुख आहे.  त्या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.  तरंच खरी मज्जा! 


काय?  पटतंय ना!  


थोडा है, थोडे की जरुरत है|


आईचे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहून दोघींना नेहमीच खूप छान वाटायचं.   


आपल्या आईला जादू की झप्पी देत चिनू आणि चिऊ दोघींनीही हसून मान डोलावली आणि देवघरातील अगरबत्तीच्या सुंगांधासारखा विचारांतला सुंगंध प्रसन्नतेने सर्वत्र दरवळला.


                                                                - अनुप्रिया सावंत.

Tuesday, 18 July 2023

कविता #२० - किमयागार

Photo: Google

           Photo courtesy: Google

(प्रस्तुत कविता 'दैनिक प्रत्यक्ष' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे.)

          व्यक्ती तशी वल्ली तितक्याच प्रकृती.  माणसांमध्ये ही गोष्ट प्रत्येकाला पाहायला मिळतेच.  पण त्याच माणसांना खुलवणारा, हसवणारा, साद घालणारा आणि त्याच्यासोबत जुळवून घ्यायला शिकवणारा मात्र समोर असूनही अलिप्त राहत असतो तितकाच अलिप्त असूनही जवळ असतो.  म्हणूनच तर ह्याला 'किमयागार' म्हणतात.  बरोबर ना!  ह्याची जादूच निराळी.  जगायला शिकवणाराही हाच आणि जगताना अनुभवायला शिकवणाराही हाच.


 रोपट्यांनी साऱ्या फुलावे घट्ट मातीच्या साक्षीणे

फुला - फुलाने बहरावे वाऱ्याच्या सोबतीने!


चांदण्याची सारी शोभा निळ्या नभी चमकावी

मधूनच तारे - तारका त्याच्या सोबतीने असावे!


सर्व दिशांतले वारे घट्ट मिठीत विसावे

मंजुळ ध्वनीच्या लहरी त्यात डुलत राहावे!


खळखळाट नदीचा नाद चहू बाजूंनी गर्जितो

डोंगर दरी कपाऱ्यातून बेधुंद मुक्त संचारतो!


किमया ही किमयागाराची तोचि साधितो जाणावे

त्याच्या सोबतीने सारे आपण चालतची राहावे!!!

                                                         अनुप्रिया सावंत. 

Tuesday, 9 May 2023

कविता #१९ - मागे वळून पाहताना...

(सदर कविता 'प्रत्यक्ष-बिगर राजकीय दैनिक वृत्तपत्र' मध्ये छापून आलेली आहे.)

     दिवसामागून दिवस जातच असतात. मिनिटामिनिटाच्या हिशोबात म्हणतात ना, वेळ कधी थांबत नाही.  तरी उगाच आपण बऱ्याचदा घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो.  जर-तर मध्ये काही तथ्य नसतेच, मात्र आपण त्यातच गुरफटत असतो.  हातात असणाऱ्या गोष्टींपेक्षा नसणाऱ्या गोष्टीत आपण जास्तच गुंतून राहतो.  चढ-उतार अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण मन आपणच कसे वेगळे हे सिद्ध करत राहतं.  बरोबर ना!  आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगता यायला हवं आणि जगताना ते अनुभवताही यायला हवं.  डिजिटलायझेशनच्या युगात सर्व शक्य आहे, फक्त त्याचा उचित वापर करता यायला हवं!  असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली, हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


 असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली

जीवनाच्या वळणावर आस नित्य मनी

ध्यास असावा सोबती अन महत्वाकांक्षा

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


लाटा येती किनारी नि निघोनी जाती

फोडुनी टाकावी त्याच जिद्दीच्या बळाने

आहोटी आणि भरतीच्या ह्या विशाल भिंती

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


प्रवाहासोबत प्रवाहाविरुद्धही पोहावं लागते

वाराही जिथे बदलतो दिशा वादळी भीतीने

आपण मात्र संकटी ठाम असावं नक्की

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


आनंदाच्या हिंदोळ्यावर अनुभवाचे चीज

परिश्रमाचे साक्षीने रोवावे त्याचे बीज

कृतज्ञता ठेवुनी ठायी असावे निश्चिन्त

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


                                   - अनुप्रिया सावंत.

Friday, 21 October 2022

कविता #18 - स्वच्छंदी

     खरं तर लिहिण्यासारखे, व्यक्त होण्यासारखे प्रत्येकाकडे खूप काही असते. आवडीचे पदार्थ खायचे आहेत, बनवायचे आहेत, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, मैत्रिणी-मित्रांना भेटायचे आहे, भटकंती करायची आहे, लिहायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे, खूप काही छान छान गोष्टी करायच्या आहेत. सर्वात महत्वाचं स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. मात्र सगळं कळत असूनही हे आपलं मन मात्र अनेकानेक गोष्टीत अडकलेले राहिले आहे आणि त्यातून आऊटपुट काय? थोडं गंमतीत घ्यायचे झालं तर 'बाकी सब ठीक है| हो की नाही?

     आपल्या मनाला आपण खूप बांधून ठेवतो. एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की मात्र एक नाही दोन नाही अनेक दगड समोर येऊन उभे राहतात आणि सुरु होते मनाची लहर! तुम्हाला म्हणून सांगते अगदीच 'कहर' आहे हो हे!  
तेवढ्यात मन गुणगुणू लागते... दगड दगड दगड दगड इकडे दगड तिकडे दगड... दगड दगड दगड दगड. थांबा थांबा..... तुम्ही लगेच चाल म्हणायलाच सुरुवात केली...

     खरं तर मीच खूप दिवसांनी माझ्या ब्लॉगला भेटायला आले आणि तिथे पुन्हा 
भेट झाली माझ्यातल्या हरवलेल्या 'मी' ची. असा 'मी' जो पुन्हा स्वतःला काही सांगू पाहत आहे, काहीतरी सुचवायचे आहे, काहीतरी पुन्हा त्या दुनियादारीत स्वतःलाच नव्याने पाहायचे आहे. कामे तर प्रत्येकाचीच चालू असतात. वेळ नसतोच, तो आपल्याला काढावा लागतो, हे माहित असूनही चालण्यातला वेग थोडासा कमी झालेला असतो. थोडासाच म्हटले, कारण नुसती गाडी चालू करून उपयोग नाही, ऍक्सिलेटरवर जोर धरावाच लागतो. आपल्यातला छंद आपण नाही जपला तर ह्या आपल्या 'स्वच्छंदी' मनाला साद कशी घालणार?



नको राग नको द्वेष,

नको लोभ विनाकारण त्वेष,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको थट्टा नको मस्करी,

नको हांजी कुणाची फुशारकी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको लालच नको बंधने,

नको खोटे नाते आश्वासने,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


रम्य चित्र संगीताची साथ,

नभी इंद्रधुनचा रंग खास,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


शुभ्र आकाश ढगांची बात,

पक्षी स्वैरावत मनमुराद गात,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


वेळेचे गणित बांधूनी गाठोडी,

स्वप्नांचे पंख घेऊनी भरारी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


                                                      - अनुप्रिया सावंत


Tuesday, 31 May 2022

व्याकरण - विरामचिन्हे

  


लिहिताना आपले हावभावआपल्या भावना व्यक्त करताना चिन्हांचा वापर करावा लागतो.  ह्याच चिन्हांना मराठी व्याकरणात आपण 'विरामचिन्हेअसे संबोधतो.

(WHENEVER WE EXPRESS OUR FEELINGS BY WRITING , WE HAVE TO USE SOME SYMBOLS AND THESE SYMBOLS ARE CALLED PUNCTUATION MARKS.)

Ø  "वाहकिती छान."

Ø  तुझे नाव काय आहे?

Ø  मी अनुप्रिया आहे.

वाक्य वाचताना आपल्याला त्या चिन्हांनुसार आवाजातील चढ उतार बदलताना जाणवतो.  आणि म्हणूनच आपल्याला त्या वाक्यांतील भाव ओळखण्यास मदत होते.  अशा चिन्हांच्या संचांना(Group) आपण 'विरामचिन्हे' म्हणतो.

 

v  लेखनात येणारी प्रमुख विरामचिन्हे अभ्यासुयात.

 

१. पूर्णविराम (.) – (Full Stop)

१. वाक्य/विधान पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी ह्याचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

- माझे नाव अनुप्रिया आहे.


२. शब्दांचे संक्षिप्त रूप (In short) दर्शविण्यासाठी आद्याक्षरापुढे ह्याचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

वि. वि. = (विनंती विशेष)

वि. दा. सावरकर = (विनायक दामोदर सावरकर)


२. स्वल्पविराम (,) - (Comma)

     एकाच प्रकारचे अनेक शब्द एकामागोमाग / लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.


उदाहरणार्थ,

छान, सुंदर, अप्रतिम आणि जबरदस्त काम केले आहेस.


- दुसऱ्याला उद्देशून/संबोधन करताना स्वल्पविराम वापरला जातो.

उदाहरणार्थ,

सीमा, हे पुस्तक वाच.

 

प्रश्न चिन्ह(?) – (Question Mark)

     प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिन्हाला प्रश्न चिन्ह असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

        तुझे नाव काय आहे?

        तू कुठे राहतोस?

 

उद्गारवाचक चिन्ह (!) – (Exclamation Mark)

             आनंददुःखआश्चर्यराग अशा भावना व्यक्त करताना शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्हांचा वापर करतात. 

उदाहरणार्थ,

अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.


अवतरण चिन्ह (") (‘) – (Quotation Mark)

     दुसऱ्यांचे म्हणणेमहत्वाचे शब्द दर्शविण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर करतात.

Ø  दुहेरी अवतरण चिन्ह (")

Ø  एकेरी अवतरण चिन्ह (‘)


एकेरी अवतरण चिन्ह (‘) - जेव्हा महत्वाच्या एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दर्शवायचा असेल तेव्हा एकेरी चिन्हांचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

ü  साने गुरुजी ह्यांचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचनीय आहे.

ü  'ज्ञानेश्वर' हे थोर संत होते.

 

दुहेरी अवतरण चिन्ह (") - बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ,

ü  शिक्षक म्हणाले"मुले अतिशय हुशार आहेत."


                                                                  - अनुप्रिया सावंत.