Friday 19 June 2020

थर्ड वर्ल्ड वॉर ७ - भारत चीन सीमावाद - १

         
         १९६२ साली बेसावध भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या चीनने या वेळीही विश्वासघातकी नाटक करून भारतीय सैनिकांवर लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगडांनी विक्षिप्त हल्ला केला.  चीनच्या भ्याड हल्लाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो.  आणि अशा भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर चीनला लवकरच मिळेल.  


         चीनला महासत्ता बनण्याचे असुरी ध्येय आहे.  चीनच्या ह्या महत्वाकांक्षी योजनेसाठी त्याला जगभर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.  आणि त्यासाठी चीनने फार आधीपासूनच त्याची पाळेमुळे कशी खोलवर रुजवून ठेवली आहेत, ह्याचा प्रत्यय आपल्याला कोरोना वैश्विक महामारीमुळे यायला लागला आहे.  कोरोनामुळे चीनचा खरा चेहरा जगासमोर आला असला, तरी चीनला त्याच्या महत्वकांक्षेपासून रोखून ठेवू शकणारा एकमेव भारत देश आहे आणि चीनला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे.  


         पाकिस्तान आणि श्रीलंका ह्यांचे चीनशी संबंध आहेत कारण चीनकडून त्यांना आर्थिक स्वरूपात कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची मदत झालेली आहे.  सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर दोन्ही देशांना अजूनही मोठ्या कर्जाची आवश्यकता आहे.  आणि हीच संधी चीन साधणार आहे.  कारण भारताच्या शेजारी असणारे हे देश ह्यामुळे चीनच्या अधिपत्याखाली येण्यास मदत होणार आहे.  चीन आपल्या मार्केटिंग स्ट्रेटीजी चा वापर करून इतर देशांमधील आपला विस्तार वाढवत चालला आहे.   


     चीनचे पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान ह्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.  शत्रू चा शत्रू तो आपला मित्र हे सूत्र चीनने फार पूर्वीपासून अवलंबले आहे.  हिंदी महासागरातील भारताची सुरक्षा आणि अमेरिकाचा असलेला प्रभाव कमी करण्यासाठी, चीन भारताशेजारील देशांना आर्थिकदृष्ट्या आपल्या कूटनीतीमध्ये गुंतवू पाहत आहे.  त्याचमुळे चीन पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार ह्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत भारत व अमेरिकेला शह देण्याचा विफल प्रयत्न करत आहे.  चीनचे सुरु असलेले कुटील डाव हाणून पाडण्यासाठी भारत व अमेरिका इतर देशांसोबतचे नौदल सहकार्य वाढवीत आहे.  ह्यात श्रीलंकेसह, मालदीव, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, सिंगापूर ह्यांचाही समावेश आहे.  श्रीलंकेसोबत भारताने सद्य स्थितीत करार करत आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

नेपाळ


        भारताच्या शेजारी असलेल्या ह्या नेपाळला महायुद्धात एक महत्वाचे स्थान आहे.  
अधिक माहितीसाठी: 
तिसऱ्या महायुद्धासंदर्भात डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक अत्यंत वाचनीय आणि महत्वपूर्ण आहे.  

'तिसरे महायुद्ध' संदर्भातील जागतिक पातळीवरील दिवसागणिक बदलणाऱ्या अधिक घडामोडी पाहण्यासाठी:

        नेपाळमधील काली नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचा तर पश्चिमेकडील भाग भारताचा आहे.  याबाबत कोणताही वाद नाही आणि भारताने बांधलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे.  भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ८ मे रोजी 'लिपुलेख पास' ला जाणाऱ्या ८० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते.  हा रास्ता उत्तराखंड आणि तिबेट ह्यांच्या मधून जाणारा आहे.  कैलाश मानसरोवर हे तिबेट मध्ये येते.  इथे जाण्याचे दोन रस्ते आहेत.  एक लिपुलेख (उत्तराखंड) आणि दुसरा नाथू-ला.  पण हे दोन्ही रस्ते खूप वेळ खाऊ आहेत.  त्यामुळे लिपुलेख सीमेपर्यंत रस्ता बनवण्यात आला आहे.  ह्या लिंक रोडचा फायदा फक्त भाविकांनाच नाही, तर चीनच्या टोकाला असणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याच्या तुकडीला सुद्धा कमी वेळेत अधिक रसद उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.


    हिंदू धर्मासाठी पवित्र असणारी कैलास यात्रा 'तिबेट' जवळून जाते.  हिंदूंच्या पवित्र कैलाश मानसरोवरावर चीन स्वतःचा हक्क दाखवतो.  भारताविरोधात नाराजीचा सूर लावणाऱ्या नेपाळने, ज्यावेळी चीनने ‘माऊंट एव्हरेस्ट’ वर स्वतःचा दावा केला, तेव्हाही कुठल्याही प्रकारची अपेक्षित आक्रमकता प्रदर्शित केली नव्हती.  ही बाब नेपाळमधील चीनचा प्रभाव अधोरेखित करणारी ठरते.


       आपल्या मुख्य पॉईंट्सवर येऊ.  नेपाळमधील काली नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचा आहे, तर पश्चिमेकडील भाग भारताचा आहे.  याबाबत कोणताही वाद नाही आणि भारताने बांधलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे.  असे असतानाही नेपाळने भारताच्या लिंक रोडला विरोध का करावा?  इतकेच नाही तर नेपाळने लिपुलेखसह 'कालापानी' व 'लिंपियधुरा' हे नेपाळचाच भाग असल्याचा नवा नकाशा प्रसिद्ध करण्याचा इशारा देत निषेध नोंदवला होता.  फार आधीच भारत-नेपाळ सीमा प्रश्न मिटलेला असताना, नेपाळने भारतविरोधी अशी आक्रमकता दाखवण्यामागचे काय कारण असू शकेल?   की त्यामागे चीनची खेळी आहे? 


     ह्याच मुद्द्याला अधोरेखित करत चीनने लिपुलेखमधील भारताच्या अस्थायी बांधकामांवर आक्षेप घेत उघडपणे विरोध दर्शविला आहे.  नेपाळने 'कैलास मानसरोवर लिंक' रोडला ज्याप्रमाणे विरोध दर्शविला त्याचप्रमाणे चीनने कैलास मानसरोवराला जाणाऱ्या यात्रेकरू आणि चीनमध्ये जाणाऱ्या व्यापाऱ्यांकरिता जे तात्पुरते विश्रंतीसाठी अस्थायी बांधकाम बांधले आहेत त्यावरून विरोध सुरु केला आहे.  चीन इतर सीमाप्रदेशावरील देखील वाद उकरून काढत तसेच लिपुलेखसंदर्भात बांधकाम मुद्दा पुढे करत, भारतावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न करत आहे जो अगदीच केविलवाणा वाटतो. 

 
     चीनला लिपुलेख इतका महत्वाचा का आहे?  'हिमालयीन ट्राय जंक्शन' हा अतिशय संवेदनशील असलेला भाग आहे.  कारण तिथे तीन देशांच्या सीमा एकत्र येऊन मिळतात.  त्यामुळे लष्करीदृष्ट्या अतिशय महत्वाचा असेलेला हा भाग खरं तर हिमालयाची प्रवेशद्वारे आहेत.  

ही ट्राय जंक्शन म्हणजे,
१. सियाचीन ग्लेशियर 
२. कालापानी म्हणजे लिपूलेख पास 
३. डोकलाम 
४. दिफु पास  

     आणि महत्वाचे म्हणजे, हे चारही जंक्शन्स आपल्या भारताच्या ताब्यात आहेत.

     सियाचीन हातातून गेला तर लडाख हातातून गेल्यासारखे आहे.  सियाचीनच्या पश्चिमेला पाकिस्तान आणि पूर्वेला चीन लडाख वर कब्जा करू शकतील.  POK ताब्यात घेण्यासाठी तसेच लडाखला सुरक्षित ठेवण्यासाठी सियाचीन महत्वाची भूमिका बजावतो.

'लिपुलेख' ते दिल्ली अंतर फक्त ४१६ किमी आहे.  जर लिपूलेख चीनच्या ताब्यात गेला तर राजधानीवर हल्ला करायला चीन सैन्याला २ दिवस पुरेसे आहेत. 

'डोकलाम' हातातून गेले तर नॉर्थ ईस्टकडील राज्ये चीनच्या ताब्यात येतील.

         'भारत-म्यानमार-चीन' यांच्या सीमा 'दिफु पास' येथे येऊन मिळतात. मॅकमोहन लाईनच्या एंड पॉईंटवर अरुणाचल प्रदेशात दिफु पास आहे.  चीनला अरुणाचल प्रदेश ताब्यात आल्यास आसाम मध्ये सैन्य घुसवणे सोपे आहे परिणामी पूर्ण नॉर्थ ईस्ट इंडिया चीनच्या तब्येत येऊ शकते.
(ह्यासंदर्भात अधिक माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.)


         भारत-नेपाळ-चीन यांच्या सीमा ह्या 'कालापानी म्हणजे लिपूलेख पास' ला येऊन मिळतात.  तसेच भारताला ह्या भागावरून चीनच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवणं सोयीचे पडते.  भारताने थेट लिपूलेखपर्यंत बांधलेला हा रास्ता तीर्थयात्रांकरिता जरी असला, तरी ह्यामुळे भारतीय सैन्य चीनच्या सीमेपर्यंत अगदी जलद गतीने धडक मारू शकतात.  आणि त्याचमुळे चीनच्या कोणत्याही नीच कृत्याला भारत चोख प्रयुत्तर देऊ शकतो.  हे सर्व पाहता नेपाळ आणि चीनने ह्याबाबत चालवलेल्या एकंदर भूमिकेचा अंदाज बांधता येऊ शकतो.

       २०१७ ला चीनने 'डोकलाम' मध्ये लष्करी तणाव निर्माण केला असतानाही भारताने एक इंचही जागा सोडली नव्हती.  आताही भारत तुसभरही मागे हटला नाही आणि हटणार नाही.  मजबूत नेतृत्वामुळे भारताचे चित्र आता बदलत चालले आहे.  एक जबाबदार देश, उत्कृष्ट निरीक्षण क्षमता, वाढती लष्करी शक्ती, अत्याधुनिक शस्रास्रे आणि मुख्य म्हणजे भारतीय सैन्यांचे मनोबल वाढते ठेवून त्यांना मिळणारा संपूर्ण सकारात्मक व सहकार्यात्मक पाठिंबा, ह्यामुळे भारत देश आता मजबूत आणि विशालतेच्या दिशेने आगेकूच करत आहे.


तिबेट
         तिबेट हा एक स्वतंत्र प्रांत होता.  मात्र १९५० मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले व १७ कलमांचा करार करत तिबेट गिळंकृत केले.  कलमांच्या मार्फत तिबेटवर स्वतःचा हक्क दाखवत तिबेटियन जनतेवर बरेच निर्बंध आणले गेले.  परिणामी जनतेमध्ये चीनबरोबर सातत्याने संघर्ष सुरु झाला.   पण चीनने तो प्रत्येक वेळी हाणून पडला.  १९५९ मध्ये १४ वे दलाई लामा भारताच्या आश्रयाला आले व भारताने त्यांना राजाश्रय दिला.  हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेतून तिबेटचे स्वंतत्र सरकार चालवण्याची परवानगी त्यांना देण्यात आली व तेथून आजही तिबेटचे सरकार चालवले जात आहे.  मात्र नेहमीप्रमाणेच चीनच्या विरोधामुळे तिबेटचे आजचे स्थान ‘चायना ऑक्युपाईड टेरीटरी’ म्हणजेच चीनव्याप्त क्षेत्र असेच आहे.

         तिबेटकडे स्वतःचे शासन, संस्कृती व पुरेशी लोकसंख्या असल्यामुळे 'तिबेट' हा 'देश' या संकल्पनेच्या निकषांमध्ये परिपूर्णतेने बसतो.  एखाद्या क्षेत्राला मान्यता देण्याचे अधिकार हे संयुक्त राष्ट्रसंघटनेचे आहेत.  ह्यात ठराव मंजूर होऊन, त्याला सुरक्षा परिषदेची मान्यता मिळवावी लागते.  तिबेटला जर मान्यता मिळाली तर चीनसाठी ही बाब चिंतेची ठरते.  

         तिबेट, हाँगकाँग, तैवान ह्या चीनच्या मुख्य नसा म्हणता येतील.  तिबेटच्या सीमारेषा भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार या चार देशांशी जोडल्या गेलेल्या आहेत.  'अक्साई चीन' हा देखील तिबेटचाच एक भाग आहे.   परंतु, १९६२ मध्ये चीनने भारताकडून अक्साई चीनचा भाग बेकायदेशीरपणे गिळंकृत केला.  तो तिबेटचाच भाग असल्याने आमचाच भाग आहे असा दावा चीन ठोकत असला, तरी तो फोलच आहे हे येणार काळ नक्कीच सांगेल.  

          अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी सूत्रे हातात घेताना अमेरिकेत अनेक कायदे बनवण्यात आले.   त्यात चीनकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे आणि ते थांबवण्यात यावे यासंदर्भातील असलेले हे कायदे आहेत.  त्यामुळे चीन आपला दावा सांगत असणाऱ्या तिबेट, हॉंगकॉंग आणि तैवान ह्यांना ह्यासाठी चीनविरोधी लढण्यात एक प्रकारचे सकारात्मक सहकार्य होणार आहे.  मात्र चीनसाठी ही डोकेदुखी बनलेली असून ती अधिक तीव्र होत चालली आहे.  कारण जर तिबेटला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली तर चीनचा अक्साई चीन, लडाखवरील दावा सुद्धा पूर्णपणे फोल ठरेल.

अमेरिकेच्या 'तिबेट कार्ड' मुळे चीनवरील दबाव वाढणार आहे. कारण आंतराष्ट्रीय पातळीवर चीनने कोरोनाव्हायरस संदर्भात ज्या खेळी खेळल्या आहेत, त्यामुळे सर्वच देश चीनच्या विरोधात ठाकले आहेत.   ह्या कारणामुळे चीनच्या तैवान भूमिकेसंदर्भात पाठिंबा देण्यास कोणता देश पुढे येईल, असे वाटत नाही.  चीन सगळ्याच बाजूने कोंडीत पकडला गेल्यामुळे अधिक आक्रमक झाला आहे.  अमेरिका चीनवर आधीपासूनच संतप्त असल्यामुळे अमेरिकेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकात तिबेटला स्वतंत्र देश म्हणून दर्जा मिळण्याची शक्यता अधिक आहे.  चीनला हे मान्य नसल्यामुळे अमेरिका-चीन मधील संघर्ष वाढत आहे.  तर दुसरीकडे भारतासाठी ही घडामोड फायदेशीर ठरणार आहे.

     'कैलाश मानसरोवर' 'लिंक रोड' संदर्भात माहिती वाचताना लक्षात येते की, 'भारत-तिबेट-चीन' यांचा चाललेला सीमावाद किती महत्वाचा आहे.


तैवान -
         तैवानच्या जनतेने १९६० पासून चीनविरोधात स्वतंत्रलढा सुरु केला.  ज्यावेळी हॉंगकॉग चीनच्या अधिपत्याखाली गेला, त्यावेळी तैवानला झालेला धोका ओळखुन अमेरिकेने तैवानला मदत पाठवली.  केवळ त्याचमुळे चीनचा तैवान जिंकण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता.  


          ‘त्साई ईंग-वेन’ पुन्हा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा बनल्या.  त्यांच्या शपथग्रहण सोहळ्याला ४१ देशांच्या ९२ प्रतिनिधींनी  ‘व्हर्च्युअल उपस्थिती’ लावली होती.  त्यात भारतानेही सहभाग घेतला होता.  इतकेच नाही तर तैवानचा एक लोकशाहीवर आधारलेला देश म्हणून भारताने उल्लेख केला.  हा एकप्रकारे चीनसाठी  इशाराच ठरतो.  


        चीनने कोरोनाव्हायरसचे जे सत्य जगापासून लपवून ठेवले, त्या विरोधात जगभरात प्रचंड संताप आहे.  अनेक देश चीनविरोधी गेले आहेत.  असे असले तरी चीनने स्वतःच्या विस्ताराच्या राक्षसी महत्वकांक्षेला तुसभरही धक्का लागून दिला नाही.  उलट तो अधिक आक्रमक बनत 'ईस्ट आणि साऊथ चायना सी' तसेच तैवानच्या आखातात आपल्या हालचाली वाढवत आहेत.  तैवानच्या शपथग्रहण पार्श्वभूमीवर झालेल्या घडामोडीमुळे अस्वस्थ झालेल्या चीनमधील नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना तैवानवर हल्ला चढवून 'तैवानताब्यात घेण्याचा सल्ला दिला आहे.

         त्यामुळे चीनला प्रत्युत्तराची झलक आणि तैवानला पाठिंबा दर्शवित अमेरिकेने, या क्षेत्रातील आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत.  गेल्या आठवड्यात अमेरिकेची ‘यूएसएस थिओडोर रुझवेल्ट’ ही अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘साऊथ चायना सी’ मध्ये दाखल झाली आहे.  तसेच 'लान्सर' या बॉम्बर विमानांचा ताफाही दोन्ही सागरी क्षेत्रात गस्त घालत आहेत.

     
         चीन अनेक मार्गाने भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करत आहे.  भारताचा वेगाने सुरु असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास चीनला खुपतो आहे.  विविध सीमेवर चीनचे सुरु असलेले कपटी कारस्थाने, हालचाली, छोट्या प्रदेशांवर सुरु असलेली हुकूमत, धाक आणि त्यांना भारताविरुद्ध भडकावण्यासाठीचे सुरु असलेले षडयंत्र आता उघड आहे.  जगभरातील प्रमुख देशांचा भारताला चीनविरोधात संपूर्ण पाठिंबा असून,  चीनवर सणसणीत आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु आहेत.  


       चीनला टक्‍कर देणारा भारत हा एकमेव शेजारी देश असून भारतासमोर चीनची दंडेली चालणार नाही, असा इशारा एका तैवानी वर्तमानपत्राने दिला आहे. इतकंच नाही तर तैवानचा 'Photo of the Day' ला सोशल मिडियावरही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.



         आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे असलेले स्थान आणि भारताची असलेली 'आत्मनिर्भरता' तसेच 'आत्मविश्वासमय' वाटचाल पाहताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.  भारताचा पाया हा मूलतः आध्यात्मिकच आहे.  भारतावर आजपर्यंत अनेक परकीय आक्रमणे आले, पण प्रत्येकवेळी भारताने तितक्याच त्वेषाने ते परतवूनही लावले.  भारताची संस्कृती, भारताची संयमता, भारताचे वाढते प्रभुत्व, भारताची सकारात्मक प्रतिमा त्याचबरोबरीने असलेली विशाल दूरदृष्टी हे सर्वच देशांनी जाणले आहे आणि अजूनही अनुभवत आहेत.  

         एकीकडे इतर देशांचा वाढत पाठिंबा, भारतावर असलेला विश्वास, भारताची प्रत्येक पाऊलागणिक वाढत जाणारी सक्षमता तर दुसरीकडे चीन, पाकिस्तान सारख्या धूर्त, कपटी, आणि काळाने ग्रासलेल्या त्यांच्यासारख्या विचारसरणीला पाहताना पवित्र्याने रसरसलेला 'सुंदरकाण्ड' मधील विभीषण-रावण संवाद आठवतो.  

रामु सत्यसंकल्प प्रभु सभा कालबस तोरि|
मैं रघुबीर सरन अब जाऊँ देहु जनि खोरि ||२३७|| (सुंदरकाण्ड ओवीं) 


          सध्या तैवान, तिबेट, नेपाळ आणि चीन मधील सीमावादावरून वातावरण चिघळत असताना चीनने भारतीय सैन्यावर कपटाने केलेला हल्ला हा अतिशय निंदनीय आणि आत्मघातकी आहे.  चालू घडामोडी पाहता आणि सध्याचे भारत-चीन सीमावादावरून घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना पाहता, आपल्याला ह्याविषयी थोडेफार तरी धागेमुळे किंवा त्या गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.   त्याचबरोबर इतरांनाही ह्या गोष्टींबद्दल जागृत करणे ही काळाची गरज आहे.  कारण युद्ध सुरु झाले आहे.  सीमेवरून थेट घरापर्यंत त्याचा प्रवेश झालेला आहे.  आता आपल्याला सावधानतेसोबत सतर्कता आणि त्याबद्दल आवश्यक खबरदारीही तितकीच महत्वाची आहे.  आपले सैनिक सीमेवर सर्वस्व पणाला लावून शत्रूला  परतवून लावत आहेत.  आपल्याला सीमेवर जायची गरज नाही पण म्हणून आपले युद्ध थांबत नाही आणि संपत तर नाहीच नाही.  आपल्याला आपल्या भारतीय सैन्याला साथ द्यायची आहे.  भारताला बलाढ्य बनवायचं आहे.  भारताला सक्षम करण्यात जेवढा आपल्या सैन्याचा मोलाचा वाट आहे, तितकाच महत्वपूर्ण वाटा आत्मनिर्भर भारताचे नागरिक म्हणून आपलाही आहेच.  कारण... Third World War has been Started... 

         - अनुप्रिया सावंत


4 comments:

  1. खूप माहितीपूर्ण ब्लॉग...खूप क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टी अगदी सहज, सोप्या पद्धतीने मांडल्यामुळे छान समजलं... Ambadnya for sharing

    ReplyDelete
  2. Anypriyaveera, great efforts to share the minute details in simple form. All the best for further series...

    ReplyDelete
  3. Amazing write up! U have cleared almost all the facts. I can't imagine how much study u r done for this. Hats off!!

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.